मुंबई : सध्याच्या युगात मराठी साहित्याची आवड, मातृभाषेचा अभिमान आणि वाचन संस्कृती लोप पावल्याची ओरड सर्व स्तरातून होताना दिसते. तेंव्हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची मराठी भाषेशी, साहित्याशी, वाचन संस्कृतीशी नाळ जोडणं, अत्यंत आवश्यक वाटते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी, स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुधा मोहन वेरणेकर प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी “४थे बालकुमार मराठी साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे.
सुभाषनगर एज्युकेशन सोसायटीच्या एल यु गडकरी सभागृहात सकाळी ९:०० पासून सायं. ६:०० ह्या वेळेमध्ये हे संमेलन होणार असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड तर उदघाटक सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सुप्रिया विनोद आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख, मुंबई मनपा चे विभाग शिक्षण निरीक्षक भारती भवारी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी प्रदीप पाटील उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. १० वाजता उदघाटन असून सकाळी ११ वाजता "छोट्या बयोची मोठी स्वप्ने" फेम बालकलाकार रुची नेरुरकर हिची मुलाखत माधवी कदम व राशी हजारे या विद्यार्थिनी घेणार आहेत. दुपारी १.३० वाजता नाट्यसंस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी यांचा एकपात्री कार्यक्रम होणार आहे. दुपारी २.३० वाजता फुलवी गोष्टींची बाग या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ सुमन नवलकर, जयश्री संगीतराव जयश्री चौधरी साधना जोशी सहभागी होणार आहेत. दुपारी ४ वाजता सुप्रसिद्ध लेखिका ज्योती कपिले यांच्या अध्यक्षतेखाली काव्यानंद कार्यक्रम होणार असून त्यात संतोष खाडये राजेंद्र वाणी जया पाटील श्रीकांत पेटकर सुयश देशपांडे सहभागी होतील.
समारोप सत्र सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य योगेंद्र ठाकूर व प्रकाश खांडगे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाला चेंबूर मधील शाळांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सोनिया फातरर्पेकर यांनी केले आहे.
पुस्तक प्रदर्शन व विक्री
या संमेलनात नामांकित लेखकांची पुस्तके देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून वाचकांनी त्याचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.