मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; तत्काळ काम पूर्ण करण्याचे निर्देश
14-Jan-2025
Total Views |
मुंबई : “महाराष्ट्राची भाग्यरेषा’ अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गालगत ‘अॅग्रो हब’ ( Agro Hub ) उभारले जाणार आहेत. ‘मॅग्नेट’ प्रकल्पाअंतर्गत ही कामे तत्काळ पूर्ण करावीत. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उभाराव्यात. या ‘अॅग्रो हब’साठीचा आराखडा तयार करून सादर करावा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १३ जानेवारी रोजी दिले.
दरवर्षी पणन विभागामार्फत
सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरुपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.
पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणार्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “शेतकर्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी उभारण्यात येणार्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयीसुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभागांत उभारण्यात येणार्या ‘अॅग्रो लॉजिस्टीक हब’चा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी,” आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
नवी मुंबईत ‘महा बाजार’
नवी मुंबई येथे ‘महा बाजार’ उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी दिली. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान २०० ते २५० एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे.
कोकण भागात माशांसाठी, तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनांसाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते २५ कोटी असे उपवर्गीकरण करणार. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ‘अॅग्रो हब’ची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसांत त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही देवरा यांनी सांगितले.