मुंबई : राज्याच्या राजकारणात प्रत्येकच पक्षात नेत्यांची ये-जा सुरुच असते. अशातच मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. मुंबई काँग्रेसमध्ये तीन माजी नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शिंटे गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पक्षसंघटना वाढवण्याच्या या काळात मुंबई काँग्रेसमध्ये तीन माजी नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. एवढेच नाही तर हे नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या आहेत.
मुंबई काँग्रेसकडून ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी कार्यक्रम आखण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनुपस्थित राहाणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे पक्षात नाराजी वाढली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, गंगा माने, बबु खान यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनीसुध्दा राजीनामा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाला या सगळ्याचा जोरदार फटका बसला आहे.