ठाणे जिल्ह्याला लाभले तीन कॅबिनेट मंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरनाईकांसह भाजपच्या गणेश नाईकांकडे विकासाची धुरा

    16-Dec-2024
Total Views | 32

three cabinet ministers
 
 
ठाणे : महायुती सरकारच्या नविन मंत्रीमंडळात ठाणे जिल्ह्याला उपमुख्यमंत्रीपदासह तीन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह भाजपच्या गणेश नाईक यांच्याकडे आता ठाण्याच्या विकासाची धुरा सोपवली आहे. हे तिघेही दिग्गज नेते असल्याने ठाणे जिल्हयात नवनवे प्रकल्प आणि विकासाची कामे व्हावीत, अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, जिल्हयात ९ आमदार असलेला भाजप मोठा भाऊ असल्याने ना. गणेश नाईक यांच्यासमोर तळागाळात पक्षवाढीचे आव्हान असेल.
 
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभापैकी १६ जागी महायुतीने बाजी मारली आहे. यात नऊ पैकी नऊ जागा जिंकुन भाजपने १०० टक्के स्ट्राईक रेट राखत जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. तर तुलनेने शिंदे गटाचे सातपैकी सहाच आमदार निवडून आले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी , रिपाई मित्रपक्षांच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे आमदार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपवले आहे. तर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर, तिसरे कॅबिनेट मंत्री ऐरोली मतदारसंघातील भाजपचे आमदार गणेश नाईक हे आहेत. या तिघा दिग्गज कॅबिनेट मंत्र्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विकासाचे मार्ग खुले होणार असुन त्याला केंद्रातील सरकारमुळे उत्तम पाठबळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
ना. गणेश नाईक यापूर्वीही कॅबिनेट मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्रीही होते. पालकमंत्री असताना त्यांचे जनता दरबार लोकाभिमुख झाले होते. आता पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेल्या गणेश नाईक यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच ठाण्यालाही लाभ होईल. असा आशावाद नागरीक व्यक्त करीत आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121