मुंबई,दि.६ : विशेष प्रतिनिधी शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या पुलाच्या कमला गती देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.
शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर उभारणे आणि एल्फिन्स्टन पुलाची उंची आणि रुंदी वाढविण्यासाठी हा पूल तोडण्यात येणार आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर येथे रेल्वे रुळांवर डबलडेकर पूल असेल. अटल सेतूच्या १५ टक्के वाहन वाहतुकीसाठी हा कनेक्टर वापरला जाईल, असा अंदाज आहे. या कनेक्टरमध्ये चार लेन असतील. शिवडी-वरळी उन्नत कनेक्टरचे काम वेगाने सुरू आहे.
मध्य आणि दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या नवी मुंबईतील प्रवाशांना सिग्नलमुक्त, वेळेची बचत करणाऱ्या मार्गाचा फायदा होईल. वांद्रे-वरळी आणि मुंबई कोस्टल रोडवरून अटल सेतूपर्यंत सुमारे १५ ते २० टक्के वाहनांना वळविणे शक्य होईल. यातूनच अटल सेतूवरील टोल महसूल वाढेल. सध्याची या प्रकल्पाची ६०% काम पूर्ण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करताना रेल्वे रुळांवर ३००० मेट्रिक टन वजनाचा गर्डर उभारणे या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांबद्दल नाही - तो जीवनाशी जोडणारा, प्रवासाच्या वेळा कमी करणे आणि मुंबईचे वाहतूक नेटवर्क पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम बनवणारा असेल, अशी खात्री एमएमआरडीएने व्यक्त केली आहे.