मुंबई : उल्हासनगर हल्ला प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य कारवाई करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोलपर्यंत जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते कोराडी येथे माध्यमांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी घेतलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या जीवावर आले म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले, असे गायकवाड म्हणत आहेत. सखोल चौकशी झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही. चूक कुणाचीही असली तरी, असे अपेक्षित नाही. हे संस्कार आपले नाहीत. समाजाला यातून वाईट संदेश जातो, समाजापर्यंत वाईट संदेश पोहोचू नये. यात ज्याची चूक असेल त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अशा घटनांमुळे पक्षाची काही प्रमाणात बदनामी होते. मात्र चौकशी होऊन घटना समजून घेतली जाईल. विरोधी पक्षाचे कामच राजीनाम्याची मागणी करण्याचे आहे," असेही ते म्हणाले.