Operation Sindhu : तीन हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात यश!
25-Jun-2025
Total Views | 6
नवी दिल्ली : इस्रायल-इराण युद्धसंघर्षच्या पाश्वभुमीवर, भारताने आपल्या नागरीकांची खबरदारी घेत आतापर्यंत इस्रायल-इराणमधून सुमारे तीन हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. गेल्याच आठवड्यात भारताने इराण आणि इस्रायलहून आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले, त्याचेच हे यश आहे.
इराणमधील भारतीय नागरीकांना सुरुवातीला आर्मेनिया रोड येथून हलवण्यात आले होते. त्यानंतर इराणने गेल्या शुक्रवारपासून हवाई निर्बंध कमी केल्यानंतर मशहाद येथून चार्टर्ड विमानांनी भारतीयांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इस्रायलहून रवाना झालेल्या विमानाने ६०० भारतीय नागरीक मंगळवार, दि. २४ जून रोजी सकाळी ८.२० वाजता चार्टर्ड विमानाने नवी दिल्लीला पोहोचले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मायदेशी परतलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. भारताने 'ऑपरेशन सिंधू' ची घोषणा केल्यापासून इस्रायल-इराणमधून आतापर्यंत सुमारे ३,००० भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले आहे. इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना सुखरुप भारतात पाठवले जाईल. इराणमध्ये जवळपास १०,००० भारतीय राहतात. यात प्रामुख्याने विद्यार्थी व व्यावसायिक यांचा मोठा गट आहे, असे इराणी दूतावासाकडून जाहीर करण्यात आले आहे.
इस्रायलमध्ये ३२ हजारहून अधिक भारतीय आहेत, यातील बरेच नागरीक हे इस्रायलमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करतात. युद्धकाळात इस्रायल सोडू इच्छीणाऱ्या भारतीय नागरिकांना भारत सरकारने जमीन सीमा ओलांडून जॉर्डन किंवा इजिप्तला जाण्याचा सल्ला दिला होता. तेथून भारत सरकारने विशेष विमानांची सोय करत भारतात परत आणण्याची व्यवस्था केली होती.