वार्धक्याच्या वाटा...

    28-Aug-2023
Total Views | 213
Article On Aging problem Rise In Society

वार्धक्याच्या वाटा सुकर करायच्या असतील तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर समग्र विचार आवश्यक आहे. तेव्हा, वार्धक्याच्या हल्लीच्या काळातील समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...

आधुनिक औषधोपचारामुळे सरासरी वयोमान वाढू लागले आहे. आता ते साधारण सत्तरीपर्यंत पोहोचले आहे. या वाढलेल्या वयामुळे वार्धक्याच्या समस्यादेखील वाढल्या आहेत. सरकारी नोकर्‍यांमध्ये निवृत्तीचे वय ५८ किंवा ६० वर्षे आहेत. त्यानंतर कुठलेही काम करावे, अशा मानसिकतेत आपण नसतो. घरात सून, मुले, नातवंडे यांच्या गर्दीत म्हातारी माणसे हरवून जातात. सून, मुल दोघेही कामावर जात असल्यामुळे वृद्ध लोकांची देखभाल व्यवस्थित होताना दिसत नाही. सून, मुले व नातवंडे यांच्याबरोबर भावनिक दुरावा येण्यास सुरुवात होते. याच काळात आजाराचा ससेमिरा मागे लागतो. अर्धांगिनी असेल, तर थोडा फार आधार मिळतो. पण, तिचे अकाली निधन झाल्यास भावनिक एकटेपणा जाणवतो. बदलत्या काळानुसार वृद्ध आई-वडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे, असे फार थोड्या मुलांना वाटते. मृत्यूनंतर त्यांचे क्रियाकर्म व्यवस्थित केले जाते. परंतु, जीवंतपणी त्यांना मरणयातना दिल्या जातात.

आरोग्य समस्या : वाढत्या वयाप्रमाणे मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, मानसिक नैराश्य, सांधेदुखी इत्यादी आजार सखेसोबती होतात. या प्रत्येक आजारावर वेगळे औषध घ्यावे लागते. दिवसभरात घेतल्या जाणार्‍या गोळ्यांची संख्या दहाच्या वर जाते. त्यात आणखी लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची भर पडते. मधुमेहासाठी अनेक वृद्धांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. ही सर्व औषधे महागडी आहेत. पेन्शन आल्यावर पहिल्यांदा महिनाभराची ही औषधे विकत घ्यावी लागतात. ब्रॅण्डेड औषध घ्यावे की जेनेरिक औषधं घ्यावी, हा पेच वृद्ध व्यक्तींमध्ये कायम असतो. मधुमेहाची बरीच औषधे अगदी जेनेरिक स्टोअर्समध्ये देखील महाग आहेत, अशी औषधे लिहिण्याची खरच गरज आहे का, याचा विचार त्यांच्या डॉक्टरांनी करावा. आपल्या रुग्णाला लिहून दिलेली औषधे त्याला परवडणार आहेत का, याचादेखीलविचार करावा. अनेक आजारांवर सरकारी रुग्णालयात मोफत औषधे दिली जातात. तेथील माणुसकी वाढविल्यास अनेक रुग्ण या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

गोळ्या विकत आणणे हा एक भाग झाला, पण त्या व्यवस्थित घेतल्या जातात की नाही यावर घरातील व्यक्तींनी लक्ष द्यावे. वाढत्या वयामुळे लागलेली विसरण्याची सवय यामुळे गोळ्या घेतल्या की नाही हेच आठवत नाही. काहींना ‘अल्झायमर’, ‘पार्किनसोनिझम’ अशा आजारांशी सामना करावा लागतो. अर्धांगवायू, मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर, मणक्याचे आजार यामुळे वृद्ध लोकांची हालचालदेखील दुसर्‍यांवर अवलंबून असते. वृद्धांवर होणारा खर्च, त्यांची करावी लागणारी देखभाल यामुळे घरातील लोकांना ते नकोसे झालेले असतात. वेळ काढून पाच ते दहा मिनिटे वृद्ध आई-वडिलांशी संवाद साधावा, असे क्वचित घडते. त्यांच्या भावनिक गरजांची आपण कधीच कदर करीत नाही.

रुग्णालयातील उपचार हे अत्यंत महागडे झाले आहेत. आरोग्य विमा नसेल, तर हे उपचार सामान्य रुग्णांना न परवडणारे असतात. सरकारी रुग्णालयांची दुरवस्था यामुळे खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय दुसरा उपाय नसतो. कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली व आरोग्य विमा नसल्यास सगळीकडे आनंदी आनंद गडे! वाढत्या वयामुळे नवीन आरोग्य विमा काढता येत नाही. वयाप्रमाणे आरोग्य विम्याचा प्रिमियमदेखील भरमसाठ असतो. या सर्वांपेक्षा मरण बरे असे अनेक वृद्धांना वाटते. परंतु, ते फक्त देवाच्या हाती असते. आपण फक्त मरणयातना भोगायच्या.

भावनिक दुरावा : वृद्ध नागरिकांना एकटेपणा खायला उठतो. वेळ जाता जात नाही. पेपर तरी किती वेळा वाचावा. व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर माध्यमे याने विरंगुळा कमी होतो व मनस्ताप वाढतो. आपली मुलेच आपल्याला विचारत नाहीत, ही मोठी खंत असते. घरी सूनबाई असेल, तर सासरेबुवांना अर्धा दिवस गार्डनमध्ये बसून काढावा लागतो. समवयस्क म्हातार्‍यांशी गप्पा मारणे, त्यांच्याशी सुखदु:ख उघडे करणे यात वेळ जातो. पण, घरी जाण्याची ओढ संपलेली असते. विधुर वृद्धांना तर अजून सांभाळून राहावे लागते. (सूनबाई काय आळ लावेल याचा नेम नसतो.)

वर सांगितले बरेचशे आजार म्हातारपणी सोबतीला असतात, त्यात आणखी एका आजाराची भर पडते ती म्हणजे कॅन्सर. जसे वय वाढत जाते तसे या आजाराचा धोका निर्माण होतो. तो कुठल्या अवयवाचा असेल हेही सांगता येत नाही. निदान झाल्यावर होणारी मानसिक घालमेल प्रचंड असते. हे सर्व माझ्याच वाट्याला का, हा प्रश्न पडतो. ऑपरेशन, किमोथेरपी, रेडियोथेरपी अशा महागड्या व त्रासदायक उपचारांना सामोरे जावे लागते. यामुळे तब्येत झपाट्याने खालावते.हृदयविकार, अर्धांगवायू हेदेखील वयोपरत्वे जवळ येतात. आधुनिक वैद्यकीय उपचारानेहे आजार बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येतात. पण, आपल्या हृदयात स्टेंट आहे, हे शल्य बाळगून उरलेले जीवन व्यतीत करावे लागते. अर्धांगवायू झाल्यास त्यातून संपूर्णपणे बरे होण्यास बराच कालावधी लागतो. तोपर्यंत कुणा साहाय्यकाची गरज असते, तो उपलब्ध असेलच असे नाही.

वृद्धांचे जेवण : दातांनी साथ सोडलेली असते. डेन्टल इम्प्लांट नसेल केल्यास कवळी बसविण्याशिवाय इलाज नाही. आहार मऊ असावा हे सुनांना पटले, तर ठीक आहे, नाहीतर ताटात जे वाढले ते खाण्याचा प्रयत्न करत दिवस पुढे ढकलायचा. अनेक वृद्ध हे रस्त्यावरील गाडीवर वडा, समोसा, भेळ खाताना दिसतात. घरी त्यांना अगदी पथ्यपाण्याचे जेवण दिले जाते, पण त्यांचीदेखील गोड-धोड खाण्याची इच्छा होते हे आपण साफ विसरतो.

पाश्चात्य देशातील वृद्धांच्या समस्या: नुकताच दोन महिन्यांसाठी अमेरिकेला गेलो होतो. तेथील वृद्धांच्या समस्या आपल्या येथील वृद्धांपेक्षा अधिक बिकट असल्याचे जाणवले. सरासरी वयोमान हे आपल्यापेक्षा जास्त आहे. ८० वर्षे ओलांडली तरी त्यातील काही लोक स्वत: कार चालवितात. घरातील सर्व कामे करतात. तेथील जीवनपद्धतीदेखील आपल्यापेक्षा भिन्न आहे. मुले १८ ते २० वर्षांची झाली की, घर सोडतात व स्वतंत्र राहू लागतात. आपल्या मित्रास किंवा मैत्रिणीस डेट करू लागतात. त्यामुळे पुन्हा आपल्या जुन्या घरी जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. यातील बरीचशी मुले लवकर लग्न करतात व त्यांना मुलेही लवकर होतात. हे सर्व झाल्यावर त्यातील अनेकांचे संसार हे घटस्फोटाच्या मार्गावर असतात. या सर्व घटनांमुळे वृद्ध आई-वडिलांना भेटायला जावे, त्यांना फोन करावा, असे बर्‍याच जणांना वाटत नाही.

पैसा भरपूर असला तरी भावनिक आधार नसतो. आपली सर्व कामे स्वत:लाच करावी लागतात. अगदी हिवाळ्यात बर्फ काढण्याचेसुद्धा काम करावे लागते. तेथील वास्तव्यात अनेक वृद्धांशी संवाद साधला. त्यांच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. ८२ वर्षांचे निवृत्त भारतीय सर्जन चार बेडरुमच्या घरात आपल्या बायकोसह राहतात. लग्न झालेली मुलगी पन्नाशीच्या आसपास आहे, ती दुसर्‍या शहरात राहते. मुलगा मानसिकदृष्ट्या अधू आहे. एवढे कमी होते म्हणून काय बायकोला ‘पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया’ आहे. त्यांच्याशी बर्‍याच वेळ गप्पा मारल्या. ऐश्वर्य आहे, पण आंतरिक सुख नाही. पैशाने सुखसोयी विकत घेता येतात. परंतु, शांती मिळेलच याची शक्यता नाही. नव्वदीच्या घरात पोहोचलेले एक बालरोगतज्ज्ञ भेटले, ते अजूनही प्रॅक्टिस करतात. बायको वारल्यामुळे एकटे राहतात. प्रॅक्टिस ही विरंगुळा म्हणून आहे, असे त्यांनी सांगितले. अशा अनेक वृद्धांना भेटून मन विषण्ण झाले.

भारतात माझे मित्र सॅम्युअल लुईस हे सत्तरीओलांडलेले आहेत. त्यांची बायकोपण निवृत्त शिक्षिका आहे. मोठा मुलगा १५ वर्षांपूर्वी अमेरिकेला गेला, तर छोटा मुलगा वेगळा राहतो. तीन बेडरुमच्या प्रशस्त घरात ते कुटुंब आनंदाने राहते. सरांच्या सांगण्यावरून अमेरिकेतील ‘अ‍ॅसिस्टेट लिव्हिंग होम’ला भेट दिली. अगदी प्रसन्न वातावरण होते. १३० वृद्धांची तेथे सोय आहे. सुखसुविधा या पंचतारांकित आहेत. छानसा सूट, सुंदर पेंटिग्स, स्वच्छ आणि टापटिपीत बाथरुम याशिवाय प्रशस्त डायनिंग हॉल, रिक्रिएशन हॉल, लायब्ररी, गार्डनिंगची सोय, पेटिंग व इतर हॉबीजची उपकरणे, चालता न येणार्‍यांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, नियमित वैद्यकीय तपासणी, फिजिओथेरपी इत्यादी अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत. तेथे राहणारेवृद्धही हसर्‍या चेहर्‍याचे सुखवस्तू दिसले. कर्मचारी वर्गदेखील या सर्वांची आपुलकीने काळजी घेत होता. हे सर्व ठीक असले तरी तेथे राहाणे अत्यंत महागडे होते. महिन्याचा खर्च ७५०० डॉलर्स (सुमारे सहा लाख रुपये) होता. यातील महागड्या सुखसुविधा कमी करून या धर्तीचे ‘अ‍ॅसिस्टेट लिव्हिंग होम’ भारतात उभारावे, असे मनात येऊन गेले. हे नावही आवडले, कारण वृद्धाश्रमात असणारे नैराश्य या ‘अ‍ॅसिस्टेट लिव्हिंग होम’ध्ये नसावे.

वार्धक्य समस्यावरील उपाय : एवढ्या सर्व समस्या मांडल्या तरी चित्र अगदी निराशाजनक नक्कीच नाही. माणुसकीची, चांगल्या नियोजनाची आवश्यकता आहे. ‘आयुष्यमान आरोग्य योजना’, ‘महात्मा फुले आरोग्य योजना’, ‘अपघात विमा’, ‘श्रावणबाळ योजना’ इत्यादी अनेक योजना गेली काही वर्षे राबविल्या जात आहेत. त्याचे सकारात्मक बदल दिसण्यास थोडा अवधी लागेल. सध्या अस्तित्वात असलेल्या वृद्धांसाठीच्या सर्व आरोग्य योजनांच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करावी, जेणेकरून त्यांचा लाभ समाजातील सर्वांत गरीब वर्गापर्यंत पोहोचेल. ग्रामीण विभागात आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष द्यावे.

आरोग्य विमा मिळण्यात असंख्य अडचणी असल्यामुळे ७० वर्षांवरील वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची काळजी सरकारने घ्यावी. ७० वर्षांवरील नागरिकांचा सर्वे करावा व त्यांची संख्या निश्चित करावी. त्यांच्या आरोग्य विषयीच्या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. यात नियमित तपासणी, नियमित चाचण्या, दर महिन्याला नियमित औषधोपचार, रुग्णालयात भरती केल्यास तेथील सर्व उपचार मोफत असावे. ही सवलत ७० वर्षांवरील सर्वच नागरिकांना असावी. त्यात उत्पन्नाची अट व इतर अटी नसाव्या. आजारपण आल्यास मध्यम वर्गातील नागरिकांची जास्त कुचंबणा होते. खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसतो, तर सरकारी रुग्णालयातील प्रचंड गर्दी आणि अनास्था यामुळे तेथे जावेसे वाटत नाही. या सर्वांची सोय या योजनेला होईल व एक चांगला प्रकल्प राबविण्याचे समाधान मिळेल.

‘आयुष्यमान योजना’, ‘महात्मा फुले आरोग्य विमा योजना’ याबद्दल आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. सरकारी रुग्णालयातील रिक्त जागा भरणे अत्यंत जरुरीचे आहे. तेथील प्रचंड गर्दीमुळे रोज डॉक्टर व रुग्ण याच्यात तंटे होतात. ’आपला दवाखाना’ हा चांगला प्रकल्प आहे. घराच्या बाजूला व सर्व सोयींनी उपयुक्त दवाखाना प्राथमिक उपचारासाठी खूपच उपयोगी आहे. आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांत डॉक्टर्स, परिचारिका, लॅब तंत्रज्ञ यांची योग्य प्रमाणात भरती होत नाही. या भरतीमध्ये पारदर्शकता असावी.

वृद्धाश्रम : ज्यांना काहीही आधार नाही किंवा मुले परदेशी आहे, मुलांशी पटत नाही, अशा वृद्धांसाठी हे वृद्धाश्रम असावे. या वृद्धाश्रमाचे वातावरण आनंदी असावे. वरिष्ठ नागरिकांनी वाचन, चिंतन, मनन, लिखाण, कविता, गझला, संगीत, गाणे इत्यादी आपलेछंद जोपासावे व त्यात रमावे. अनेकांना बागकामाची आवड असते. त्यांनी ती पूर्ण करावी. वृद्धाश्रम हे एका एकत्र कुटुंबासारखे असावे, ज्यात एकमेकांबद्दल जिव्हाळा असावा.अनेक सेवाभावी संस्था आरोग्याच्या क्षेत्रात काम करतात. या सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांनी काही वरिष्ठ नागरिकांना दत्तक घ्यावे व त्यांची देखभाल करावी. सॅम्युअल लुईस सर व मी, आमची इच्छा आहे की, या प्रकारचे एक आदर्श वृद्धाश्रम तयार व्हावे.त्याच्या उभारणीचा आणि चालविण्याचा खर्च समाजातील देणगीदारांनी करावा. यातून मिळणारे पुण्य हे नक्कीच श्रेष्ठ दर्जाचे असेल. आम्ही बिजारोपण करू, परंतु ते झाड बहरेपर्यंत जोपासायचे काम नवीन पिढीने करायचे आहे.

डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३
अग्रलेख
जरुर वाचा
मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121