देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ ही सुमारे ९०० दशलक्ष डॉलर इतकी असून, येत्या काही काळात ती वेगाने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांचे झालेले विलीनीकरण ‘एअर इंडिया’ला बळ देणारे ठरणार आहे. ‘इंडिगो’चे या क्षेत्रातील जे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, त्याला आता नव्या ‘एअर इंडिया’चे आव्हान असेल. त्याविषयी...
टाटा समूहाच्या ‘एअर इंडिया’चे आणि टाटा समूहाचीच अन्य एक कंपनी ‘विस्तारा’ बरोबरच्या विलीनीकरणावर मान्यतेची मोहर उमटली आहे. यासंदर्भातील घोषणा दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी टाटा समूहाने केली होती. मार्च २०२४ पर्यंत त्यासंबंधी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. एक मोठी, अधिक स्पर्धात्मक कंपनी तयार करणे, हा यामागचा हेतू. देश-विदेशातील १५०हून अधिक ठिकाणी आता ही कंपनी हवाई सेवा देईल. देशांतर्गत बाजारपेठेत ‘एअर इंडिया’समोर ‘इंडिगो’चे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी ‘स्पाईसजेट’ आणि ‘गो फर्स्ट’ सारख्या तुलनेने लहान कंपन्या आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. ‘विस्तारा‘ हा ‘टाटा‘ आणि ‘सिंगापूर एअरलाईन्स’ यांच्यातील संयुक्त उपक्रम असून, आता तो ‘एअर इंडिया’त विलीन होत आहे.
‘इंडिगो’ सारख्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी एक मोठी कंपनी उभी केली जाईल, असे टाटा समूहाने नोव्हेंबरमध्येच स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’ नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत सादर होण्यासाठी सज्ज होत आहे. टाटा समूह त्यासाठी नवनव्या कल्पना राबवत आहे. नव्या ‘एअर इंडिया’चा देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा सुमारे २५ टक्के इतका होईल, ज्यामुळे ती भारतातील दुसरी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी बनेल. यात ४० हजार पेक्षा जास्त कर्मचारी असतील. कंपनीच्या ताफ्यात ‘बोईंग ७८७ ड्रीमलाईनर’ तसेच विस्ताराच्या ‘एअरबस ए ३२० निओ,’ असा २०० पेक्षा अधिक विमाने असतील. देशविदेशातील एकूण १५० पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना सेवा दिली जाईल. यात युरोप, मध्य पूर्वेसह आग्नेय आशियातील काही ठिकाणांचा समावेश आहे. अमेरिकेसह कॅनडासाठी नवीन मार्ग आणि उड्डाणे सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ या दोन्ही कंपनींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
‘एअर इंडिया’ची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे मुख्यालय असणार्या ‘एअर इंडिया’ची मूळ मालकी ही टाटा समूहाकडेच होती. देशांतर्गत बाजारपेठेत तिचा हिस्सा १५ टक्के इतका आहे. जेआरडी टाटा यांनी तिची स्थापना केली. प्रारंभी ‘टाटा एअरलाईन्स’ म्हणून ती कार्यरत होती. १९५३ मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यानंतर ‘एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. भारतीय वाहतूक उद्योगातील अग्रणी कंपनी म्हणून ती आजही प्रसिद्ध आहे. आपल्या ताफ्यात जेट विमानांचा समावेश करणारी ‘एअर इंडिया’ ही पहिली आशियाई कंपनी ठरली. दरम्यानच्या काळात काँग्रेस कालावधीत ‘एअर इंडिया’ला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर २०२१ मध्ये खासगीकरणाअंतर्गत तिची मालकी टाटा समूहाला दिली गेली. तथापि, जगभरात तिचा लौकिक कायम असून, ‘एअर इंडिया’ने प्रवास करणे, हे प्रतिष्ठेचे मानले जाते.
‘विस्तारा’ ही टाटा समूह आणि ‘सिंगापूर एअरलाईन्स’ यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून २०१३ मध्ये स्थापन केली गेली. दि. ९ जानेवारी २०१५ रोजी दिल्ली ते मुंबईदरम्यान पहिले उड्डाण झाले. आज ती देश-विदेशातील ५७ ठिकाणी हवाई सेवा पुरवते. उच्च दर्जाची सेवा देणारी कंपनी, असा तिचा लौकिक झाला आहे. ‘एअर इंडिया’सह ‘विस्तारा’लाही वाढत्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. काही वर्षांतच ‘विस्तारा’ने स्वतःचे नाव विमान वाहतूक क्षेत्रात चांगल्या कामगिरीने नोंदवले आहे.
टाटा समूहाने या क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता विलीनीकरणाची घोषणा केली. भारतात विमान उद्योगात मोठी वाढ अपेक्षित असल्यानेच या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे सेवांचा विस्तार करण्याबरोबरच ग्राहकांनाही अधिक चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा. भारतीय विमान उद्योगातील ही एक मोठी घटना असून, देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम ही कंपनी करेल. ‘एअर इंडिया’ने ‘बोईंग‘बरोबर फेब्रुवारी महिन्यात ४७० विमानांच्या खरेदीसाठी करार केला आहे, ज्याची किंमत ७० अब्ज डॉलर इतकी आहे. नागरी विमान वाहतूक इतिहासातील हा सर्वात मोठा करार मानला जातो. यात २२० बोईंग, ७३७ मॅक्स विमाने तसेच २५० बोईंग, ७८७ ड्रीमलाईनर्सचा समावेश आहे. आर्थिक संकटात असलेल्या ‘बोईंग’ कंपनीलाही हा करार बळ देणारा ठरला असल्याचे मानले जाते. त्याचवेळी भारतीय बाजारपेठेचे महत्त्वही या कराराने अधोरेखित केले आहे.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ असून, ‘एअर इंडिया’ ही आता देशातील सर्वात मोठी विमान कंपनी ठरली आहे. ‘एअर इंडिया’ने भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या असून, आधुनिक विमान ताफ्यात ठेवत, ती आपला विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. आधुनिक विमानांच्या खरेदीसह देश-विदेशातील अधिकाधिक ठिकाणी ती उड्डाण घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिका, युरोपमधील नवनवीन लांब पल्ल्याच्या मार्गांची चाचपणी केली जात आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा कशी पुरवता येईल, यासाठीही ‘एअर इंडिया’ काम करत आहे. एकूणच ‘एअर इंडिया’ने जागतिक विमान वाहतूक उद्योगातील प्रमुख कंपनी म्हणून पुढे येण्यासाठीची संपूर्ण तयारी केली असून, विस्तारासोबतचे विलीनीकरण हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते. देशातील नागरी विमान वाहतूक बाजारपेठ सुमारे ९०० दशलक्ष डॉलर इतकी मोठी असून, २०२५ ती चार अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढेल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिगो’ या कंपनीसमोर मात्र मोठे आव्हान उभे राहिले आहे, यात कोणतीही शंका नाही.