
नवी दिल्ली : पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी जागतिक व्यासपीठावर भारताने ‘सिंधू पाणीकरार’ स्थगित केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारताने शरीफ यांच्या आरोपावर चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत सरकारने सांगितले की, “सिंधू पाणी करारा’चे उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला दोष देणे पाकिस्तानने थांबवावे. कारण सीमेपलीकडून होणार्या दहशतवादामुळे ‘सिंधू पाणी करार’ सुरू ठेवण्यात अडथळे निर्माण होत आहेत.”
“ताजिकिस्तानमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘हिमनदी संवर्धन परिषदे’त पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताच्या ‘सिंधू करारा’ला पाण्याचे हत्यार बनवत एकतर्फी आणि बेकायदेशीर शस्त्र म्हणून संबोधले होते. संकुचित राजकीय स्वार्थासाठी लाखो लोकांचे जीवन ओलीस ठेवू नये,” असे पंतप्रधान शहाबाज शरीफ म्हणाले होते. केंद्रीय राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, “पाकिस्तान स्वतः दहशतवादाच्या माध्यमातून कराराचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानी व्यासपीठाचा गैरवापर करून व्यासपीठाच्या कक्षेत येत नसलेले मुद्दे उपस्थित करणेही चुकीचा आहे. पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा मी तीव्र निषेध करतो. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘सिंधू पाणी करार’ स्थगित केला.”
आता परिस्थिती बदलली आहे
कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, “सिंधू नदी करारा’वर स्वाक्षरी झाल्यानंतर लोकसंख्या, हवामान बदल आणि सीमापार दहशतवादाच्या धोक्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताच्या ‘सिंधू नदी करारा’चा फायदा घेण्याच्या क्षमतेत आता अडथळे निर्माण झाले आहेत. पाकिस्ताने भारतावर दोषारोप करणे थांबवावे. ‘सिंधू पाणी करार’ सद्भावना आणि मैत्रीच्या भावनेने करण्यात आला होता. त्याचा आदर करणे आवश्यक आहे. या कराराचे उल्लंघन करणारा पक्ष हा स्वतः पाकिस्तान आहे.”