जयपूर : राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. कारण राजस्थानमध्ये दि.१९ मार्च रोजी रात्री उशिरा धार्मिक मिरवणुकीवर कट्टरपंथींनी हल्ला केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही पाचारण करून घटनास्थळी तैनात करण्यात आले.
जिल्हाधिकारी आलोक रंजन म्हणाले, ' दि.१९ मार्चला रात्री हिंदूंची धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती. पंरतु कट्टरपंथींनी मशिदीजवळून जाणाऱ्या मिरवणुकीवर आक्षेप घेतला. दरम्यान दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. ज्यानंतर कट्टरकपंथींकडून दगडफेक करण्यात आली. त्यात १२ हून अधिक लोक जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूचे प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. श्याम लाल छिपा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक सुधीर जोशी म्हणाले, 'विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून १८ जणांना अटक करण्यात आली आहे. वातावरण बिघडवणाऱ्या इतर लोकांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक केली जाईल. वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. चित्तोडगड जिल्हा मुख्यालय आणि उदयपूर येथील अतिरिक्त पोलीस कर्मचारीही येथे तैनात करण्यात आले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र परिस्थिती बिघडली तरी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे.