मुंबई : नारायण देसाई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथालेखन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रविवार १ डिसेंबर रोजी ‘वेल्फेअर सेंटर, आदर्श नगर, वरळी, मुंबई’ येथे या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे माजी प्रकल्प संचालक तसेच पर्यटन व सांस्कृतिक विभाग व महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी भूषविले.
डॉ. मृण्मयी भजक यांनी ललित लेखन कथा, श्री.प्रवीण धोपट यांनी नाट्यलेखन, डॉक्टर मिलिंद विनोद यांनी साहित्य कथा आणि योगेश मार्कंडे यांनी सिनेमालेखन कथा, संवाद, पटकथा यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वागदेकर यांनी केले. अध्यक्ष संतोष रोकडे, निर्माता, दिग्दर्शक आणि संकलक संजीव नाईक, नारायण देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक आर्यन देसाई, प्रवीण धोपट, योगेश मार्कंडे आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन श्री आर्यन देसाई यांनी स्वागत केले. अभिनेता रुपेश पालव, अभिनेता हरिश्चंद्र भंडारे, कवियित्री दया चव्हाण उपस्थित होते. कमल देसाई यांनी या कार्यक्रमात आभारप्रदर्शन केले. लेखनकलेविषयीच्या अनेक गोष्टी शिकण्याची आणि मान्यवरांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी उपस्थितांना या कार्यशाळेत मिळाली.