नाशिक : मनुष्य घडवणे, संस्कार करणे ही एक निरंतर प्रक्रीया आहे. ती अविरतपणे सुरुच असते. पण आजच्या काळात वर्तवणूकीसंबंधीचे नम्रता, कर्तव्य, कर्तृत्वासारखे घटक हे मनुष्यात क्वचितच आढळतात. त्यामुळे संस्काराबरोबरच वर्तवणूकशास्त्रातील (बिहेव्हिरियल सायन्स) या घटकांना प्राधान्य देत संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवायला हवे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भोसला कॉलेजच्या नुतन वास्तू प्रवेश आणि डॉ. मुंजे इन्टीट्युटच्या बोधचिन्हाचे अनावरण त्यांच्या हस्ते पार पडले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसमध्ये सकाळी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे, संस्थचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, कार्याध्यक्ष अँड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, कार्यवाह मिलिंद वैद्य, सहकार्यवाह आनंद देशपांडे, कोषाध्यक्ष राहुल वैद्य, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, मार्गदर्शक प्रकाश पाठक आदी उपस्थित होते.
भोसला कॉलेजच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन!
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. भोसला मिलिटरी कॉलेजच्या नुतनीकरण वास्तूच्या पाहणीनंतर डॉ. मुजे इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड स्टडीज मधील औडीटोरियम येथे त्यांच्याहस्ते नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या नव्या लोगोमध्ये कमळाच्या पाकळ्या व सूर्य यांचा मिलाप झालेला दिसत आहे. उगवता सूर्य अर्थातच एक नवे युग, ज्ञानाचे युग यांचे हे प्रतिक आहे. अज्ञानाचा अंधकार हा केवळ ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करता येतो ही त्यामागील संकल्पना आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसह पांडे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जबाबदारी असलेले संयुक्त राष्ट्रीय मंत्री महेश दाबक, डॉ. अनिल कुलकर्णी, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, डॉ. अवस्थी, डॉ. मुंजे इन्स्टीट्युटचे अध्यक्ष डॉ. अजित भांदक्कर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्यासारख्या दृरदृष्टीकोन असणाऱ्या महान व्यक्तीमत्वाने ही संस्था स्थापन केली. युवकांमध्ये कवायत, कसरतीच्या जोडीला साहसी वृत्ती निर्माण व्हावी तसेच ते देशभक्ती, राष्ट्रनिष्ठेच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सैन्यदलात सामील व्हावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता. संस्थाही हाच विचार घेऊन कार्य करत आहे, याबद्दल खूप आनंद वाटतो.”
ते पुढे म्हणाले की, “२०३५चा आपण विचार करू त्यावेळी जगात बहुतांश देशातील जनता ही जेष्ठत्वाकडे झुकलेली आपल्याला पहायला मिळेल. भारतात मात्र विविध क्षेत्रात युवापिढी सक्रीयपणे काम करत असेल. हे आशादायी चित्र लक्षात घेऊनच परदेशातील लोकांना आपले युवक, त्यांनी केलेले संशोधन हवे आहे. गेल्याच आठवड्यात जर्मनीचे शिष्टमंडळ सरकारकडे आले होते. त्यांच्याबरोबर सामजस्य करार झाला असून त्यातून चार लाख भारतीयांना नोकरी व इतर संधी मिळणार आहे. जर्मनी, जपानसारखे असंख्य देशांना भारतीय युवक त्यांचे संशोधन हवे आहेत त्यामुळे पुढील काळ हा भारतीयांचाच असेल हे विसरू नये,” असेही ते म्हणाले.
सैनिकी शिक्षणाबरोबरच इतरही शिक्षण द्यावे!
“सीएचएमई संस्था ही सैनिकी शिक्षण,शस्त्र हाताळण्याचे शिक्षण देऊन युवापिढी घडवते ही चांगलीच बाब आहे, असे नमूद करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संस्थेला भव्य कॅम्पस लाभला आहे. त्याचा जरूर फायदा उठवावा. सैनिकी शिक्षणाच्याजोडीला शस्त्रनिर्माण करावे (मॅन टू मशिन पावर) विविध प्रयोग करून वर्तुणूक शास्त्राबाबतचा अभ्यासक्रम राबविण्यास हरकत नाही. ती काळाची गरज आहे. आज सर्वदुर तुला काय करायचे. तुझं बघ सारखी वृत्ती दिसून येत आहे. मोठा हो बापाला मार, मुलांचा विचार करू नको सारखे दुर्गुण टाळण्यासाठी हिंदूत्वाचे संस्कार देणारी, आपल्याबरोबरच इतरांनाही मोठे होण्यास प्रोत्साहन देणारी पिढी घडवावी, तसे अभ्यासक्रम राबवावे,” अशी सूचना त्यांनी केली.