आज रविवार, दि. ३ मार्च रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण तामिळनाडूतील ‘सेवा भारती’ आणि केरळमधील ‘भारतीय विचार केंद्रम्’ या संस्थांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा संपन्न होईल. त्यानिमित्ताने जनकल्याण समितीसह ‘सेवा भारती’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम्’ यांच्या सेवाकार्याची ओळख करुन देणारा हा लेख...
‘विजया एकादशी’ हा श्रीगुरुजींचा जन्मदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून, रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्यावतीने ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. यावर्षी २९वा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. देशव्यापी स्तरावरचा हा पुरस्कार यंदा ‘सेवा भारती,’ दक्षिण तामिळनाडू व ‘भारतीय विचार केंद्रम्,’ केरळ या संस्थांना दिला जाणार आहे.
श्रीगुरुजींची शिकवण
पूजनीय श्रीगुरुजी अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्याकडून त्यांच्याकडे संघाचे दायित्व आले. सरसंघचालकपदाच्या १९४० ते १९७३ या ३३ वर्षांच्या कालावधीत आपल्या देशाची सुमारे ५०हून अधिक वेळा परिक्रमा करत, देशाच्या कानाकोपर्यात संघकार्य श्रीगुरुजींनी पोहोचवले. प्रखर बुद्धिमान, उच्च कोटीच्या आध्यात्मिक साधनेचे धनी असलेल्या श्रीगुरुजींनी संघकार्याच्या माध्यमातून आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी समर्पित केले. संघकार्य संपूर्ण देशभर तर पसरलेच, त्याचबरोबर समाजजीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षेत्रांत काम करणार्या अनेक संघटना श्रीगुरुजींच्या कार्यकाळात सुरू झाल्या. विश्व हिंदू परिषद, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘किसान संघ’, ‘राष्ट्रीय सुरक्षा मंच’ यांसारखी विविध संघटने पूजनीय गुरुजींच्या प्रेरणेने सुरू झाली. त्या-त्या क्षेत्रांत काम सुरू करताना, समाजामध्ये असलेल्या दोषांचे उच्चाटन करायचे, समाजातल्या सर्व घटकांना स्वावलंबी, स्वाभिमानी बनवायचे आणि तेही अत्यंत निरपेक्ष भावनेने आणि समाजावर प्रेम करायचे, ही गुरुजींची शिकवण, या सर्व संघटनांनी आपल्या कामातून प्रत्यक्षात आणली. आपल्या समाजातील दीनदुबळ्या, अन्यायग्रस्त, पीडित बांधवांची सेवा करण्याचा मंत्रही श्रीगुरुजींनी स्वयंसेवकांना दिला. ‘नरसेवा हीच नारायण सेवा’ या मंत्राचा जागर करत, हजारो सेवाकार्ये सुरू झाली.
‘जनकल्याण समिती’ची सेवाकार्ये
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे महाराष्ट्रात सर्वदूर ग्रामीण, दुर्गम भागात, वनवासी भागात ‘जनकल्याण समिती’ची १८७० सेवाकार्य आज चालवली जात आहेत. कुपोषणाच्या समस्येवर मात करणार्या ‘पूरक पोषक आहार योजने’पासून आरोग्य रक्षक, फिरती रुग्णालये, साप्ताहिक दवाखाना शिकवणी वर्ग, संस्कार वर्ग, बचत गट, कौशल्य शिकवणारे विविध अभ्यास वर्ग, प्रगत शेतीचे, ग्रामविकासाचे विविध प्रयोग, फिरती विज्ञान प्रयोगशाळेपर्यंत अशी अनेकविध सेवाकार्य, सेवा उपक्रम ’जनकल्याण समिती’तर्फे महाराष्ट्रात सुरू आहेत. याचबरोबर ‘जनकल्याण समिती’ची मुख्य ओळख आहे ती म्हणजे, आपत्ती निवारणात काम करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून. ‘जनकल्याण समिती’चे नऊ मोठे प्रकल्प आज महाराष्ट्रात उभे आहेत. समाजाच्या दातृत्व शक्तीतून उभ्या राहिलेल्या, या प्रकल्पांच्या माध्यमातून ‘जनकल्याण समिती’ समाजोपयोगी असंख्य कामे करत आहे.
‘त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये’ या भावनेने हे सारे काम केले जाते. समाजाला आश्वस्त करणार्या कामाचे एक उदाहरण म्हणजे, ’जनकल्याण समिती’च्या रक्तपेढीतून रक्तदानासारखे व संकलित झालेले रक्त अत्यंत वेळेवर व शुद्ध स्वरुपात रुग्णाला दिले जाते. हे तर नित्याचे काम आहेच; पण शरीरात पेशींचा दुर्धर आजार झालेल्या शेकडो थॅलेसेमियाच्या मुलांच्यासाठी संपूर्णपणे मोफत रक्तपुरवठा गेली अनेक वर्षं केला जात आहे. ‘जनकल्याण समिती आमचे एकमेव खूप मोठे आधाराचे स्थान आहे,’ असा प्रेमाचा हृदय सन्मानही या रुग्ण मुलांच्या आई-वडिलांकडून ‘जनकल्याण समिती’ला मिळाला आहे.कला, क्रीडा, साहित्य, सेवा, महिला सक्षमीकरण, संशोधन, ग्रामविकास यांसारख्या दहा विषयांमध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणार्या व त्याचा समाजासाठी खूप मोठा उपयोग केला आहे. अशा व्यक्ती किंवा संस्था यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो.
भारतीय विचार केंद्रम्
यंदाचा वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कार ‘भारतीय विचार केंद्रम्’ या संस्थेला प्रदान केला जाणार आहे. वाङ्मय क्षेत्रातील अत्यंत उल्लेखनीय व समाजोपयोगी काम करणारी ही संस्था. केरळमध्ये १९८२ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. संघाचे प्रचारक आणि विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती कार्यकर्ते पी. परमेश्वरन यांनी ही संस्था सुरू केली. उच्च कोटीचे चिंतक, राष्ट्रप्रेमी असलेल्या परमेश्वरनजी आणि त्यांच्याबरोबरीच्या कार्यकर्त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात ‘भारतीय विचार केंद्रम्’च्या माध्यमातून अनेकविध समाजोपयोगी उपक्रम केले.देश, धर्म, संस्कृती, साहित्य, वाङ्मय, समाजावरील प्रेम, आपुलकी, जीवन, श्रद्धा या भारतीय जनमानस उभा करणार्या संकल्पनांनाच जणू विरोध असलेल्या भूमीमध्ये संस्कृती रक्षणाचे कार्य साहित्याच्या माध्यमातून करायचे, हे खूप मोठे धाडसाचे काम ‘भारतीय विचार केंद्रम्’ने केरळमध्ये केले आहे.
सेवा भारती दक्षिण तामिळनाडू
सेवेच्या क्षेत्रातील पुरस्कार ‘सेवा भारती,’ दक्षिण तामिळनाडू या संस्थेला प्रदान केला जाणार आहे. समाजावरील निस्सीम प्रेमातून आणि ‘नरसेवा हीच नारायण सेवा’ हे तत्त्व अंगीकारून, सुमारे आठ हजारांहून अधिक सेवाकार्य करणार्या ‘सेवा भारती’ संस्थेचा सन्मान होत आहे. त्यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान होत आहे. तामिळनाडू राज्यातील दक्षिण भागात ‘सेवा भारती’ संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र आहे. ३१ जिल्ह्यांमध्ये संस्थेची आठ हजार सेवाकार्य चालतात. शेकडो कार्यकर्ता बंधूभगिनी अत्यंत निरलसपणे स्वयंसेवी भावनेतून हे सेवा काम अनेक वर्षं करत आहेत. एकट्या कन्याकुमारी जिल्ह्यात अत्यंत गरीब, कष्टकरी महिलांसाठी तीन हजार बचत गट चालवून या मातृशक्तीला स्वावलंबी, आनंदी आणि स्वाभिमानी बनवणार्या या अनोख्या सेवाकार्याचे दर्शन अतिशय प्रेरणादायी आहे.‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळा अनुभवण्यासाठी या कार्यक्रमाला येण्याचे आपण सर्वांना विनम्र आवाहन.
शैलेंद्र बोरकर
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख आहेत.)