तृतीयपंथी गौरी सावंत यांनी आपल्या जीवनात ‘गणेश ते गौरी’ हा लढा नेमका कसा दिला, त्यानंतर तृतीयपंथी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य, हे अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये उत्तमरित्या आपल्या अभिनयातून साकारले आहे. रवी जाधव दिग्दर्शित ही वेब सीरिज दि. १५ ऑगस्ट रोजी ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली असून, त्यानिमित्ताने सुष्मिता सेन सोबत साधलेला हा खास संवाद...
भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ ठरलेली अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. परंतु, आजवरच्या तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी भूमिका म्हणजे रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेब सीरिजमधील तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका. मालिका, चित्रपटांमध्ये बरेच चरित्रपट, तशी कथानके प्रेक्षकांसमोर आली. परंतु, एका तृतीयपंथीय व्यक्तीवर चरित्रपट किंवा त्यांच्या जीवनसंघर्षाला केंद्रस्थानी ठेवून भाष्य करणारे चित्रपट नाहीच. हीच बाब लक्षात घेता, मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी ’ताली’ या वेब सीरिजच्या माध्यमातून तृतीयपंथीची ‘बायोग्राफी’ मांडली आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केले.
तृतीयपंथी गौरी सावंत यांनी आपल्या जीवनात गणेश ते गौरी हा लढा नेमका कसा दिला, त्यानंतर तृतीयपंथी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य, हे अभिनेत्री सुष्मिता सेन हिने ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये उत्तमरित्या अभिनयातून साकारले आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी ही वेब सीरिज ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली असून, याच निमित्ताने सुष्मिता सोबत साधलेला संवाद.
तृतीयपंथींबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नसतं!
सर्वसामान्य माणसांपासून ते दिग्गज व्यक्तींपर्यंत आणि विविध समाजात पुरोगामी विचार कितीही मुरत असले, तरीही तृतीयपंथी आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. इतकेच नव्हे, तर तृतीयपंथीयांबद्दल आत्मीयता वाटते, असे केवळ बोलून भागत नाही, तर ते कृतीतूनदेखील दिसावे लागते. याच विषयाला अनुसरुन सुष्मिताला गौरी सावंतची भूमिका करण्याआधी आणि नंतर तृतीयपंथींबद्दलचा तिचा दृष्टिकोन कसा बदलला, याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “आधी मला असं वाटत होतं की, मला तृतीयपंथी समाजाबद्दल बर्याच गोष्टी माहीत आहेत. परंतु, गौरी सावंत यांना भेटल्यानंतर आणि या वेब सीरिजमध्ये अनेक तृतीयपंथींनी अभिनय केला आहे, त्यावेळी त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांतून असे लक्षात आले की, मला त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या अडचणींबद्दल काहीच माहिती नाही आहे. मात्र, ‘ताली’मध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही मला तृतीपंथींबद्दल आणि एकूणच या समाजाबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे.”
सुष्मिता सांगते की, “गौरी सावंत यांची भूमिका साकारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, ज्या समाजाचा आवाज गेली, अनेक वर्षं दाबला गेला आहे किंवा त्या व्यक्ती जीवंत आहेत की मेल्या, याचा कोणालाही फरक पडत नाही. समाजाचा हा दृष्टिकोन ‘ताली’मुळे बदलावा, हीच इच्छा होती. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत किंवा कोणत्याही माध्यमावर तृतीयपंथींना आदराने वागवणारी किंवा महत्त्वाची भूमिका देण्यात आली नव्हती. त्यामुळेच, ‘ताली’ने या माध्यमातून तृतीयपंथींना आदराने समाजात वागवले गेले पाहिजे, हा मुद्दा उपस्थित करत त्यांनाही अभिनयाची संधी देत त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव, अडचणी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”
मराठी कलाकार फार ताकदीचे कलावंत...
अभिनयाला भाषेची गरज नसते, हे विविध भाषिक कलाकार त्यांच्या अभिनयातून सातत्याने सिद्ध करत असतात. शिवाय, आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार हिंदीत किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करताना दिसतात. ‘ताली’ या वेब सीरिजमध्येदेखील अनेक मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सुष्मिताला विचारला असता तिने अगदी तोंड भरून सर्व मराठी कलाकारांचे कौतुक केले. “मराठी कलाकार फार ताकदीचे कलावंत आहेत. मराठी कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी असल्यामुळे लहान-मोठी स्क्रिप्ट जरी असली, तरी त्यांचे पाठांतर आणि सादरीकरण अगदी चोख असते. त्यामुळे मराठी कलाकारांसोबत काम करत असताना इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाचा कस लावणे, फार गरजेचे असते.”
तसेच या वेब सीरिजमध्ये विशेष लक्षणीय भूमिका ठरली ती, अभिनेता सुव्रत जोशी याची. सुव्रतचे कौतुक करताना सुष्मिता म्हणाली की,“ ‘ताली’मध्ये सुव्रतने ‘मुन्ना’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ज्यावेळी पहिल्यांदा मी सुव्रतला भेटले, तेव्हा तो पॅन्ट-शर्टमध्ये होता. पण, ज्यावेळी तो मुन्ना या तृतीयपंथीच्या रुपात माझ्या समोर आला आणि त्याने मला हात दाखवला, तेव्हा मला तो त्यांच्यापैकीच एक वाटला. इतकं त्याचं दिसणं, वागणं, चालणं, बोलणं त्यांच्यासारखंच होतं. इतकंच नाही, तर चित्रीकरणादरम्यान तो सतत त्याचा मेकअप नीट करणं, कपडे सावरणं हेच करत होता. त्याचं कारण असं की, स्त्रियांना कायमच आपण नीटनेटके आहोत ना, याची खात्री करण्याची सवय असते. त्यामुळे तो त्याच पद्धतीने सेटवर वावरत होता, इतका तो हरहुन्नरी कलाकार आहे.”
पुढे इतर मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली की, ’‘सुव्रतव्यतिरिक्त शीतल काळे या मराठी अभिनेत्रीसोबत पाठांतर करत असताना मी तिच्याकडे पाहतच राहायचे. कारण, इतक्या नैसर्गिक पद्धतीने ती अभिनय करायची, ज्यातून मला कायमच शिकता यायचं. तसेच, लहानपणीच्या गणेशची व्यक्तिरेखा साकारणार्या कृतिका देव हिनेदेखील निर्मळपणे गणेशची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मराठी कलाकारांसोबत काम करताना एक कलाकार म्हणून मी अनेक गोष्टी शिकले,” अशी कबुली सुष्मिताने दिली.