प्रयोगशील पशुपालकाची यशोगाथा

    16-Jan-2024
Total Views | 66
bapu barve
 
नाशिक येथील बापू बर्वे यांनी नोकरी सांभाळून शेळीपालन, कुक्कुटपालन, श्वानपालन असे शेतीला पूरक व्यवसाय शास्त्रीय पद्धतीची जोड देत यशस्वी केले. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा...
 
इच्छाशक्ती आणि आवड असेल तर नोकरीसोबतच व्यवसायही करता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकमधील माडसांगवी गावातील बापू चंद्रभान बर्वे. बापूंना अगदी लहानपणापासूनच पशुपक्ष्यांची विशेष आवड. सुरुवातील हौसेखातर त्यांनी श्वान, ससे, मांजरी, शेळ्या पाळल्या. परंतु, भविष्यात त्यांची हीच हौस मोठ्या व्यवसायात परिवर्तित होईल, असे त्यांनाही कधी वाटले नव्हते. विशेष म्हणजे, बापू हे १६ वर्षांपासून एका औषधनिर्मिती कंपनीत विपणन विभागात कार्यरत आहेत आणि ही नोकरी सांभाळून व्यवसायदेखील यशस्वीपणे सांभाळत आहेत.
 
बापू यांचे वडील महावितरणमध्ये नोकरीला होते. पुरेसा पगार नसल्यामुळे तेही शेतीवर अवलंबून. बापू बारावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाने त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली. त्यादरम्यान शिक्षणही कसेबसे सुरू होते. तरी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण करण्यासाठी व घराला हातभार लागण्यासाठी दुसर्‍यांच्या शेतात रोजंदारी केली. २००६ पर्यंत हे सर्व सुरू होते. परंतु, या सर्वांत त्यांनी शिक्षणात जराही खंड पडू दिला नाही. पदवीनंतर जिद्दीने शैक्षणिक कर्ज काढून २००८ साली विपणन विषयात ‘एमबीए’ची पदवी घेतली. पुढे त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. नोकरी करताना शेतीत जी कामे केली होती, त्यात अजून काहीतरी चांगले करता येऊ शकते, असे त्यांना सतत वाटत असे. मग काय, नोकरीसोबतच शेतीपूरक व्यवसाय शोधण्यासाठी संशोधन करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कुक्कुटपालनाविषयी माहिती मिळाली. परंतु, गुंतवणुकीसाठी हवा तेवढा पैसा नसल्याने त्यांचा तो विचार बारगळला. पुढे अजून संशोधन करता शेळीपालन हा व्यवसाय समोर आला.
 
मग 2016 साली उसनवारी, सोने गहाण ठेवून २ लाख,६३ हजार रुपये उभे करून २० उस्मानाबादी शेळ्या बापूंनी खरेदी केल्या. या कामाचा कोणताही अनुभव गाठीशी नसल्याने त्यांना तब्बल दीड लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पण, घरच्यांनी पाठबळ देत बापूंना नव्या उमेदीने उभे केले. मार्च २०१७ मध्ये उस्मानाबादीऐवजी राजस्थान येथून १ लाख, १३ हजार किमतीच्या प्रत्येकी पाच सिरोही बोकड व शेळ्या त्यांनी खरेदी केल्या. अभ्यास, चिकाटी व व्यवस्थापन सुधारून व्यवसायात हळूहळू जम बसू लागला. शेळ्यांची खरेदी, संगोपन व विक्री असे काम सुरू केले. काही वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर व्यवसाय विस्तारला. पुढे थोडे आर्थिक स्थैर्य आल्यानंतर कुक्कुटपालनाचाही व्यवसाय सुरू केला. त्यातून दिवसाकाठी तीन हजार अंडी रोज मिळत.
 
दरम्यान, बापूंना पाळीव प्राण्यांची आधीपासूनच आवड असल्याने विदेशी मांजरी, विदेशी श्वानदेखील पाळण्यास त्यांनी सुरुवात केली. यादरम्यान रोजची ३० एक अंडी फुटायची आणि बरेचदा ही अंडी फेकून दिली जात. परंतु, बापू ती अंडी फेकून न देता श्वान आणि मांजरींना देऊ लागले. यातून श्वान आणि मांजरींचादेखील व्यवसाय सुरू झाला. विदेशी मांजरींना, श्वानांना बाजारात चांगली किंमत असल्याने त्यातूनही चांगले उत्पन्न मिळू लागले. शहरातील नागरिकांकडून परदेशी जातीच्या कुत्र्यांना मागणी असते. हे लक्षात घेऊन त्यांनी ‘लॅब्राडॉर’ व जर्मन ‘शेफर्ड’ यांचे पालन केले. दोन वर्षांत १५ ते १८ हजार रुपयांप्रमाणे १९ पिलांची विक्री केली. त्यासोबत पाळीव पशुप्रेमींची मागणी बघता, पर्शियन जातीच्या मांजरीचे संगोपन व विक्रीही सुरू केली आहे. ससे पालन, बदकपालनही ते करतात. बापूंकडे ‘लकी’ नावाचे पाळीव श्वान होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लकी गोट फार्म’ असे त्यांनी नामकरण केले. व्यावसायिक कौशल्यातून ग्राहक साखळी जोडल्याने राज्यभरातील शेतकरी बापूंकडून शेळ्या खरेदी करतात. भाऊ किरण व भाचा आकाश त्यांना या व्यवसायात मदत करतात.
 
आज शेतीत उत्पन्न नसल्याने लोक शेतीकडे फार नकारात्मक दृष्टीने पाहतात. आज शेतीशी या ना त्या नात्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. “व्यवसाय कुठलाही करा, परंतु तो शेतीशी संबधित असावा. आज कोणीही शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. त्याला जोडधंदा द्यायला हवा,” असाही संदेश बापू शेतकर्‍यांना देतात. कुठलेही यश दिसायला जरी मोठे दिसत असले, परंतु त्या मागचा प्रवास खूपच खडतर असतो. लोक म्हणतात की, “आयुष्यातला वाईट काळ फार निर्दयी असतो, तो आपल्याकडून खूप काही हिरावून घेतो.” परंतु मी म्हणेन की, “आयुष्यातील वाईट काळच आपल्याला सर्वांत जास्त शिकवत असतो. चांगल्या काळात तुम्हाला फक्त चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु, जेवढं तुमचं कौतुक होत जातं, तेवढं तुम्ही निर्धास्त, आळशी बनत जातात. याउलट वाईट काळात जे लोक तुम्हाला शिकवतात, जे अनुभव येतात, तीच वेगळी शिदोरी तुमच्या आयुष्याला जोडली जाते. त्या वाईट काळाला सकारात्मक दृष्टीने बघायला हवे.”
अशा या पशुप्रेमी आणि उद्योजक बापू बर्वे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मन:पूर्वक शुभेच्छा!
गौरव परदेशी
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याण लोकलमध्ये

कल्याण लोकलमध्ये 'बोकड प्रवासी'! कुर्ला स्थानकावर गोंधळ, फेरीवाल्यांचा उद्रेक आणि रेल्वे प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष

कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली आहे.गर्दीच्या तासात झालेल्या या प्रकारामुळे लोकल डब्यात गोंधळ उडाला. बोकड मोकळा फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121