या घटनेशी सकल हिंदू समाजाचा संबंध जोडणे हा कट! मुख्यमंत्र्यांकडून परभणी घटनेचा उलगडा

    20-Dec-2024
Total Views | 72
 
parbhani
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) परभणी मधील हिंसाचार प्रकरणावर शुक्रवार, २० डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच संबंधित संपूर्ण घटनाक्रम त्यांनी उलगडून सांगितला.
 
परभणीतील घटनेवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला. ते म्हणाले की, "परभणीमध्ये १० डिसेंबर रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान, दत्तराव सोपनराव पवार या ४७ वर्षीय माणसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिची तोडफोड केली. त्यानंतर त्याठिकाणी अनेक घटनांना सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिथे मोठा जमाव झाला आणि रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यातील काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांशी चर्चा केल्यानंतर तो जमाव तिथून गेला. त्यानंतर जमावातील ६०-७० लोक थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि रेल रोको केला. त्यांना समजावल्यानंतर त्यांनी रेल रोको परत घेतला."
 
"त्यानंतर काही संघटनांकडून दुसऱ्या दिवशी परभणी शहर बंद पुकारण्यात आला. हा बंद शांततेत होण्यासाठी पोलिसांनी सर्व संघटनांना शांतता मिटींगसाठी बोलवले. जवळपास विविध संघटनांचे ७० ते ८० कार्यकर्ते शांतता मिटींगला हजर होते. या मिटींगमध्ये बंदबाबत १९ मुद्दे तयार करण्यात आले. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी ठरल्याप्रमाणे शांततेत आंदोलन सुरु झाले. यादरम्यान अचानक हाणापूर फाटा, गंगाखेड रोडवर काही लोकांनी टॉवर जाळण्यास आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. या जमावाने बंद असलेल्या दुकानांची तोडफोड करणे आणि दिसेल ती गाडी जाळणे सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिथे जमावबंदी घोषित केली. पण आंदोलनाची उग्रता वाढत असल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात तोडफोड केली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय संयमाने सगळी परिस्थिती हाताळली. त्यानंतर बाहेरून कुमक आल्यावर जमाव शांत झाला," असे त्यांनी सांगितले.
 
या घटनेशी सकल हिंदू समाजाचा संबंध जोडणे हा कट!
 
"या प्रकरणादरम्यान, सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि त्यात संविधानाविषयी बोलले गेल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. पण हा मोर्चा ११.१० ते १२.२५ पर्यंत झाला. त्यानंतर पाच तासाने ही घटना घडली. या घटनेतील आरोपी हा या मोर्चात नव्हता, तो आपल्या बहिणीच्या घरून आला होता. या मोर्चात केवळ बांग्लादेशातील हिंदूसंदर्भात मागणी करण्यात आली. यात कुठल्याही राजकीय नेत्याने भाषण केले नाही. यात भारताच्या संविधानाबाबत एकही शब्द बोलण्यात आला नाही. त्यामुळे हा कट तयार करणे म्हणजे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ही हिंदूविरुद्ध दलित अशी दंगल नाही. भारताचे संविधान आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे संविधानाच्या अपमान करणाऱ्याच्या जातीधर्माकडे न पाहता त्याच्यावर कडक कारवाई करणे महत्वाचे आहे. ही घटना कुठल्याही जातीधर्मातून घडलेली नाही तर एका मनोरुग्णाने असे कृत्य करून शहराचे स्वास्थ्य खराब करण्याचे काम केले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत सुरु होते. यातील हजारों लोकांनी प्रशासनाला सहकार्य करून आंदोलन केले. पण यातील २०० ते ३०० लोकांनी या आंदोलनाला गालबोट लावले. या तोडफोडीमध्ये सामान्य नागरिकांचे १ कोटी ८९ लाख ५४ हजार ४०० कोटी रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले आहे," असेही त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121