‘नव्या भारता’चा पाक-अमेरिकेला दणका!

    10-Apr-2024
Total Views | 226
modi

भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी पोसलेल्या आपल्या भाडोत्री दहशतवाद्यांचा गूढ मृत्यू आपल्याच देशात होत असल्याचे पाहून पाकिस्तानी सत्ताधार्‍यांची आणि लष्करी नेतृत्वाची गाळण उडाली होती. या हत्या थांबविण्यासाठी, त्यांनी थेट अमेरिकेला यामध्ये घातले खरे; पण खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून तोंड पोळल्यापासून, भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा शहाणपणा अमेरिकेने दाखविला आहे. ‘नव्या भारता’ने अमेरिकेला दिलेला, हा आणखी एक दणकाच म्हणावा लागेल.

ब्रिटनमधील ‘गार्डियन’ या भारतविरोधी वृत्तपत्राने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत भारत परदेशात कथित दहशतवाद्यांची हत्या घडवून आणीत असल्याचे सूचित केले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानात राहून भारतात घातपाती आणि दहशतवादी कारवाया करणार्‍या काही दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या संघटनांमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हत्या पाकिस्तानात घडल्या होत्या. या दहशतवाद्यांना सार्वजनिक ठिकाणी ठार मारून, त्यांचे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या हत्या नक्कीच भारताने घडवून आणल्या असाव्यात, अशी समजूत पाकिस्तानी सत्ताधार्‍यांनी आणि लष्करी नेतृत्वाने करून घेतली होती. ‘गार्डियन’मधील वृत्त हे या गृहीतकावरच आधारित होते. पण, या बातमीत या हत्यांमागे भारतच असावा, हे सिद्ध करणारे कोणतेच पुरावे दिलेले नव्हते किंवा भारतातील गुप्तचर संस्थांतील किंवा सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे दिसून येत नव्हते. थोडक्यात, हे वृत्त भारताबाबत गैरसमज पसरविणारे आणि भारताची बदनामी करण्यासाठी प्रसिद्ध केले होते. भारताच्या परराष्ट्र खात्याने हे वृत्त नाकारले असून, भारतविरोधी दहशतवाद्यांना परदेशात ठार मारण्याचे आपल्या देशाचे धोरण नसल्याचे जाहीर केले आहे. आता अमेरिकेनेही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिल्याने, पाकिस्तान चांगलेच तोंडघशी पडले आहे.

पाकिस्तानने गेली ५० वर्षे भारतविरोधी दहशतवादी संघटना पोसल्या असून, त्यांच्या दहशतवाद्यांनी भारतात हिंसाचाराचे थैमान घातले होते. कसेही करून काश्मीरला भारतापासून तोडण्याचे कारस्थान यशस्वी करणे, हेच प्रत्येक पाकिस्तानी लष्करप्रमुखाचे जीवितकार्य बनले होते. ते काम युद्धाद्वारे किंवा सनदशीर मार्गाने होणार नसल्याने त्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा आश्रय घेतला. पाकिस्तानने काश्मिरी फुटीरतावादी संघटनांची आणि त्यासाठी काम करणार्‍या दहशतवाद्यांची फौजच उभी केली होती. त्यांना शस्त्रास्त्रे आणि निधीचा मुक्तहस्ते पुरवठा केला. जगभरात आपल्या हस्तकांद्वारे भारतविरोधी प्रचारही केला. दुर्दैवाने २०१४ पूर्वी भारताबद्दल प्रेम नसलेल्या नेत्यांच्या हाती देशाची सूत्रे गेली होती आणि त्या नेतृत्वाने भारताविरोधात चाललेल्या या उघड दहशतवादाबाबत मवाळ धोरण स्वीकारले होते. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये या दहशतवादी संघटनांनी आपले बस्तान बसविले होते.सुदैवाने दहा वर्षांपूर्वी भारतीयांनी देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपवून, भाजपला स्वबळावर बहुमत देऊन, त्यांचे हातही बळकट केले. मोदी यांनीही अजिबात वेळ न घालविता, दहशतवादाची नांगी मोडण्यासाठी नोटबंदीसारखी कठोर आणि धाडसी पावले उचलली

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द करून आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करून मोदी यांनी तेथील दहशतदवाद संपुष्टात आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले. या निर्णयामुळे पाकिस्तानचे आजवरचे सारे राजकारणच कोलमडून पडले. आता काश्मीरवरून पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबतच होईल, असे मोदी यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे पाकिस्तानला चडफडत बसण्याखेरीज काहीच करता येत नव्हते. अशातच भारतात दहशतवादी कारवाया घडविणार्‍या काही दहशतवाद्यांच्या पाकिस्तानात हत्या सुरू झाल्या. भर दिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी या हत्या घडविण्यात आल्या असल्या, तरी त्यांच्या हल्लेखोरांचा अजूनपर्यंत काही पत्ताच लागलेला नाही. या सार्‍या घटनांमुळे पाकिस्तानातील मुलकी आणि लष्करी नेतृत्वाची चांगलीच कुचंबणा झाली. शेवटी पाकिस्तानने अमेरिकेमार्फत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी ‘नव्या भारता’ची ओळख पटलेल्या अमेरिकेने याबाबत काहीही भूमिका घेण्यास नकार दिला आहे.

मोदी आणि त्यांचा ‘नवा भारत’ ही नक्की काय चीज आहे, याचा अंदाज अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांना आला नव्हता. कोविडच्या साथीत मात्र मोदी यांचा भारत नेमका कसा आहे, त्याची झलक पाश्चिमात्य राष्ट्रांना दिसली. कोविडसारख्या वैश्विक महामारीचा ज्या धैर्याने आणि कमीत कमी मनुष्यहानी करीत भारताने जो मुकाबला केला, त्यावरून भारताच्या अंतर्गत सामर्थ्याची खात्री जगाला पटली. या महामारीच्या काळात पाश्चिमात्य देशांची कमी दर्जाची आणि बेभरवशाची लस घेण्यास भारताने सरळ नकार दिला आणि स्वत:च्या ताकदीवर लस विकसित केली. ही लस अतिशय प्रभावी आहे, हे आता तीन वर्षांनंतरही सिद्ध झाले आहे. केवळ आरोग्यविज्ञानाशी संबंधित नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संघर्षातही भारताने आपली स्वतंत्र छाप उमटविली आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने घेतलेली भूमिका आणि या दोन्ही देशांनी भारताच्या विनंतीला दिलेला मान यावरून जगाने आता या ‘नव्या भारता’शी संबंधित घटनांमध्ये सावध भूमिका घेतली आहे. म्हणूनच युद्धकाळातही भारताने जागतिक निर्बंधांची पर्वा न करता, रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आयात करण्याचे धोरण कायम राखले असून, अमेरिका व अन्य पाश्चिमात्य देश याबाबत मौन बाळगून आहेत.

मध्यंतरी कॅनडा या एरवी भारतीयांच्या खिजगणतीत नसलेल्या देशाने कॅनडात राहणार्‍या शीख दहशतवाद्याच्या हत्येत थेट भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. अमेरिकेनेही या आरोपाची पुष्टी करून, याबाबत वस्तुस्थिती काय आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी भारताकडे केली होती. त्यामागे भारताला नमविण्याचा सुप्त हेतू होता. पण, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात ठाम आणि कणखर भूमिका घेऊन या भारतविरोधी प्रचाराला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी या हत्येत भारताचा हात असल्याचे पुरावे कॅनडाकडे मागितले; पण कॅनडा ते पुरावे देऊ शकला नाही. तेव्हा अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली.अगदी दोन दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला चोख दम भरला. “भारतात हिंसाचार करून, हे दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेत असतील, तर भारत त्यांचा पाकिस्तानात पाठलाग करून, त्यांना ठार मारील,” अशी गर्जना राजनाथ सिंह यांनी केली आहे. राजनाथ सिंह यांच्या या दमदार वक्तव्याने मोदी यांचा नवा भारत काय आहे, याची पुरेशी कल्पना अमेरिकेला आली असल्यानेच, त्या देशाने आता भारताला काश्मीरबाबत कोणताही सल्ला न देण्याची आणि हा प्रश्न भारत-पाकिस्तानने परस्पर चर्चा करून सोडविण्याची भूमिका घेतली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121