- रेल्वे-मेट्रो सेवा विस्कळीत; नरिमन पॉईंट परिसरात २५२ मिलीमीटर पाऊस
26-May-2025
Total Views | 17
मुंबई, मान्सूनच्या आगमनाला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईची ‘तुंबई’ झाली. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना फटका सहन करावा लागला.
सोमवारी सकाळपासून शहरासह उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. परिणामी सकाळपासून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाले. मशिद बंदर, भायखळा, माटुंगा, सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. पीक-अवरच्या काळात रेल्वे उशीराने धावत असल्यामुळे अनेकांना लेटमार्क लागला. घाटकोपर आणि माटुंगा २० मिनिटांच्या प्रवासाकरिता जवळपास दीड तास लागत असल्याने अनेकांनी रुळांवरून चालत कार्यालय गाठले. हार्बर रेल्वे मार्गावरही पाणी साचल्यामुळे ही सेवा विलंबाने धावत होती. त्या तुलनेत पश्चिम रेल्वेची सेवा खंडीत झाली नसली, तरी गाड्या २० ते ३० मिनिटे उशीराने धावत होत्या.
मुंबई शहर आणि उपनगरात दि. २५ मे रात्री १० ते दि. २६ मे २०२५ सकाळी ११ या १३ तासांत कालावधीत सर्वाधिक पर्जन्यवृष्टीची नोंद झाली. त्यात शहर विभागात नरिमन पॉईंट - २५२ मिलीमीटर, महानगरपालिका मुख्यालय - २१६ मिलीमीटर, ए विभाग - २१४ मिलीमीटर, कुलांबा पंपिंग स्टेशन - २०७ मिलीमीटर, नेत्र रूग्णालय ग्रॅट रोड - २०२ मिलीमीटर, सी विभाग कार्यालय - १८० मिलीमीटर, मेमनवाडा अग्निशमन केंद्र - १८३ मिलीमीटर, ब्रिटानीया पंपिंग स्टेशन (दादर) - १७१ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये कलेक्टर कॉलनी, चेंबुर - ८२ मिलीमीटर, कुर्ला विभाग - ७६ मिलीमीटर, मारवली महानगरपालिका शाळा चेंबुर - ७१ मिलीमीटर, कुर्ला अग्निशमन केंद्र - ६१ मिलीमीटर, एमसीएमसीआर, पवई - ६२ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात नारियलवाडी शाळा सांताक्रुझ - १०३ मिलीमीटर, सुपारी टॅंक - १०१ मिलीमीटर, वांद्रे अग्निशमन केंद्र - ९० मिलीमीटर, चकाला महानगरपालिका शाळा - ८५ मिलीमीटर, विलेपार्ले अग्निशमन केंद्र - ७५ मिलीमीटर आदींचा समावेश आहे.
सततच्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. तथापि, या साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सज्ज होती. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रभाग अधिकारी (वॉर्ड ऑफिसर) आणि कर्मचा-यांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे. उप आयुक्तांनी याची खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. सर्व विभाग प्रमुख, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथकांना प्रत्यक्ष मैदानात तैनात करण्यात आले आहे. तब्बल ६ हजार कर्मचारी 'ऑन फिल्ड' असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत.पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा, तरंगता घनकचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी अथकपणे कार्यरत राहून सेवा बजावत आहेत. भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी पालिकेचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
४१७ ठिकाणी पंपांची व्यवस्था
मुंबई महानगरात पाणी साचण्याच्या ठिकाणी निचरा करण्यासाठी ४१७ उदंचन पंप व्यवस्था करण्यात आली आहे. हे उदंचन पंप कार्यरत राहावे, यासाठी पंप ऑपरेटर तैनात करण्यात आले होते. उदंचन पंप यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिल्याने पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचे आढळून आले. प्रमुख रस्ते, सखल भाग, उपनगरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने निचऱ्याचे काम अद्याप देखील सुरू आहे. झाडांच्या फांद्या पडण्याच्या एकूण ३२ तक्रारी महानगरपालिकेकडे प्राप्त झाल्या. या फांद्याची छाटणी करून व तातडीने उचलून या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले आहे. एकूणच महानगरपालिका यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल कार्यरत असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे.
भुयारी मेट्रो स्थानकात पाणी
- मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भिंत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली. परिणामी वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरु होती.
- जेथून हे पाणी शिरले, तो मार्ग ये-जा करण्यासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथील काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पाणी येऊ नये, म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम दि. १० जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आल्याने लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने भिंत पडली, असे मेट्रो प्रशासनातर्फे कळविण्यात आले.
शॉर्टसर्किट : शहरात १४, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १८ ठिकाणी शॉटसर्किट होण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
झाडे/फांदया पडण्याच्या तक्रारी : शहरात १४, पूर्व उपनगरात १० आणि पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण ३२ ठिकाणी झाडे/ फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरीकांकडून प्राप्त झाल्या.
घर पडले : शहरात ३, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ५ ठिकाणी घराचा /इमारतीचा भाग, भिंत पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. कँडल रोडवरील, जहांगीर बाग चाळ, सनसेट हॉटल, माहिम (प) येथील हाजी कासम इमारत या म्हाडाच्या उपकर प्राप्त तळमजला अधिक २ बांधकाम असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीत अडकलेल्या २ स्थानिकांना अग्निशमन दलामार्फत सुखरुप बाहेर काढण्यात आले.