शैक्षणिक क्षेत्राबरोबरच नाट्यक्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणार्या, नाटकांसाठीच जीवन समर्पित केलेल्या अपर्णा पेंडसे या कलाव्रतीविषयी आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...
आयुष्याच्या रहाटगाड्यात आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून, आवडीच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणे, हे तसे कष्टसाध्यच. पुण्याच्या अपर्णा पेंडसे गेली ३४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाय त्या कलाकार आहेत. वाचन, नृत्य, गायन, नाटक, लेखन, दिग्दर्शन अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांना रुची. एकांकिकांचाही दांडगा अनुभव. लहान असताना त्यांनी शाळेत ‘कोंबड्याचा तुरा’ नावाचे एक नाटक लिहिले आणि बसवलेही होते. अभिनयासोबतच नाट्यसंहितांचे लेखन, दिग्दर्शन केले आणि यापुढेही अशा अनेक उपक्रमांत सहभागी होण्याचा त्यांचा मनोदय आहे.अपर्णा गेली ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्राथमिक विद्यालय या त्यांच्या शाळेत त्यांनी भरपूर उपक्रम आयोजित केले. मुलांसाठी आपण काय करू शकतो, असा विचार त्या सुरुवातीपासून सतत करीत आल्या. मुलांना समजावताना, त्यांना जागेवरच गोष्टी रचून सांगायला लागल्या. या पद्धतीतून आपल्याला गोष्ट लिहिता येते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समूहगीत, लोकनृत्ये अशा अनेक स्पर्धांसाठी मुलांची तयारी करून घेतली. शाळेत अनेक मुले आर्थिकदृष्ट्या पिछाडीवरच्या वर्गातली होती. त्यांच्यापैकी अनेकांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मदतही केली. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी असली, तरी मुलांनी कलागुणांच्या स्पर्धांमधून भाग घ्यावा, यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले, त्यांची तयारी करून घेतली.
अन्य शाळांनी घेतलेल्या स्पर्धांमध्ये भागही घेतला. काही वेळा वेगवेगळी बक्षिसे मिळवली. शालेय जगतातील कामगिरीबद्दल त्यांना दोन संस्थांनी ’आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविलेदेखील आहे.अपर्णा पेंडसे यांच्या नाट्य क्षेत्रातील वाटचालीची सुरुवात महाविद्यालयात झाली. त्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील स्वाध्याय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिथे त्यांनी एक नाट्यीकरण तयार केले. मोठ्यांसाठी नाटक लिहावे, हे या उपक्रमानंतर त्यांना सूचले. त्या सांगतात की,” ‘स्वाध्याय’चे संचालक दिलीप महाजन यांना अपर्णा नाट्य क्षेत्रात काही करू शकतात, हे लक्षात आले असावे. एकदा ’भरत नाट्य मंदिरा’शी संबंधित असलेले दत्ताभाऊ लिमये यांच्याकडून भूमिकांसाठी कलाकारांची विचारणा झाली, तेव्हा त्यांनी अपर्णा यांचे नाव सूचवले. तिथून पुढे ‘भरत’च्या रंगभूमीवरचा वावर वाढला. आजही या संस्थेसाठी त्या कार्यरत आहेत.तत्पूर्वी ‘स्वाध्याय’मधील त्यांच्या नाटकाच्या उपक्रमाविषयी मित्र-मैत्रिणींना कळले. सगळ्यांनी कौतुक केले, यात पुढे काही करावे, यासाठी आग्रह धरला. त्यांना एका कार्यशाळेविषयी माहिती दिली. सगळ्यांनी सूचवल्यावर, त्यांनी कुतूहलापोटी नवीन काही करायला मिळते आहे, या उत्सुकतेतून ती कार्यशाळा केली. ‘क्षितीज नवे’ या ग्रुपने ती आयोजित केली होती. त्यानंतरही अनेकदा त्यांनी या ग्रुपच्या उपक्रमात सहभाग नोंदवला.
’भरत नाट्य मंदिर’ आणि इतर संस्थांसोबत त्यांनी विविध एकांकिका, नाटके, चित्रपट इत्यादींसाठी अनेक भूमिका आजवर साकारल्या आहेत. ’वसुधा क्रिएशन’तर्फे ‘अशांती पर्व’ या नाटकात भार्गवीच्या भूमिकेसाठी त्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ‘कामगार कल्याण’च्या स्पर्धेत त्यांनी लिहिलेले बालनाट्य ’कोंबड्याचा तुरा’ या एकांकिकेला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, संघाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. याच स्पर्धेत खुल्या गटात ’ओळख’ या त्यांनी लिहिलेल्या एकांकिकेसाठी दिग्दर्शनाबद्दल व संघाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. योगेश सोमण लिखित ‘स्त्रीसूक्त’ या नाटकात सूत्रधाराची महत्त्वाची भूमिकाही त्यांनी निभावली आहे. ’मराठी रंगभूमी ः कलाद्वयी’सोबत आठ-दहा संगीत नाटकेही केली. त्यात सखीसारख्या भूमिका केल्या. ’भरत नाट्य मंदिर’च्या ‘मी मुख्यमंत्री झालो’ नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली. आता यापुढे ‘भरत’च्या माध्यमातून काही उपक्रम करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.अगदी अलीकडे २०२२च्या उन्हाळ्यात त्यांनी ‘दर्श कलामंच’ या नावाने स्वतःची संस्था सुरू केली. गेल्या सव्वा ते दीड वर्षांत दोन वेळा बालनाट्यांचे प्रयोग केले. २०२३ साली लहान मुलांची नाटकाची कार्यशाळा त्यांनी मुलगा ओंकार पेंडसे यांच्यासह आयोजित केली होती. बालगीते लोप पावत चालली आहेत, ती पुन्हा प्रकाशात आणण्याच्या उद्देशाने बालगीतांच्या कार्यक्रमाची आखणी करून, दोन वेळा बालगीतांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी लिहिलेल्या एका नाटकाचे अभिवाचन केले. तसेच अगदी अलीकडे यंदाच्या ’राज्य नाट्य स्पर्धे’त दोन अंकी नाटकात प्रमुख भूमिका केली आहे.
अपर्णा पेंडसे यांना सगळ्या वाटचालीत मित्र-मैत्रिणींचे प्रोत्साहन होते, घरच्यांचा खूप पाठिंबा होता. नाटकासाठी कधी दौर्यांवर जायची वेळ आली, तरी सर्वांनी सांभाळून घेतल्यामुळे, घराबद्दल चिंता नसायची. मुलानेही खूप पाठिंबा दिला. आपली काळजी न करता, आईने हे करीत राहावे, यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. शाळेतल्या संपूर्ण कार्यकाळातील सर्व मुख्याध्यापकांनी आणि सहशिक्षकांनी खूप सांभाळून घेतले. अनुपस्थितीच्या वेळी त्यांचे वर्ग वाटून घेण्यापासून मदत केली. मुख्याध्यापिकांनीही यातून शाळेच्या मुलांचाही कलाक्षेत्रात सहभाग वाढतो, बक्षिसे मिळाल्याने शाळेचेही नाव होते, असे सांगत प्रोत्साहनच दिले, त्यामुळे या सर्वांबद्दल तसेच ’भरत नाट्यसंशोधन मंदिर’, ‘कलाद्वयी’, ‘वसुधा क्रिएशन्स’ या व अशा सगळ्या संस्थांबद्दल, तेथील सहकलाकार, संधी देणारी मंडळी या सर्वांबद्दल अपर्णा कृतज्ञता व्यक्त करतात. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!