जानेवारी २०२६ला लोकलच्या ताफ्यात येणार नव्या ट्रेन

दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेचा निर्णय

    10-Jun-2025
Total Views |

central railway



मुंबई,दि.१० : प्रतिनिधी 
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसटीच्या दिशेने जाणारी जलद लोकल आणि सीएसटीहुन ठाण्याच्या दिशने जाणारी लोकल या दोन्ही गाड्या मुंब्राजवळ वळणावरून जात असताना प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या गेल्या आणि अडकून प्रवासी रुळावर पडले. यापैकी काहींचा जागेवरच मृत्यू झाला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एका दुर्दैवी घटनेत सकाळी ०९:१० वाजताच्या सुमारास उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे आठ प्रवासी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान पडले.


कसारा-सीएसएमटी लोकल ट्रेनच्या ट्रेन मॅनेजरने या घटनेची माहिती प्रथम दिली. रुग्णवाहिका आणि रेल्वे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वरिष्ठ रेल्वे अधिकारी जखमींना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. जखमींना सर्व शक्य वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. प्राथमिक तपासणीत असे आढळून आले आहे की प्रवासी पायी प्रवास करत होते, असेही मध्य रेल्वेने म्हंटले आहे. तसेच, या दुःखद घटनेची कारणे आणि परिस्थिती निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी केली जात आहे.

लोकल ट्रेनला हवेचे झोत, मोकळ्या जागा आणि अनेक बदल

मुंबईत घडलेल्या या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीएफ टीमसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील लोकल नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याबाबत चर्चा झाली. नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याची प्रमुख समस्या म्हणजे कमी वेंटिलेशनमुळे होणारा श्वास गुदमरणे असल्याचे चर्चेअंती समोर आले.
सविस्तर चर्चेनंतर असे ठरविण्यात आले की, नवीन नॉन एसी गाड्या अशा डिझाइन आणि उत्पादित केल्या जातील जिथे तीन डिझाइन बदलांचा वापर करून वेंटिलेशनची प्रमुख समस्या सोडवली जाईल. यामध्ये प्रथम दरवाज्यांना हवेचे झोत असतील. दुसरे, कोचमध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी छतावरील वेंटिलेशन युनिट असतील आणि तिसरे, कोचमध्ये वेस्टिब्यूल असतील जेणेकरून प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील आणि नैसर्गिक पद्धतीने गर्दी संतुलित करू शकतील. या नवीन डिझाइनची पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होईल. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर, ती जानेवारी २०२६ पर्यंत सेवेत दाखल केली जाईल. मुंबई उपनगरीय सेवांसाठी तयार केल्या जाणाऱ्या २३८ एसी गाड्यांव्यतिरिक्त या ट्रेन असतील.