रत्नागिरीतील सावरकरांची सावली : मो. वि. दामले

    27-May-2025
Total Views | 48
 
During Savarkar 13-year stay in Ratnagiri M. V. Damle was with him as Savarkar shadow
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या हयातीत केवळ क्रांतिकारक, योद्धेच घडविले नाहीत, तर निष्ठावान समाजसेवक आणि लेखकांचीही एक फळी उभी केली. सावरकरांच्या रत्नागिरीतील 13 वर्षांच्या वास्तव्यात मो. वि. दामले हे अर्थोअर्थी सावरकरांची सावली म्हणून त्यांच्यासोबत होते. तेव्हा, सावरकरांचे जिवाभावाचे सहकारी, समाजसेवक, शिक्षक आणि लेखक म्हणून योगदान दिलेल्या मो. वि. दामले यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आठवण झाली की, आपल्या मनःपटलावर त्यांची जी प्रतिमा तयार होते, ती म्हणजे ते एक राजकीय क्रांतिवीर. एका सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले वीर सावरकर यांनी राजकीय क्रांतीसाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न तर केलेच. पण, अंदमानहून सेल्युलर जेलमधून भारतात आल्यावर त्यांनी जी सामाजिक क्रांती हाती घेतली, ती त्याहूनही महत्त्वाची होती. त्यांनीच एका ठिकाणी म्हटलेले आहे की, “एखादवेळी माझी मार्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण माझे रत्नागिरीतील सामाजिक कार्य मात्र विसरू नका.”
 
रत्नागिरीत पाठविताना ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर काही बंधने लादली होती. त्याच्यातील दोन प्रमुख म्हणजे, सावरकरांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध कोणत्याही राजकीय कारवायांत भाग घ्यायचा नाही व रत्नागिरी सोडून बाहेर जायचे नाही. त्यामुळे ते आता जिथे पतितपवन मंदिर आहे, तिथून जवळच पटवर्धन यांच्याकडे राहू लागले. अनेक सहकारी तिथेही त्यांना लाभले. त्यावेळी देशात अनेक ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती. सावरकर रत्नागिरीत जिथे राहायचे, त्या परिसरातही प्लेगची साथ पसरली. प्लेगचे दुष्परिणाम काय असतात, हे लहानपणीच त्यांनी आपल्या कुटुंबात अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी आपले निवासस्थान बदलण्याचे ठरविले आणि ते जवळच पाच-सहा किमी अंतरावर असलेल्या शिरगाव या गावी विष्णुपंत दामले यांच्याकडे राहायला गेले.
 विष्णुपंत दामले यांचे घराणे हे परंपरा जपणारे होते, पण शिक्षित होते. परिस्थितीस अनुसरून बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी व सामाजिक जाण होती. सावरकरांना जी सामाजिक क्रांती अभिप्रेत होती, त्याच्यात त्यांना जीव ओतून काम करणारा एक सहकारी दामले कुटुंबातच सापडला. विष्णुपंत दामलेंचे चिरंजीव मोरेश्वर विष्णुपंत दामले. वयवर्षे त्यावेळी 16. तरुण सळसळणारे रक्त, समाजासाठी काहीतरी करण्याच्या तयारीत!
 
त्यावेळी म्हणजे आजपासून 100 वर्षांपूर्वी सावरकरांचे विज्ञानवादी विचार हे समाजाच्या पचनी पडणे फारच कठीण होते. हिंदू धर्मातील जातिव्यवस्था ही हिंदूंच्या चौफेर प्रगतीला लागलेली कीड आहे, हिंदू समाज अशा सात बेड्यांमध्ये जखडून गेलेला आहे आणि त्या बेड्या त्यांनी तोडून टाकण्याच्या कामाला झपाट्याने सुरुवात केली, ती दामलेंच्या घरी राहत असतानाच!
 
त्यावेळी सावरकरांना कोणत्याही प्रकारची मदत करणारी व्यक्ती ब्रिटिश सरकारच्या नजरेखाली असायची, त्यामुळे इच्छा असूनही धोका पत्करायला कुणीही तयार होत नसे. संपूर्ण दामले कुटुंबाने तर हा धोका स्वीकारलाच. पण, मो. वि. दामले यांनी सावरकरांना रत्नागिरीत असेपर्यंत त्यांच्या सामाजिक कार्यात संपूर्ण सहकार्य केले. त्यावेळची सामाजिक स्थिती एवढी कर्मठ होती की, दामले कुटुंबावर एक विचित्र प्रसंग ओढवला. सावरकर जातिभेद नष्ट करण्याचे प्रयत्न करीत, त्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या, राबवायला सुरुवात केली. दामले कुटुंब त्यांना सहकार्य करीत होते म्हणून स्वजातीय ब्राह्मणांनीच दामले कुटुंबावर बहिष्कार टाकला. परिस्थिती एवढी टोकाला गेली की, गणेशचतुर्थीला त्यांच्याकडे यायला त्यांच्याच पुरोहिताने चक्क नकार दिला. दामले कुटुंबही पौरोहित्य जाणत होते, त्यामुळे त्यांनी स्वतःच पूजा करून ऐनवेळी आलेल्या प्रसंगावर तोडगा काढला. एवढेच नव्हे तर अनेकांना त्यांनी आपल्या घरातली पूजा आपणच करण्यासाठी मार्गदर्शन केले. हीच पद्धत मागच्या 100 वर्षांपासून दामले कुटुंबाने आजपर्यंत सुरूच ठेवलेली असून, समाजाला एक नवीन विचार दिलेला आहे.
 
सावरकर दामलेंच्या वाड्यात राहायला आले ते फक्त सहा-सात महिनेच त्यांच्याकडे होते. पण, सावरकर रत्नागिरीत असेपर्यंत सगळ्या परिणामांना तोंड देत, सावरकरांच्या सामाजिक क्रांतिकार्याला त्यांनी वाहून घेतले. त्यांनी ‘सावरकर स्मृती’ नावाचे एक छोटेसे पुस्तकही नंतर लिहिले. एवढ्या जवळून तात्यांना सहकार्य करून त्यांच्या सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची दैनंदिन कार्यशैली व कामाचा आवाका भारतीयांसमोर एखाद्या सहकार्‍याने लिहून प्रसिद्ध केला असेल, असे वाटत नाही.
एका आठवणीत ते सांगतात, “तात्या सकाळी 7 वाजताच्या सुमारास उठत. शौचमुखार्जन झाल्यावर 20-25 मिनिटे डम्बेल्सच्या साहाय्याने व्यायाम करीत, एक दिवसाआड स्वतः दाढी करीत. कल्ले लांब ठेवीत, पण मिशी काढीत नसत. पांढरे शुभ्र धोतर, साध्या कॉलरचा पांढरा शर्ट व त्यावर पांढरा कोट, डोक्यावर काळी टोपी व हातात काळी छत्री. बाहेर जातेवेळी कपड्यांना हिना अत्तर लावीत. तात्या स्वतःची सर्व कामे स्वतः करीत, अगदी शिस्तीत आणि वेळेत.” तात्यांच्या अगदी बारीक-सारीक आठवणींसह रत्नागिरीतील त्यांच्या सर्व आठवणी मो. वि. दामले यांनी अतिशय प्रभावीपणे शब्दबद्ध केल्या आहेत.
 
तात्यांना भेटण्यासाठी येणार्‍या मंडळींना चहा देण्यासाठी घरातल्या मंडळींची उडणारी तारांबळ, स्त्रियांचे सहभोजन, स्वतः दामले यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या विरोधाला तोंड देत, एक सर्वमान्य असा तोडगा काढीत, सगळ्या जातीतील लोकांचे सहभोजन, स्वतःच्याच घरात आयोजिलेले सर्वजातीय महिलांसाठीचे हळदीकुंकू, अखिल हिंदू उपाहारगृह, जातिभेद पुतळ्याचे दहन, ते तात्यांनी त्यांच्या घरात आपल्या कपडे ठेवण्याच्या पेटीचा डेस्क करून केलेले अनेक पुस्तकांचे लिखाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची आणि तात्यांची भेट, रत्नागिरीत महात्मा गांधी व तात्यांची भेट अशा अनेक घटना हाताळण्यात दामले तात्यांचे सहकारी होते.
 
सावरकरांनी रत्नागिरीत त्यांच्या सामाजिक चळवळीतील अनेक योजना राबविल्या. हिंदूंना आपल्या प्रगतीत अडसर ठरणार्‍या व रूढी-परंपरांमध्ये जखडून ठेवणार्‍या ‘रोटीबंदी’, ‘बेटीबंदी’, ‘वेदोक्तबंदी’, ‘सिंधुबंदी’, ‘स्पर्शबंदी’, ‘शुद्धीबंदी’ आणि ‘व्यवसायबंदी’ या सप्तबेड्यांतून हिंदू समाजाची सुटका करण्यासाठी सावरकरांनी ज्या ज्या कार्यक्रमांचे आयोजन केले, त्यात मो. वि. दामले यांचा सिंहाचा वाटा होता. हनुमान मंदिरातील प्रतिष्ठापनेप्रसंगी तात्यांनी लिहिलेले एकता गीत ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू’ या गाण्याला खुद्द मो. वि. दामले यांनी हार्मोनियमवर स्वर दिले होते. तात्यांचे सहज न कळणारे हस्ताक्षर, त्यांनी शिरगावला सुरू केलेली साक्षरता मोहीम, अस्पृश्यता निर्मूलन, व्यायामप्रसार, स्वदेशीचा आग्रह, धर्मांतरण केलेल्या हिंदूंचे शुद्धीकरण, सनातनी-सुधारक, स्वकीय-परकीय रस्सीखेच, पतितपावन मंदिराची प्रतिष्ठापना करताना आलेल्या अनंत अडचणी व त्यावर सावरकरांनी काढलेले समायोचित तोडगे, सामाजिक समतेसाठी सर्वजातीय सहभोजनांचे आयोजन, सार्वजनिक गणेशोत्सव, सर्वजातीय महिलांचे हळदीकुंकू, सहभोजन, अखिल हिंदू उपाहारगृह व तिथे मो. वि. दामलेंचे बंधू गजानन यांना व्यवस्थापक म्हणून दिलेली जबाबदारी, अस्पृश्यांना जानवी वाटणे, विठ्ठल मंदिर व इतर मंदिरात अस्पृश्यांना मिळवून दिलेला प्रवेश, अनेक विहिरी जिथे तथाकथित अस्पृश्य आसपासही जाऊ शकत नव्हते, त्या विहिरीतील पाणी उच्चवर्णीयांची समजूत काढून अस्पृश्यांना उपलब्ध करून देणे, अशा सावरकरांच्या अनेक प्रयोगात मो. वि. दामले यांनी आप्तस्वकीय, नातेवाईक यांचा प्रसंगी विरोध पत्करून सावरकरांना वेळोवेळी सहकार्य केले, त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. हिंदू समाज मनाने व हृदयाने एक व्हावा, उच्चनीच भेदभाव नष्ट करून आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, सामाजिक व राजकीय अन्यायाला विरोध व्हावा म्हणून ज्या ज्या सुधारित योजना सावरकरांनी राबविल्या, त्या सगळ्यात मो. वि. दामले सक्रिय सहभागी झाले. एवढेच नव्हे, तर सावरकर रत्नागिरीतून गेल्यावरही या सुधारणा समाजाने कायम स्वीकाराव्या म्हणून प्रयत्न चालूच ठेवले.
 
शिरगावात असताना सावरकरांनी भरपूर लेखन केले. ‘हिंदुपदपाशाही’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. तसेच, तात्या रोज नवनवीन पत्रके काढीत व ती टंकलिखित करण्यास मो. वि. दामलेंकडे देत. मो. वि. दामलेंकडे राहत असतानाच तात्यांचे इंग्लंडमधील सहकारी व क्रांतिकारक व्ही. व्ही. एस. अय्यर यांची भेटीच्या वेळची त्यांची उपस्थिती अत्यंत स्मरणीय झाली. सावरकरांना त्यावेळी सर्व लोक ‘तात्या’ म्हणत. दामलेंच्या कुटुंबातही सगळीजण त्यांना ज्येष्ठतेचा मान देऊन ‘तात्या’च म्हणत. सावरकर शिस्तीने कडक, स्वतःच्या मताशी ठाम, पुढची अनेक वर्षे पराभूत होणार नाही, असे सामाजिक, दिशादर्शक विचार, जातीपातीच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या हिंदू समाजाला त्या बेड्या तोडून एकत्रित करण्याची जिद्ध आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि हे सगळे घडवून आणण्यासाठी पावलोपावली सोसाव्या लागणार्‍या अपमानाची तयारी, यांचा परिणाम दामलेंवर झाला. तात्या रत्नागिरीतून 1937 साली नजरकैदेतून मुक्त झाले व मुंबईस राहायला गेले तरीही मो. वि. दामलेंनी हाती घेतलेले कार्य सुरूच ठेवले.
वयाच्या अठराव्या वर्षीच 1926 साली त्यांनी रत्नागिरीत फाटक हायस्कूलमध्ये नोकरी स्वीकारली. 1949 साली ‘बीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाले, हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले व 44 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले.
 
44 वर्षांच्या शिक्षकी पेशात त्यांनी सावरकरांना अभिप्रेत असलेला, कर्तव्याची जाण असलेला विद्यार्थी घडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तात्यांच्या सहवासाने त्यांच्यामध्ये हिंदू समाज, राष्ट्रीयत्व याविषयींचे विचार पक्के झाले. गरज असेल तिथे अनिष्ट सामाजिक रूढी-परंपरांविरुद्ध झगडण्याची व हिंदू समाजाच्या हितासाठी लढण्याची, तात्यांना अभिप्रेत असलेले सामाजिक बदल पटवून देण्याची हातोटी त्यांना सापडली. दरम्यान, त्यांनी सामाजिक बदल नवीन पिढीवर ठसविण्यासाठी, राष्ट्रीयत्व जागविण्यासाठी, रत्नागिरीतच हायस्कूलची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. अनेक शाळांच्या व्यवस्थापनासाठी तात्यांच्या मनात असलेल्या सामाजिक प्रगतीच्या योजना राबविण्यास मार्गदर्शन केले. माध्यमिक शिक्षकांची ‘सहकारी संस्था’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला, ‘शिरगाव विकाससेवा संस्था’ स्थापन करून 25 वर्षे अध्यक्षपद भूषविले. ‘रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघ’, ‘जिल्हा सहकारी खरेदी-विक्री संघ’, ‘रत्नागिरी सेंट्रल कॉ-ऑप. स्टोअर्स’ इत्यादी संस्थांचे ते संचालक झाले व काही वर्षे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
 
तात्यांच्या रत्नागिरीतील 13 वर्षांच्या वास्तव्यात मो. वि. दामले यांनी तात्यांच्या सामाजिक क्रांतीत त्यांना संपूर्ण सहकार्य केलेच. पण, तात्या मुंबईला गेल्यावरही रत्नागिरीत त्यांनी ते कार्य बंद पडू दिले नाही. तात्यांच्या सहवासाने ते उत्कृष्ट वक्ते बनले होते, लेखनाची आवड निर्माण झाल्यामुळे वर्तमानपत्रांतून, पाक्षिक, मासिकांतून दामलेंनी लेखन चालूच ठेवले. ‘नवकोकण’, ‘बलवंत’मध्ये उपसंपादक झाले आणि समाजासाठी काम करीत असतानाच त्यांनी 86व्या वर्षी दि. 14 मार्च 1994 साली देह ठेवला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
 
- राजेंद्र सवाईकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121