दिवाळीला आता उरले अवघे काही दिवस. या दीपोत्सवात घर-अंगण आकर्षक रांगोळ्यांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघेल. पण, ज्या कलाकाराने या रंगावलीला प्रदर्शनात, महोत्सवात मानाचे पान दिले, त्या ‘रंगावली सम्राटा’चे म्हणजेच गुणवंत मांजरेकर यांचे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने रांगोळीकडे फक्त सजावटीच्या एकांगी दृष्टिकोनातून न पाहता, त्याकडे पाहण्याची कलादृष्टी प्रदान करणार्या या ‘रंगावली सम्राटा’च्या जीवनरंगाचा प्रवास उलगडणारा हा लेख...
गोळीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व. रांगोळी हे शुभ प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरी किंवा अन्यत्र एखादा शुभ प्रसंग असला की, आपण छोटीशी का होईना, पण रांगोळी काढतोच. रांगोळी काढण्याची अशी ही परंपरा पूर्वापार चालत आलेली. रांगोळीचा उल्लेख अगदी रामायण, महाभारत आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. विविध गोष्टींचा वापर करून आणि वेगळ्याप्रकारे का होईना, पण आपल्याकडे फार पूर्वीपासून रांगोळ्यांचे विशेष आकर्षण. अशा या रांगोळ्यांकडे फक्त सांस्कृतिक किंवा सजावटीच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जात होते. किंबहुना, रांगोळ्या त्याच दृष्टिकोनातून काढल्या जायच्या. पण, हा दृष्टिकोन बदलला तो गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्यांमुळे!
गुणवंत मांजरेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात झाला. कलेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले. त्यांचे वडील चित्रकार होते. त्यामुळे वडिलांची चित्र काढण्याची कला त्यांनीही आत्मसात केली होती. गुणवंत मांजरेकर यांनी त्यांच्या लहानपणापासूनच अनेक चित्रे रेखाटली. ती चित्रे लोकांच्या पसंतीसही पडली. पण, त्यांना खरी ओळखून मिळवून दिली, ती रांगोळीने! गुणवंत यांची आईसुद्धा घराबाहेर रांगोळी काढायची. ती रांगोळी पाहून आपणही अशी रांगोळी काढू शकतो, असे गुणवंत यांना मनोमन वाटले आणि मग रांगोळीच्या रंगात ते पुरते रंगून गेले. चित्रकला अवगत असल्यामुळे त्यांना रांगोळी काढणे फारसे कठीण गेले नसावे. त्यांची चित्रकला आणि रांगोळीकला इतकी एकरूप झाली की, त्यांच्या रांगोळीमधून जीवंत चित्रे आकार घेऊ लागली.

रांगोळीची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आली असल्यामुळे गुणवंत मांजरेकर यांच्याआधीही अनेक उत्तमोत्तम रांगोळ्या काढल्या गेल्या असतील, यात शंका नाही. पण, आताच्या काळात रांगोळीतला ‘व्यक्तिचित्रणात्मक रांगोळ्या’ हा जो प्रसिद्ध प्रकार आहे, जो ‘पोर्ट्रेट रांगोळी’ म्हणूनसुद्धा ओळखला जातो, तो त्यावेळी अस्तित्वात नव्हता. त्यावेळी रेषा, चौकोन, वर्तुळ असे विविध आकार वापरुन पारंपरिक प्रकारच्याच रांगोळ्या दिसून येत. गुणवंत मांजरेकर यांनी या पारंपरिक रांगोळ्यांसोबतच चित्रांसारख्या भासणार्या रांगोळ्या काढायला त्याकाळी सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अनेकविध प्रयोगही केले. कागदावर चित्र काढण्यासाठी वापरल्या जाणार्या रंगांचा वेगळ्या प्रकारे वापर करून, त्यांनी ते रंग रांगोळीसाठी वापरले. सोबतच व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीत काळ्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तो काळा रंग त्यांनी दिव्याच्या काजळीपासून तयार केला.
गुणवंत मांजरेकर यांची रांगोळी काढण्याची पद्धतही त्याकाळी इतरांसाठी खूप अनोखी होती. त्यांच्याआधी असा प्रयोग कोणीही केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या रांगोळ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळ्यांप्रमाणेच त्यांनी ज्वलंत चित्रणेही रांगोळ्यांमधून करायला सुरुवात केली. सद्य परिस्थितीत घडणार्या, चर्चेत असणार्या गोष्टी, समाजाचे प्रश्न ते आपल्या रांगोळ्यांमधून मुक्तहस्ते मांडू लागले. त्यामुळे संस्कृती आणि सजावटीचेच माध्यम समजली जाणारी रांगोळी अभिव्यक्तीचेही माध्यम आहे, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले. रांगोळीकडे फक्त हौस आणि परंपरा म्हणून पाहणार्यांना रांगोळकडे एक ‘समृद्ध कला’ म्हणून पाहायला गुणवंत मांजरेकर यांनी भाग पाडले. चांगली रांगोळी काढणार्या व्यक्तीला पूर्वी काहीही ओळख नव्हती; ती ओळख मांजरेकरांनी मिळवून दिली आणि ‘रांगोळीकार’ किंवा ‘रंगावलीकार’ म्हणून रांगोळी काढणार्याला समाजात मानाचे स्थान मिळाले.
आईने दाराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांपासून ते रांगोळ्यांची प्रदर्शने, असा गुणवंत यांचा कलाप्रवास. १९७०-८०च्या दशकात त्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांच्या चर्चा प्रचंड गाजल्या होत्या. आचार्य अत्रे यांनी गुणवंत मांजरेकर यांच्या रांगोळ्या पाहून त्यांना ‘रंगावली सम्राट’ ही पदवी बहाल केली होती आणि तेव्हापासून लोक गुणवंत मांजरेकर यांना ‘रंगावली सम्राट’ किंवा ‘रांगोळी सम्राट’ म्हणूनच ओळखू लागले. मांजरेकर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक रांगोळ्या काढल्या. त्यांत छत्रपती शिवाजी महाराज, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, त्याकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या त्यांनी काढलेल्या रांगोळ्या विशेष गाजल्या. त्यांच्या या रांगोळ्या दुरून पाहिल्या, तर त्या जमिनीवर कुंचला घेऊन काढलेली चित्रेच भासतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांची प्रदर्शने भरली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कलाकार रांगोळी कलेकडे वळले. गुणवंत मांजरेकर यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी गेले. अनेकांना त्यांनी रांगोळी आणि चित्रे काढायला शिकवले. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे अनेक लोक त्यांच्याकडून रांगोळी काढायला शिकले आणि ‘रांगोळी कलाकार’ म्हणून नावरूपाला आले. आपली कला ही प्रामाणिकपणे जोपासावी आणि कोणतीही रांगोळी किंवा चित्र काढताना ते परिपूर्ण दिसेल असेच काढावे, अशी शिकवण त्यांनी कायम आपल्या विद्यार्थ्यांना दिली. मांजरेकरांनी रेखाटलेल्या अनेक रांगोळ्यांचे फोटो काढून अनेकांनी आपल्या घरात आजही फ्रेम करून लावले आहेत.
या ‘रंगावली सम्राटा’चे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर असताना निधन होणे, ही खूप दुःखद घटना. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. पण, त्यांनी काढलेल्या रांगोळ्यांमधून ते कायमच आपल्या आठवणीत जीवंत राहतील. अशा या महान ‘रंगावली सम्राटा’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
दिपाली कानसे