थोरले अन् धाकले कांगारूपुढे थकले (की काय!)

    18-Feb-2024
Total Views | 93
Australian sports team names and mascots

नुकत्याच पार पडलेल्या, १९ वर्षांखालील पुरूष क्रिकेट ‘विश्वचषका’च्या स्पर्धेतदेखील ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. त्यानिमित्ताने ऑस्ट्रेलियन मनुष्याच्या जीवनात खेळाला असलेले महत्त्व, त्याचप्रमाणे भारताची क्रिकेटमधील सद्यःस्थिती याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...

मनुष्यप्राण्याला कांगारूपेक्षा वेगाने धावणे शक्य आहे का? याचे उत्तर अर्थातच नाही, असेच असेल. जगातील सर्वात लहान आणि लोकसंख्येची घनता सर्वांत कमी असलेले खंड आणि राष्ट्रमंडळ देशांमधील महत्त्वाचा असलेल्या, देशाचे प्रतीक चिन्ह असलेला हा कांगारू. ऑस्ट्रेलियन क्रीडा संघांच्या नावांमध्ये आणि शुभंकरांमध्ये उड्या मारताना दिसतो.

नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडात भारतीय क्रीडापटू सध्या अशाच अशीच झेप, ’अब की बार सौ पार’सारखे आपले लक्ष्य, आपली मंजिल निर्धारित करत आहेत व हा बदल स्वागतार्हच आहे. अशाच तर्‍़हेने देशाचा गौरव वाढवण्यात अग्रेसर असलेले, जागतिक स्तरावरचे नाव ऑस्ट्रेलियाचेही आपल्याला घेता येईल. ऑस्ट्रेलियन मनुष्याच्या जीवनात खेळाला फार मोठे स्थान आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा ऑस्ट्रेलियात क्रीडाविषयक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची धडपड दिसून येते आणि किमान एका खेळात प्रावीण्य वा कौशल्य प्रत्येकाने संपादिले पाहिजे, अशी अपेक्षा बाळगण्यात येते. मैदानी खेळांचे प्रमाण ऑस्ट्रेलियातील अनुकूल हवामानामुळे मोठे आहे. कौशल्य मिळविण्यासाठी सर्व तर्‍हेच्या सोईसुविधा पुरवल्या जात असल्याने, आंतरराष्ट्रीय पटलावर ऑस्ट्रेलियनांनीही नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आपल्याला दिसून येईल.

टेनिस, जलतरण, हॉकी, क्रिकेट या खेळांत ऑस्ट्रेलिया अग्रगण्य समजला जातो. हे यश या देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत लक्षणीय आहे. ऑस्ट्रेलियन क्रीडापटूंना मिळणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन, खेळाडूंची नैसर्गिक क्षमतेबरोबरच त्यांना फायद्याचा असलेला निसर्ग, घोड्यांचा अधिक वापर, क्रीडेला हवे असणारे हवामान, उत्कृष्ट आहार यांमुळे ऑस्ट्रेलियाला क्रीडा क्षेत्रात भव्य यश मिळविणे शक्य झाले आहे. ’ऑलिम्पिक’ सामने व जागतिक स्पर्धा यांकरिता विविध क्रीडा प्रकारांसाठी ऑस्ट्रेलिया आपली पथके नेमाने पाठवितो. १९५६ साली मेलबर्न येथे त्यांनी ’ऑलिम्पिक’चे यशस्वी आयोजनही करून दाखवले आहे. क्रिकेट व हॉकी हे खेळ पुरूष व स्त्रिया अशा दोहोंमध्येही ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये प्रिय आहेत. भारतात सध्या फेब्रुवारी २०२४ मध्ये महिलांचे राउरकेला येथे तर भुवनेश्वर येथे पुरुषांचे ’एफआयएच’ (आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ) आयोजित हॉकी प्रो-लीग आंतरराष्ट्रीय सामने चालू आहेत. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा चमू भारतीय चमूच्या वरचढ झालेला दिसून आला आहे. भारत, पाकिस्तान अशा देशांच्या हॉकी संघांना प्रशिक्षण देण्यासाठी, आमंत्रण मिळवण्यात, माजी ऑस्ट्रेलियन हॉकीपटूंचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
 
ऑस्ट्रेलियन प्राणी वर्गातील कांगारूंना जरी कोणी पराभूत करू शकत नसले, तरी क्रीडा क्षेत्रात त्याच कांगारूंच्या देशाला आपण आजपर्यंत अनेक क्रीडा प्रकारांत हरवून, मागे टाकून दाखवले आहे. युवकांच्या (ज्युनिअर) जागतिक हॉकी क्रमवारीत भारत आज दुसर्‍या स्थानावर आहे, तर ’कूकाबुराज’ या टोपणनावाचा पुरुषांचा ऑस्ट्रेलियन संघ मात्र आठव्या स्थानावरच आहे. अगदी क्रिकेटमध्येदेखील. २०२४चे युवक क्रिकेटचे विजेतेपद कांगारूंनी आपल्या पोटातील पिशवीत टाकले असले, तरी आज ऑस्ट्रेलिया भारताच्या मागेच आहे.

कूकाबुराज

ऑस्ट्रेलिया आणि क्रीडाविश्व असे आठवले की, डोळ्यासमोर येतो, तो किंगफिशरसारखा ’कूकाबुरा’ नावाचा पक्षी. ‘कूकाबुरा तृतीय’ नावाची १९८७ साली एक नौका होती. त्या नौकेने ऑस्ट्रेलियाचे नाव नौकानयन स्पर्धेत प्रसिद्ध केले होते. एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतही कूकाबुरा हा ऑस्ट्रेलियन बनावटीचा चेंडू आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जातो. ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स इक्विपमेंट कंपनी ’कूकाबुरा स्पोर्ट’ या पक्ष्याच्या नावाने आज प्रसिद्ध आहे. मेलबर्न ’ऑलिम्पिक’पर्यंत लाल रंगाचे पारंपरिक चेंडू खेळात वापरले जात होते. त्या ’ऑलिम्पिक’ स्पर्धेत हॉकीसाठी पहिल्यांदा पांढरे चेंडू वापरले होते. त्या पांढर्‍या चेंडूवर भारताने पाकिस्तानवर १-० अशी मात करत, सुवर्णपदक मिळवले होते. ते चेंडू ’कूकाबुरा’ नावाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीने बनवले होते. त्याच कंपनीत बनवलेले चेंडू १९७७-७८ सालच्या कॅरी पॅकर (सर्कस) क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. तेव्हा रिची बेनो, ग्रेग व इयान चैपल या दिग्गज क्रिकेटपटूंनी कूकाबुरा चेंडूची पाठराखण केली होती. भारतात मात्र ’एसजी’ नावाच्या कंपनीचे चेंडू कसोटीत वापरले जातात.

हेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट, भारतीय क्रिकेटला नेहमी टक्कर देत असते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तफावत आता दिवसेंदिवस कमी होत आहे. आज भारत जागतिक क्रिकेट पटलावर अग्रगण्य असला, तरी भारताला ऑस्ट्रेलियाकडून सांभाळून राहिले पाहिजे आणि भारताने गाफील राहून चालणार नाही. आजकाल आपल्याला क्रिकेटमध्ये तर हे ठळकपणे दिसून येत आहे.
थोरल्यांच्या पावलावर धाकल्यांचे पाऊल...
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची १९ वर्षांखालील दर दोन वर्षांनी खेळवली जाणारी क्रिकेट ’विश्वचषक’ स्पर्धा सर्वप्रथम १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियातच खेळवली गेली होती आणि ती यजमान संघानेच जिंकली होती. तेव्हापासून आता आपण आजपर्यंतच्या १५ आवृत्त्यांमधील १९ वर्षांखालील पुरूष क्रिकेट ’विश्वचषक’ विजेत्यांची आणि उपविजेत्यांची संपूर्ण यादी समोरील तक्त्यात दिली आहे.

 
असे ऑस्ट्रेलियाला चार वेळेसच विजेतेपद मिळवता आले आहे. मोहम्मद कैफचा संघ २०००, विराट कोहलीचा संघ २००८, उन्मुक्त चंदचा संघ २०१२, पृथ्वी शॉचा संघ २०१८ आणि यश दुलचा संघ २०२२ अशा स्पर्धांमध्ये पाच वेळा भारत जिंकला आहे. असा भारताचा युवा संघ १५व्या आवृत्तीत जेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी उतरला होता. काही महिन्यांपूर्वीच १९ वर्षांखालील ’आशिया चषका’ची अंतिम फेरी गाठू न शकलेला, आपला युवा संघ शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ला दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेल्या, स्पर्धेत अंतिम सामन्यात उतरण्याआधी चांगल्याच लयीत असल्याचा दिसत होता.
पण, स्पर्धेची सांगता मात्र दि. ११ फेब्रुवारी २०२४ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत देऊन, उपविजेतेपद प्राप्त करत झाली. त्या आधीच्या लढतीत, याच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर निसटता विजय मिळवत, अंतिम फेरी गाठली होती. ते आव्हान पेलताना, तेव्हा खरे तर कांगारूंची दमछाक झाली होती. नाही तर आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाक आपल्याला आव्हान देत, उभा राहिलेला आपल्याला दिसला असता. कांगारूंना नमवण्याऐवजी पाकला नमवण्याचा आनंद भारतीयांनी तेव्हा गमावला.
 
ऑस्ट्रेलियाकडून भारताला गेल्या वर्षभरातच तीन स्पर्धांमध्ये हार स्वीकारायला लागली होती. २०२३च्या ’जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून, पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर दुसरी हार होती, एकदिवसीय ’विश्वकरंडक’ स्पर्धेतील आणि तिसरा पराभव होता, हा दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथील भारतीय युवकांचा.
काही महिन्यांपूर्वीच नोव्हेंबर २०२३ मध्ये तब्बल १ लाख, ३० हजार क्रिकेट रसिकांनी अनुभवलेल्या, नव्याने तयार केलेल्या नरेंद्र मोदींच्या नावावर असलेल्या अहमदाबादच्या क्रीडागारात रोहित शर्माच्या वरिष्ठांच्या संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करून, चषक पटकावता आला नव्हता. अहमदाबादच्या क्रीडागाराच्या आधी ऑस्ट्रेलियातील ’मेलबर्न क्रिकेट स्टेडियम’वर सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा विक्रम होता.
 
आता उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय युवकांच्या संघाने रोहित शर्माच्या पराजयाचा बदला घेत, ते उट्टे काढायचे ठरवले होते आणि त्यानुसार थोरांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला लढत देण्याचा निष्फळ प्रयत्न धाकट्यांनी केला. नियतीत विजय नव्हता आणि युवकांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय मुळाचा ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंगनेही शानदार अर्धशतक त्यात झळकावले होते. अवघ्या तीन धावांत तंबूत परत गेलेला, महाराष्ट्राचा अर्शिन कुलकर्णीने सगळ्यांना नाउमेद करण्याची सुरुवात केली. नंतर जो काही तरी करेल, असा ज्याच्यावर आशा होत्या, तो सचिन धस या दोनही मावळ्यांनी तसेच मुंबईकर मुशीर खान २३ धावांत आणि अगदी कर्णधार उदय सहारन आठ धावांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे जणू नांगीच टाकली. सलामीवीर आदर्श सिंह याने ७७ चेंडूत ४७ धावांची संयमी खेळी केली आणि मुरूगन अभिषेक तळाला येऊन, ४६ चेंडूत ४२ धावा काढल्या होत्या. हे बघत ऑस्ट्रेलियाने तो चषक आपल्या हाती घेत, भारताची उपविजेतेपदावर राहण्याची वेळ २००६, २०१६, २०२० नंतर परत एकदा २०२४ मध्ये कशी पटकन आली, ते कळलेपण नाही आणि सात बाद २५३ विरुद्ध केवळ १७४ धावांत अख्खा भारतीय संघ ४३.५ षटके खेळून चुपचाप १९ वर्षांखालील विश्वविजेतेपदाला गवसणी घालणार्‍या, ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करायला ओळीत उभा राहीला.

या आधी जानेवारी २०२३ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालच्या महिला संघाने १९ वर्षांच्या शेफाली वर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदाच झालेल्या, टी-ट्वेंटीच्या विश्वचषक स्पर्धेचे अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून, विजेतेपद मिळवत इतिहास रचला होता.\ श्रीलंका या १९ वर्षांखालील स्पर्धेचे मूळ यजमान होते; परंतु जागतिक क्रिकेट संघटनेने लंकेवर बंदी घातल्यामुळे, त्या स्पर्धा अन्यत्र घेणे भाग पडले होते. ’श्रीलंका बोर्डा’च्या कारभारात अतिरिक्त प्रमाणात सरकारी हस्तक्षेपामुळे ही कारवाई झाली होती.

या वेळेस भारताचा पहिला सामना बांगलादेशाच्या संघाविरुद्ध झाला होता. भारताने स्पर्धेतल्या त्या सामन्यात बांगलादेशाला पराभूत केले होते. तोच बांगलादेश की, ज्याने २०२० साली भारताला पराभूत करून, विजेतेपद पटकावले होते. एकूण १६ देशांमधील या २०२४च्या स्पर्धेअखेर भारत, ऑस्ट्रेलियानंतर ’विश्वचषक’ स्पर्धेत तृतीय क्रमांकावरील पाकिस्तान पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघ चौथ्या स्थानावर राहिला.
 
मागच्या २०२२च्या स्पर्धेच्या मध्यात भारतीय गोटामध्ये ’कोविड-१९’ पसरला गेल्याने, स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आले होते. भारताचा कर्णधार आणि उपकर्णधारसहित इतर चार खेळाडूंना आयर्लंड विरुद्धच्या सामन्याआधी ’कोरोना’ झाल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, ‘कोरोना’ संक्रमण झालेल्या, खेळाडूंचे त्वरित विलगीकरण केल्याने, पुढील धोका टळल्याने, कोणतेही सामने स्थगित करावे लागले नव्हते.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डेव्हिड टीगर हा सध्या वादाचा विषय झाला होता. आयोजकांनी डेव्हिड टीगरऐवजी अन्य कर्णधाराची नेमणूक करून, स्पर्धेत उतरावे, असे सांगितले होते. म्हणून त्यांचा कर्णधार बदलण्यात आला होता. गाझापट्टीमधील युद्धाचा निषेध आणि त्या संघर्षांतून डेव्हिड टीगरच्या आजपर्यंतच्या वागणुकीतून निर्माण होण्याची शक्यता बघता, येथील स्पर्धेदरम्यान तिथे आंदोलने व हिंसाचारही होऊ शकतो, असे समजल्याने त्या संघाचे कर्णधारपद बदलण्यात आले होते.

या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्‍या, खेळाडूंकडे उदयोन्मुख तारे म्हणूनच पाहिले जाते. वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे या स्पर्धेकडे बारकाईने लक्ष असते. स्पर्धेआधी खेळाडूंचे शिबीर आयोजित करण्यात येते. ज्या ठिकाणी स्पर्धा होणार आहे, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी, आधीच काही दिवस जाऊन राहायला प्राधान्य दिले जाते. प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, ऋषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले हे भारतीय संघाबरोबर होते. ’भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे अधिकृत असलेले जागतिक स्तरांवरचे ५० आणि २० षटकांचे विश्वचषक असतात. कसोटी क्रिकेट सामने, एकदिवसीय चषक असतात. त्या स्पर्धांना जो मान मिळतो, तोच १९ वर्षांखालील स्पर्धांनाही मिळतो.
 
पुरुषांचा टी-ट्वेंटी विश्वचषक दि. १ ते २९ जून २०२४ दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या दोघांमधील साखळी सामना दि. ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात दि. २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
 
’भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे सचिव जय शाह हे नुकत्याच त्यांच्या एका मुलाखतीत म्हणाले आहेत की, “२०२३ मध्ये अहमदाबादमध्ये सलग दहा विजय मिळवल्यानंतर, आम्ही विश्वचषक जिंकू शकलो नाही; परंतु आम्ही मने जिंकली. मी तुम्हाला वचन देतो की, २०२४ मध्ये आम्ही रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली बार्बाडोस येथे भारतीय ध्वज रोवू.” या त्यांच्या मुलाखतीतून व्यक्त झालेल्या, भावनांना सगळ्या क्रिकेटप्रेमींच्या सकारात्मक भावनांचा नक्कीच पाठिंबा असेल. २०२३ साली भारतात झालेल्या ’विश्वचषक’ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया हा सध्याचा विजेता आहे. त्यानंतरचा २०२७ विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे होणार आहे. पण, त्याआधी आपल्याला ही एक संधी मिळत आहे. त्यासाठी आपण सारे आपल्या क्रिकेटपटूंना आतापासूनच शुभेच्छा देण्यास प्रारंभ करू. धाकले तुमच्याकडून शिकायला उत्सुक आहेत बरं का! चला तर थोरले हो, दाखवून द्या धाकल्यांसकट सगळ्याच क्रीडाप्रेमींना की, भारतीय कधीच थकत नसतात.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121