देव कसा शोधावा!

    06-Feb-2025
Total Views | 37

manache shlok
 
मानवाला निसर्गाकडून कल्पनाशक्तीची अपूर्व देणगी लाभली आहे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण, विश्वातील ऐहिक गोष्टींचे रहस्य उलगडून ज्ञान मिळवू शकतो. तसेच, या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपण शाश्वत अशा भगवंताची, सद्वस्तूची ब्रह्मानुभूती घेऊन मानवी जीवनाचे सार्थक करू शकतो. परंतु, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मानुभूती या सहजसाध्य नाहीत. सद्वस्तू स्वयंप्रकाशी आणि सर्व विश्वाला व्यापून टाकणारी अशी अफाट असली, तरी काही कारणांनी तीसुद्धा झाकाळून जात असल्याने, ती लगेच अनुभवता येत नाही. याचे स्पष्टीकरण आता स्वामी एका दृष्टान्ताद्वारे, पुढील श्लोकात देत आहेत.
 
स्वरुपीं उदेला अहंकार राहोे।
तेणे सर्व आच्छादिलें व्योम पाहों।
दिशा पाहतां ते निशा वाढता हे।
विवेकें विचारें विवंचूनि पाहें॥१७३॥
 
परमात्मस्वरुप स्वतः सिद्ध आहे, याबद्दल वाद नाही. पण, तरीही अहंकाराने ते झाकले गेले आहे, असे स्वामी म्हणतात. काही अभ्यासकांनी म्हटले आहे की, स्वरुपातून उत्पन्न झालेला ‘अहंकार राहो’, म्हणजे तो असू द्या. पण, त्यामुळे पुढील ओळीच्या अर्थाला बाधा येते. स्वामींनी दृष्टान्त देण्यासाठी, ‘राहू’साठी ’राहो’ असा शब्द यापूर्वीही वापरला आहे. दासबोधात स्वामी, ‘राहू’चा उल्लेख ‘राहो’ असा करतात. उदा.
 
कामक्रोदें लिथाडिला।
तो कैसा म्हणावा भला।
अमृत सेवितांच पावला।
मृत्य राहो॥ (दा. १.१.२५)
 
वरील श्लोक क्रमांक १७३ मध्ये स्वामींनी, ‘राहू’चा द़ृष्टान्त देऊन परमात्मस्वरुप अथांग असूनही अहंकाररुपी राहून ते दिसेनासे झाले आहे, झाकले गेले आहे, असे म्हटले आहे. आकाशात सूर्य स्वयंप्रकाशी असून, त्याच्या प्रकाशाने विश्व व्यापले आहे. पण तरीही सूर्यग्रहण काळात राहू सूर्याला गिळतो, त्यावेळी सगळीकडे अंधःकार पसरतो. अशी पौराणिक कथा सांगितली जाते. त्याचप्रमाणे अहंकाररुपी राहू, अथांग स्वयंप्रकाशी परमात्मस्वरुपाला झाकून टाकतो. म्हणजे परमात्मस्वरुप ज्ञान लोप पावून, अहंकाररुपी अज्ञान अंधःकार सर्वत्र पसरतो. अशा वेळी सर्व दिशांना पाहू गेले, तरी अहंकार, अज्ञानाच सर्वत्र जाणवते. तेव्हा विवेकाने खरे-खोटे पारखून नीट काळजीपूर्वक विचार केला, तर असे आढळून येते की, अहंकाराने सद्वस्तू झाकून टाकली आहे. अहंकाराला दूर सारुन परमात्मस्वरुप अनुभवण्यातच, जीवाचे कल्याण आहे. असे हे परमात्मस्वरुप म्हणजे सद्वस्तू, आपल्याला डोळ्यांनी पाहता येईल का? यावर स्वामी म्हणतात,
 
जया चक्षुने लक्षितां लक्षवेना।
भवा भक्षितां रक्षिता रक्षवेना।
क्षयातीत तो आक्षै मोक्ष देतो।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥
 
या श्लोकात ‘क्ष’ या अक्षराचा १२ वेळा विविध प्रकारे उपयोगाने अनुप्रास अलंकार साधला जाऊन, समर्थांचे भाषा प्रभुत्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यात दडलेल्या अर्थासाठी, तो श्लोक पुन्हा पुन्हा शांतपणे वाचावा लागतो.आपल्या ठिकाणी देहबुद्धी प्रबळ असल्याने, आपण आपल्या डोळ्यांनी सर्व काही पाहू शकतो. विश्वातील पदार्थवस्तूंचे ज्ञानही मिळवू शकतो, अशी आपल्या मनाची धारणा झालेली असते. तथापि, परमात्मस्वरुप सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने साध्या डोळ्यांनी पाहू म्हटले, तरी ते शक्य नाही. त्यासाठी ज्ञानचक्षूच हवेत. ज्ञानचक्षूंच्या साहाय्याने ज्ञानबोध झाल्यावर, अज्ञान नाहीसे होते. अज्ञानातून निर्माण झालेल्या अशाश्वत प्रपंच कल्पना, आशा-आकांक्षा नाहीशा होतात. याचा अर्थ शाश्वत परमात्मस्वरुपाचे खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर, आपण चिरंतन सत्याशी जोडले जातो. त्यामुळे आपल्या ठायी असलेला अहंकार व देहबुद्धी मावळल्याने हे दृश्य जगत आणि त्याचे आकर्षण, आपुलकी नाहीशी होते. स्वामींच्या शब्दात सांगायचे, तर इहलोकीच्या कल्पनांचे भक्षण केले जाते. इहलोकीच्या कल्पनांचे रक्षण करावे म्हटले तरी, ते करता येत नाही. कारण ज्ञानाच्या उदयाने अज्ञान नाश पावलेले असते.
 
ज्ञानाच्या ब्रह्मानंदात, इहलोकातील आनंदाच्या कल्पनांचे काही वाटत नाही. इहलोकातील दृश्य स्वरुपाचे सारेकाही अशाश्वतच असते. शाश्वत अर्थात क्षयातीत अशा सद्वस्तूच्या आकलनाने, कायम स्वरुपी अर्थात आक्षै मोक्षाची अवस्था प्राप्त होते. भगवंत हा आपल्या शिष्यांवर, भक्तांवर दया करणारा आहे. त्याच्या दयादक्ष स्वभावामुळे तो साक्षीरुपाने, सतत आत्मज्ञानी पुरुषाच्या मागे उभा राहून त्याचा सांभाळ करतो. असा हा देव आहे तरी कसा, याचा जनमानसातील आढावा घेऊन स्वामी परमात्मस्वरुप स्पष्ट करुन सांगणार आहेत. सर्व साधारणपणे सामान्य माणसांना ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव आणि त्यांची कामे ठावूक असतात. परमेश्वरतत्त्व चिरंतन, शाश्वत असते, त्यामुळे लोकांच्या देव कल्पनांवर स्वामी तार्किक शंका उपस्थित करीत आहेत.
 
विधी निर्मितां लिहितो सर्व भाळीं।
परी लिहिता कोण त्याचे कपाळी।
हरु जाळितो लोक संव्हारकाळीं।
परी शेवटी शंकरा कोण जाळीं॥१७५॥
 
लोकात अशी कल्पना प्रचलित आहे की, विधी म्हणजे ब्रह्मदेव सर्व प्राण्यांचा कपाळावर त्यांचे भविष्य लिहून ठेवतो. येथे स्वामी शंका उपस्थित करतात की, ब्रह्मदेवाला जन्मास घालणारा जो आहे, त्याने ब्रह्मदेवाच्या कपाळी भविष्य लिहिले असेल, मग ते लिहिणारा तो कोण? तसेच विश्वसंहार करणारा शंकर प्रलयकाळी विश्व जाळून टाकतो. मग प्रलयानंतर शंकराला कोण जाळतो? स्वामींचे हे तर्कशास्त्र मोठे अजब आहे. दासबोधातही स्वामींनी सारासार विचाराचे महत्त्व समजावून सांगताना, या स्वरुपाच्या तार्किक शंका उपस्थित केल्या आहेत. दासबोधातील दशक-९, समास-५मध्ये स्वामी म्हणतात,
 
ब्रह्मयाने सकल निर्मिलें।
ब्रह्मयास कोणे निर्माण केलें।
विष्णूने विश्व पाळिलें।
विष्णूस पाळिता कवणु॥(९.५.२४)
रुद्र विश्वसंहारकर्ता।
परी कोण रुद्रास संहारिता।
कोण काळाचा नियंता।
कळला पाहिजे॥(२५)
 
खर्या देवाला कसे ओळखावे हे समजून सांगण्यासाठी, स्वामींनी तर्काचा आधार घेऊन वरील प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आहेत. अहंकाररुपी अज्ञानाने परमेश्वर स्वरुप व्यापले गेले आहे. याच अज्ञानावर देवाविषयी निरनिराळ्या कल्पना प्रचलित आहेत. तेव्हा या तिन्ही देवांना निर्माण करणारा श्रेष्ठ देव निराळा असला पाहिजे, असा तर्क करुन समर्थ त्या श्रेष्ठ देवाचे स्वरुप पुढे स्पष्ट करणार आहेत. पण तरीही जनसामान्यांच्या मनातील आणखी काही कल्पनांचा आढावा समर्थांनी पुढील श्लोकांतून घेतला आहे व त्यावर समर्थक विचार मांडले आहेत. तो भाग पुढील लेखात पाहता येईल.(क्रमशः)
 
 
 
सुरेश जाखडी
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121