सप्तश्रृंगी देवीच्या गडावर वक्फचा दावा : मंत्री नितेश राणे
आपल्यापुढे वक्फ आणि लव्ह जिहाद सारखी आव्हाने
24-Dec-2024
Total Views | 145
नाशिक : आपल्यापुढे आज वक्फ आणि लव्ह जिहाद सारखी अनेक आव्हाने आहेत. आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या गडावर वक्फच्या लोकांनी दावा ठोकला आहे, असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला. नाशिकमधील श्री क्षेत्र चिराई येथे आयोजित फिरता नारळी कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "हिंदु धर्म हा फार विशाल आहे. हिंदु धर्मात कधीही कुणावर जोर जबरदस्ती केली जात नाही. आमचाच धर्म स्विकारा. आमचा धर्म न स्विकारल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, असे बोलण्याची आपली प्रथा नाही. आज धर्मांतरासारखी असंख्ये आव्हाने आपल्या हिंदु धर्माकडे वाकड्या नजरेने पाहतात. हिंदु समाजाची लोकसंख्या कमी करणे आणि भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे काम आपल्या नजरेसमोर होत आहेत. पण कुणीही आपल्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहत असल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याची प्रत्येकाची तयारी असली पाहिजे. जोपर्यंत तो कडवटपणा आपण आपल्यात तयार करत नाहीत तोपर्यंत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज वक्फ आणि लव्ह जिहाद सारखी आव्हाने आपल्यापुढे आहेत. एकीकडे हिंदू धर्मात सर्वांना सोबत घेऊन चालणे शिकवले जाते. पण दुसरीकडे, हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या वणी गडावर वक्फच्या लोकांनी दावा ठोकला आहे. ५६ मुस्लीम राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्रात वक्फसारखा कायदा नाही. असा कायदा फक्त हिंदुराष्ट्र असलेल्या भारतातच आहे.
"वक्फ बोर्डच्या लोकांनी कधीही तुमच्या जमीनीवर बोर्ड लावला तर तुमच्या हक्काची जमीन त्यांच्याकडून परत मागून घेण्याचेही अधिकार तुम्हाला नाही. आज आपण जागरूक बनून वावरलो नाही तर उद्या आपल्याला आपल्या घरातील पुजा तरी हे लोक करू देणार की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना २०४७ ला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र करायचे असून त्याचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे धर्मांतर आहे. त्यांना हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणून आपण जागरूक राहायला हवे," असेही ते म्हणाले.