स्वातंत्र्यवीरांचा शिलेदार : क्रांतिवीर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय

    27-May-2025
Total Views | 18


Revolutionary Virendranath Chattopadhyay
 
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सातासमुद्रापार ब्रिटिशांविरोधात मोर्चेबांधणी करणार्‍या क्रांतिवीरांपैकी एक म्हणजे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. सावरकरांनी 1906 साली लंडनमध्ये सुरु केलेल्या ‘अभिनव भारत’च्या शाखेत वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा सहभाग होता. एकूणच स्वा. सावरकरांचा वीरेंद्रनाथ यांच्या विचारांवर आणि कृतीवरही प्रचंड प्रभाव होता. तसेच सावरकरांची व्याख्याने आयोजित करण्यापासून ते लंडनमध्ये अटक झाल्यानंतर सावरकरांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार्‍यांमध्ये वीरेंद्रनाथ आघाडीवर होते. असे हे स्वातंत्र्यवीरांचे खंदे शिलेदार आणि मातृभूमीसाठी वीरमरण पत्करलेल्या वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची ही शौर्यगाथा
-----------------------
पदोपदी पसरून निखारे अपुल्याच हाती।
होऊनिया बेहोष धावलो ध्येय पथावरती॥
कधी न थांबलो विश्रांती स्थळ पाहिले न मागे।
बांधू न शकले प्रीतीने वा कीर्तीचे धागे॥
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार।
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ॥
 
या कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांनी यथार्थ वर्णन क्रांतिपथावर आपले जीवन घालविलेल्या असंख्य वीरांसाठी लिहिले. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडते असे वर्णन आहे. वीरेंद्रनाथ यांचे वडील अघोरनाथ व आई वरदसुंदरी. दि. 2 सप्टेंबर 1880 रोजी वीरेंद्रनाथांचा जन्म झाला. अघोरनाथ व वरदसुंदरी एकमेकांशी बोलताना बंगाली, मुलांशी बोलताना हिंदी, तर नोकरांशी स्थानिक तेलुगू भाषेत बोलत असत. त्यामुळे सर्व मुलेही तिन्ही भाषांत पारंगत झाली होती. वीरेंद्रनाथांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद, माध्यमिक शिक्षण चेन्नई, तर महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता येथे झाले. बंगालच्या फाळणी विरुद्ध आंदोलन उसळले. वीरेंद्रनाथही त्या आंदोलनात सहभागी होते. 1901 साली कोलकाता विद्यापीठातून ते ‘बीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ‘आयसीएस’ करण्यासाठी त्यांनी 1902 साली ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’त प्रवेश घेतला. पण, दोनदा अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा देण्याचे ठरविले.
 
त्याचवेळी लंडनमध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ‘इंडियन सोशॉलॉजिस्ट’ हे इंग्रजी मासिक सुरू केले. त्यातून हिंदी जहाल पक्षाच्या कार्याचा प्रचार-प्रसार सुरू झाला. दि. 18 फेब्रुवारी 1905 रोजी श्यामजी यांनी ‘इंडियन होमरूल सोसायटी’ची स्थापना केली. त्यांनी लंडनमध्ये हायगेट भागात ‘इंडिया हाऊस’ची नवी वास्तू बांधली. दि. 24 जून 1906 रोजी स्वा. सावरकर बॅरिस्टरच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला ‘इंडिया हाऊस’मध्ये राहायला आले. सावरकरांनी लंडनमध्ये विविध विद्याशाखेत शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना क्रांतिकार्यात सहभागी करून घेतले. 1904 साली सावरकरांनी नाशिक येथे ‘अभिनव भारत’ची स्थापना केली. 1906 साली लंडनला त्याची शाखा सुरू केली. यात हरनामसिंग, मिर्झा अब्बास, लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा, ग्यानचंद वर्मा, व्ही. व्ही. एस. अय्यर, निरंजन पाल, एम. पी. टी. आचार्य, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय इत्यादी या संस्थेत सहभागी होते.
 
1857 सालच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुवर्ण महोत्सव 1907 व 1908 साली दोनदा साजरा केला. दुसरा महोत्सव मोठ्या प्रमाणात शत्रूच्या शिबिरात केला. त्या दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनात वीरेंद्रनाथांनी तन, मन, धनाने कार्य करून सिंहाचा वाटा उचलला. इंग्लंडच नव्हे तर पॅरिस, बर्लिनवरूनही तरुण आले होते. दि. 18 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीत स्टुटगार्ड येथे ‘आंतरराष्ट्रीय सोशॉलिस्ट कॉन्फरन्स’ला सावरकर यांनी मॅडम कामा, बॅ. राणा, वीरेंद्रनाथांना हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून पाठविले. दि. 23 जुलै 1908 रोजी लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली. दि. 31 ऑगस्ट 1908 रोजी वीरेंद्रनाथ टिळकांना सोडविण्यासाठी, निवेदन देण्यासाठी लंडनला गेले. लंडनमध्ये ठिकठिकाणी सावरकर व वीरेंद्रनाथांनी व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित केली. धनार्जनासाठी वीरेंद्रनाथांनी तिथे मिठाईचे दुकान काढले. पण, खूप मेहनत, कष्ट, प्रयत्न करूनही यश आले नाही. वीरेंद्रनाथांनी ऑक्सफर्डला एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बिपीनचंद्र पाल यांच्या ‘स्वराज्य’ या पत्रकाचे ते व्यवस्थापक होते.
 
वीरेंद्रनाथांना सावरकरांविषयी निरातिशय प्रेम, आदर, आपुलकी होती. वीरेंद्रनाथ प्रकृतीने शांत स्वभावाचे पण, वादाचा मुद्दा बोलताना आक्रमक आवेशपूर्ण मांडत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक, छाप पाडणारे. फार उंच नाही, पण मजबूत बांधा, अतिशय बुद्धिमान, पाणीदार, तेजस्वी डोळे असे त्यांचे तडफदार व्यक्तिमत्त्व होते. तेलुगू, तामिळ, बंगाली, उर्दू, हिंदी, इंग्रजी, पर्शियन, फ्रेंच, हिब्रू, स्वीडिश, आयरिश, जर्मन, इटालियन, डच, रशियन, स्कॅन्डेनेव्हियन इत्यादी 16 भाषा वीरेंद्रनाथांना अवगत होत्या. सावरकरांविषयी ते म्हणत, “सावरकर स्वतःच्या कार्याने, कृतीने, वाणीने इतरांना प्रेरणा देऊन त्यांना नियंत्रणात ठेवणारे असे आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्व होते.” दि. 13 मार्च 1910 रोजी सावरकरांना लंडनला अटक झाली. पहिल्या दिवसापासून सावरकरांच्या बचावासाठी, सुटकेसाठी वीरेंद्रनाथांनी निधी जमविला. सावरकरांना वकील व इतर साहाय्यासाठी वीरेंद्रनाथांनी खूप खटपट, मेहनत घेतली. सावरकरांना कॅक्सटनच्या कारागृहात ठेवले होते. 14 वेळा न्यायालयीन व इतर कामासाठी वीरेंद्रनाथ सावरकरांना भेटले. त्यावेळी वीरेंद्रनाथ आर्थिक अडचणीत होते. सावरकरांनी आचार्यांमार्फत श्यामजी यांना निरोपाचे पत्र पाठविले की, वीरेंद्रनाथांना आर्थिक मदत करावी. सावरकरांची न्यायालयीन बचावाने सुटका करण्यावरच वीरेंद्रनाथांनी आपले सर्व लक्ष केंद्रित केले होते. मॅडम कामा व सहकार्यांसाठी सावरकरांनी वीरेंद्रनाथांच्या मार्फतच निरोप पाठविला की, “संधी मिळालीच तर मार्सेलिसला भेटू. त्याप्रमाणे, तुम्ही सर्व व्यवस्था करा.” सावरकरांनंतर वीरेंद्रनाथांचे नाव ‘मोस्ट डेंजरस’ म्हणून स्कॉटलंड यार्डच्या यादीत होते.
 
ब्रिटिशांचा ससेमिरा, अटक वाचविण्यासाठी वीरेंद्रनाथ दि. 9 जून 1910 रोजी पॅरिसला गेले. तिथूनही क्रांतिकार्य अविरत, अव्याहतपणे सुरू होते. 1913 सालच्या शेवटी वीरेंद्रनाथ बर्लिनला गेले. तेथे त्यांनी ‘बर्लिन कमिटी’ची स्थापना केली. कमिटीचा उद्देश भारतीय स्वातंत्र्याच्या कार्याला चालना देणे, हा होता. वीरेंद्रनाथांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांना शस्त्र सज्ज करून भारतात पाठविण्याची यंत्रणा उभारली. त्यांच्याच प्रयत्नांनी जगभरात ‘इंडियन इन्डिपेंडन्स कमिटी’च्या गुप्त, पण सक्रिय कार्य करणार्‍या शाखा निर्माण झाल्या. वीरेंद्रनाथांच्या अथक प्रयत्नानेच जर्मनीचा पाठिंबा, आर्थिक साहाय्य क्रांतिकार्याला मिळाले.
 
साम्राज्यवादी देश हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी साहाय्य करण्यास तयार नाहीत, हे वीरेंद्रनाथांच्या लक्षात आले. वीरेंद्रनाथ स्वीडन सोडून जर्मनीला परत गेले. तिथे डॉ. खानखोजे यांच्याशी भेट झाली. त्यांना जमेल ती मदत अन् उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापकांशी ओळख करून दिली. भाऊ हरिंद्रनाथ व पत्नी बर्लिनला आले, तेव्हा त्यांना बर्लिन दाखविले. ते भारतात परत निघाले, तेव्हा वीरेंद्रनाथांनी भावनाविवशतेने निरोप पाठविला. भारतात जाऊन भूमातेला सांगा की, “तुझे सुपुत्र अजूनही परदेशात निर्वासित जीवन जगत आहेत, तुला पारतंत्र्यातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना आपल्या मातृभूमीला परत येण्याची उत्कट इच्छा आहे.” वीरेंद्रनाथांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने मोठे पारितोषिक ठेवले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक प्रसंग भरपूर आले. पण, ते बुद्धिचातुर्याने त्यातून सहीसलामत वाचले. वीरेंद्रनाथांनी अतिशय हालअपेष्टा सोसत दिवस काढले. देशकार्यासाठीच त्यांना पैसा हवा होता. ते अतिशय हळवे, सहृदय होते. पराकाष्ठेच्या दारिद्य्रातही कोणी आजारी असला, की घरी आणून त्याची प्रेमाने सेवासुश्रुषा मनापासून करीत असत.
 
जर्मन सरकारकडून मिळणारे तुटपुंजे आर्थिक साहाय्य बंद झाले. तिथे नीट जगणेही अशक्य झाले. बरेचदा खोट्या नावाने राहावे लागत होते. म्हणून ते औषधोचारासाठी कायमचे रशियाला स्थलांतरित झाले. प्रकृतीला आराम पडल्यावर लेनीनग्राडच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कार्ल मार्क्सच्या काही लेखांच्या पुस्तकांचे संपादक म्हणून त्यांचे नाव दिसून येते.
1938 सालच्या शेवटच्या आठवड्यात वृत्तपत्रात बातमी झळकली, ‘मॉस्कोतील हिंदी लोकांचे भवितव्य.’ त्यात लिहिले होते की, “मॉस्कोनी लेनिनग्राड येथील सर्व हिंदी लोकांना फॅसिझमचे ट्राटस्काईट, एजंट असल्याच्या आरोपावरून अटक करून स्थलबद्ध केले आहे.” त्यात जर्मनीत बरेच वर्षे निर्वासित अवस्थेत राहिलेले व नंतर हिटलर येताच रशियात गेलेले वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचाही समावेश आहे. ही बातमी वाचून एम. पी. टी. आचार्य यांनी दि. 27 मे 1938 रोजी सत्यस्थिती काय आहे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे काय झाले, असे निवेदन सर्व वृत्तपत्रात दिले, पण यश आले नाही.
 
आचार्यांनी शेवटी रशिया सरकारने सत्य काय ते प्रसिद्ध करावे, अशी मागणी केली. सावरकर मात्र वीरेंद्रनाथांना कधीही विसरले नाहीत. त्यांनी वृत्तपत्रात निवेदन दिले. सरकारकडेही पाठविले. पण, सरकारने काहीच दखल घेतली नाही. त्यांच्यावर परिणाम झाला नाही. 1938 सालच्या टिळक पुण्यतिथीच्या भाषणात सर्व वृत्तपत्रांना विनंती केली की, वीरेंद्रनाथांची खरी बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी.
 
दुर्दैवाने ही बातमी खरी होती. स्टॅलिननेे विरोधकांच्या शिरकाणात प्रतिक्रांतिवादी तर कधी जर्मनीचे हस्तक असल्याचा आरोप करीत वीरेंद्रनाथ यांना गोळ्या घालून ठार मारले. पण, भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने रशियात चौकशी केली, तर त्यांना मिळालेले उत्तर खरे असेल तर वीरेंद्रनाथ पुढे चार वर्षे जिवंत होते. भारत सरकारने 1947 साली पुढील बातमी प्रसिद्ध केली की, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय गेली 40 वर्षे युरोपात निर्वासित होते आणि 1937 साली त्यांच्याविषयी शेवटचे वृत्त होते की ते रशियात होते. त्यांना हृदयावर सूज येऊन दि. 2 डिसेंबर 1941 रोजी ते दिवंगत झाले. ही बातमी अर्थातच मागाहून बनविलेली, बनावट होती. कारण, दुसर्‍या महायुद्धात स्वातंत्र्याचा घोष करणार्‍या रशियन सरकारला खरी बातमी प्रसिद्ध करणे लज्जास्पद होते, म्हणून वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायांचे नैसर्गिक मरण तेही पुढे चार वर्षांनी 1941 साली झाले, असे वृत्त रशिया सरकारने भारत सरकारला दिले.
त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पराकाष्ठेचा त्याग केला.
 
बुद्धिमान घराण्याचा वारसा अन् कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा सर्वच मिळाले असते. पण, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्व सुखाकडे पाठ फिरवून ‘बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे’ याप्रमाणे आयुष्याचा क्षण अन् क्षण आणि शरीराचा कण अन् कण खर्ची घातला. अशा थोर क्रांतिकारकाला शतशः नमन! अशा थोर भारतमातेच्या सुपुत्रांसाठी कवी बा. भ. बोरकर लिहितात,
 
यज्ञी ज्यांनी देऊनी निजाशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती
 
संदर्भ ग्रंथ -
 
1) अग्निपथावरील परागंदा - ले. वि. श्री. जोशी
2) शत्रूच्या शिबिरात- ले. वि. दा. सावरकर
3) रणशिंग कवितासंग्रह - स्वा. वि. दा. सावरकर
4) अवध्य मी- सावरकर विचार मंच, यवतमाळ
5) वंदन क्रांतिकारकोंको - विवेकानंद प्रकाशन
6) आठवणीतील कविता - भाग एक
7) स्वा. वि. दा. सावरकर - भारतभारती बाल पुस्तकमाला
8) डॉ. खानखोजे - भारतभारती बाल पुस्तकमाला
9) मदनलाल धिंग्रा - भारतभारती बाल पुस्तकमाला
10) वीर सावरकर विवेकानंदांचे वारसदार - डॉ. अशोक मोडक
- रंजना राम शास्त्री
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121