प्रियांका गांधींनी वाराणसीहून निवडणूक लढवल्यास मोदी गुजरातमध्ये परत जातील
काँग्रेस नेते राशिद अल्वी यांची ‘भविष्यवाणी’
19-Aug-2023
Total Views | 87
नवी दिल्ली : प्रियांका गांधी – वाड्रा यांनी वाराणसीहून लोकसभा निवडणूक लढविल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये परत जातील, अशी आपली ‘भविष्यवाणी’ असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी व्यक्त केले आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी म्हणाले, प्रियांका गांधी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये परत जावे लागणार आहे. प्रियांका यांच्याविरोधात मोदी हे लोकसभा निवडणूक लढविणारच नाहीत, अशी आपली भविष्यवाणी असल्याचे अल्वी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते अल्वी यांनी राहुल गांधींविषयीदेखील मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, जर राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविली तर स्मृती इराणी यांची अनामत रक्कम जप्त होणे निश्चित आहे. राहुल गांधी यांनी तेथून निवडणूक लढविल्यास इराणी या अमेठी सोडून पळदेखील काढतील. त्यामुळे मंत्री आणि अमेठीतून खासदार असलेल्या इराणी यांना भाजपने तेथून पळ काढू देऊ नये, असेही अल्वी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी शुक्रवारी राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विधान केले होते. मात्र, त्याविषयी राहुल गांधी अथवा सोनिया गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.