स्वा. सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले होते. त्यांची प्रेरणा घेऊनच जपानमध्ये रासबिहारी बोस यांनीही ‘हिंदू सभे’ची स्थापना केली होती. सावरकरांचे चरित्र जपानी वृत्तपत्रात छापून जनतेमध्ये भरपूर जागृतीही बोस यांनी निर्माण केली होती. पण, तरीही रासबिहारी बोस हे स्वातंत्र्यसंग्रामातील उपेक्षित वीर ठरले. तेव्हा, सावरकरांच्या राष्ट्रोत्थानाच्या जाज्वल्य प्रेरणेतून स्वातंत्र्यक्रांतीची मशाल पेटवणार्या रासबिहारी बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकणारा हा लेख...
-------------
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परीसस्पर्शाने अनेक वीर देशभक्तीने भारावून गेले आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. सावरकरांची दूरदृष्टी व परखडपणा यांची अनेकांना चांगलीच अनुभूती आली होती. जातीय राजकारणाची जागरूकता व मुस्लीम लीगचे मनसुबे हिंदुस्थानाला अधिक धोका निर्माण करणारे आहेत, हे सावरकरांच्या सूक्ष्म दृष्टीला जाणवले होते. मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे रक्षण करण्याच्या हेतूने आपण युद्ध करत आहोत, हा ब्रिटनचा फोल दावापण त्यांनी उधळून लावला होता. सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही, यासाठी सावरकरांनी हिंदू सैनिकीकरणावर भर दिला होता. हो, हिंदूंचे सैनिकीकरण! सावरकरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “कागदी ठरावाच्या भार्यांनी नव्हे, तर रायफलीच्या मार्यांनी स्वातंत्र्य जिंकता येते, हे विसरू नका.” इकडे सावरकरांचा झंजावात हिंदूंची शक्ती एकवटत होता, तर सुभाषबाबूंच्या नेतृत्वात ‘आझाद हिंद सेना’ या कामात वेगाने घोडदौड करत होती.
हिंदुस्थानातील हॉलवेलसारख्या मेलेल्या ब्रिटिशाचा दगडी पुतळा उखडून टाकून बंदिवासात पडणे, हे कसे चुकीचे आहे, हे सावरकरांनी सुभाषबाबूंना पटवून दिले. पुढे सावरकर म्हणतात, “हिंदू सभेतील सैनिकीकरणाचे भारतव्यापी आंदोलन यशस्वी होत चाललेय. सशस्त्र क्रांतिकारकांनी पहिल्या महायुद्धात जर्मनीशी केलेल्या संधीची व ब्रिटिश हिंदी सैन्यातील जर्मनीच्या हाती पडलेल्या हिंदी सैनिकातून आपले क्रांतिसैन्य उभारले गेले आहे. ही सगळी माहिती पुरवण्याच्या मागे गुप्तपणे काम करणारे आहेत रासबिहारी बोस.” बंगाल प्रेसिडेन्सी येथे दि. 25 मे 1886 मध्ये जन्मलेल्या रासबिहारी बोस यांनी देशाच्या क्रांतिकार्यात उडी घेतली होती. अमरेंद्र चटर्जी यांनी चालवलेल्या बंगाल क्रांतिकारी संघटनेत रासबिहारींचा मोठा सहभाग होता. ‘युगांतर’ या बंगाली पत्रकांद्वारे अनेक भागांत जनजागृती होत होती.
रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डीग्ज यांना मारण्याची योजना क्रांतिकारकांनी आखली. देशाची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याची सुरुवात होणार होती. हार्डीग्ज यांची हत्तीच्या अंबारीतून मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली, पण चांदणी चौकात त्यांच्या अंबारीवर बॉम्ब फेकण्यात आला. त्यात हार्डीग्ज घायाळ झाला. प्रयत्न अयशस्वी जरी झाला, तरी ब्रिटिश राजवटीला यामुळे चांगलाच हादरा बसला होता. काही क्रांतिकारक पकडले गेले, फासावरही गेले, पण पुढील धोका ओळखून रासबिहारी बोस रवींद्रनाथ ठाकूर यांचे नातेवाईक बनून जपानला पोहोचले. अनेक वेळा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्यांनी आपले काम सुरू ठेवले. ब्रिटिश सरकार रासबिहारी बोस यांच्या प्रत्यार्पणासाठी जपानवर दबाव टाकत होते. रासबिहारी बोस यांनी एझो सोमा व कोको सोमा यांच्या मुलीशी लग्न केले. नंतर तेथेच ते पत्रकार व लेखक म्हणून राहू लागले. आपल्या पत्राद्वारे मात्र ते सावरकरांच्या सतत संपर्कात होते.
अमेरिका व कॅनडा येथे राहणार्या, पण भारताचे स्वातंत्र्य हेच ध्येय असणार्या पंजाबी व अनेक दुसर्या क्रांतिकारकांना एकत्र करून रासबिहारी बोस यांनी क्रांतिज्योत धगधगत ठेवली होती. रासबिहारी बोस ‘गदर पार्टी’चे पण प्रमुख सदस्य होते. रासबिहारी बोस यांच्यासारखे अनेक सशस्त्र क्रांतिकारक ज्याप्रमाणे ब्रिटिशांना हुलकावणी देऊन जपान, जर्मनीला गेले, त्याप्रमाणे आपण पण जावे, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची प्रकट घोषणा करावी, ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी. कारण, अशी राजकीय खेळी खेळल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, हे ‘अभिनव भारता’च्या क्रांतिकारकांचे परराष्ट्र धोरण होते. सावरकरांनी पुन्हा सुभाषबाबूंना समजावून सांगितले. त्यांच्यातील भेट ही गुप्त भेट होती.
विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, लाला हरदयाळ, पिल्ले, एम. पी. टी. आचार्य हे ‘अभिनव भारता’चे पुढारी तसेच स्वामी विवेकानंदांचे बंधू डॉ. भूपेंद्रनाथ यांनी एक समिती गठन केली. यांच्या प्रयत्नांमुळेच जर्मनीने सैन्यास द्रव्य व शस्त्रास्त्रे पुरवली. अमेरिकेतील गदर पक्षाने सरदार अजित सिंग, मानवेंद्रनाथ रॉय, राजा महेंद्र प्रताप व रासबिहारी बोस यांनी हिंदी सैन्यात क्रांतीचा वणवा पेटवला होता.
1939 सालात दुसरे महायुद्ध सुरू झाले. ब्रिटिश सैन्य जर्मनी, आफ्रिका व इतर वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध करत होते. तेव्हा ब्रिटनला स्वतःच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करावी लागत होती. हिंदुस्थानातील ब्रिटिश अधिकार्यांनी हिंदी लोकांना सैन्यात भरती करण्याचे भरपूर प्रयत्न केले. या संधीचे सोने करावे म्हणून हिंदू महासभेने हिंदू सैनिकीकरणाचा ठराव केला.
“हिंदूंनो, सैन्यात शिरा. रणक्षेत्रात आपला पराक्रम गाजवून युद्धप्रशिक्षण घ्या. आपल्या देशासाठी पुढे ते हिताचे ठरणार आहे.” सावरकरांनी बेधडकपणे संदेश दिला, ‘राजनीतीचे हिंदूकरण करा व हिंदूंचे सैनिकीकरण करा.’ सावरकरांच्या या मताशी रासबिहारी बोस पूर्णपणे सहमत होते. त्यांनी सावरकरांना या संदर्भात पत्रे पाठवली होती. काही पत्रांत त्यांनी स्पष्ट कळवले होते की, “जर्मनी आणि इटली जपानशी संधी करून सैन्यउभारणी करत आहे व चालू वर्षातच जपान ब्रिटिशांविरुद्ध युद्ध घोषणा करेल, हे निश्चित.”
स्वा. सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले होते. त्यांची प्रेरणा घेऊनच जपानमध्ये रासबिहारी बोस यांनीही ‘हिंदू सभे’ची स्थापना केली होती. सावरकरांचे चरित्र जपानी वृत्तपत्रात छापून जनतेमध्ये भरपूर जागृती निर्माण केली होती. सुप्रसिद्ध जपानी ग्रंथकार जे. जी. ओहसावा ‘द टू ग्रेट इंडियन्स इन जपान’ या ग्रंथात म्हणतो, "The chief of the Indian National Army proceeded alone to the front line and talked to Indian officers and soldiers in the British Army not to be false to their love of India and the Independence of India in strong heart-stirring words. Miracle was accomplished. The shooting was stopped. Savarkar's militarization policy in World War II began to shape. The speech was finished; waves of cheer rose from the Indian soldiers who jumped into the I. N. A. Japanese Imperial Guards were entirely stupefied.
” खरं तर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या चळवळीमुळे सुभाषबाबूंना अनेक प्रशिक्षित, देशभक्त सैनिक व अधिकारी मिळाले. पुढे टोकियो येथे परिषद घेऊन ‘इंडिपेंडेंस लीग’ची स्थापना करण्यात आली. जपानने पकडलेल्या अनेक सैनिकांना ‘इंडियन नॅशनल आर्मी’मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. कॅ. मोहन सिंग, सरदार प्रीतम सिंग व रासबिहारी बोस यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘भारतीय राष्ट्रीय सेना’ अस्तित्वात आली होती, जिचे पुढे ‘आझाद हिंद फौज’ या नावात परिवर्तन झाले आणि सुभाषचंद्र बोस यांच्याकडे याचे नेतृत्व आले. सावरकर, सुभाषबाबू व रासबिहारी बोस यांच्या या दूरदृष्टीमुळे स्वातंत्र्याचा लढा अधिकच मजबूत झाला.
भारताला स्वातंत्र्य मिळाले, ते समाजवाद्यांनी लढवलेल्या काँग्रेसी धोरणांमुळे नव्हे, तर स्वातंत्र्याची ज्योत सैन्यात ज्वलंत झाली. भारतीय लढाऊ दलात देशभक्तीची आग धगधगू लागली. हिंदूंच्या सैनिकीकरणाचे सावरकरी धोरण, आझाद हिंद सैनिकांनी रासबिहारी बोस व सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली ध्येय स्फूर्तीने केलेला सशस्त्र उठाव तसेच नौसेनेतील बंड यामुळे स्वातंत्र्यलढ्याला अंतिम विजय प्राप्त झाला होता. सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाच हे फळ होते.
विलक्षण मनसामर्थ्य, प्रभावी लेखणी आणि देशभक्तीने प्रेरित रासबिहारी बोस नक्कीच कसलेले क्रांतिकारक होते. आझाद हिंद सरकारचे कुशल मार्गदर्शक व उत्तम सल्लागार होते. भारताबाहेर राहून स्वातंत्र्यलढ्यासाठी सैन्यशक्ती संघटित करण्याचे फार आव्हानात्मक काम त्यांनी केले होते. दि. 21 जानेवारी 1945 रोजी बोस यांचे टोकियो येथे निधन झाले. जपान सरकारने त्यांचे पार्थिव सन्मानपूर्वक वाहून नेण्याची व्यवस्था केली, पण भारतमातेच्या या सुपुत्राचा अस्थिकलशदेखील भारतात आणण्यात आपल्या राजकारण्यांना यश आले नाही. जपान सरकारने त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द रायझिंग सन’ जो परदेशी व्यक्तीला दिलेला सर्वोच्च पुरस्कार होता, तो प्रदान केला होता. भारतीय स्वातंत्र्यवेदीवरील महान क्रांतिकारी रासबिहारी बोस व त्यांचे देशाप्रतिचे महत्त्वपूर्ण योगदान, यासाठी प्रत्येक हिंदुस्थानी त्यांचा सदैव ऋणी राहील.