नवी दिल्ली : आज (१६ ऑगस्ट २०२३) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ५वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी 'सदैव अटल' या स्मृतीस्थळावर जाऊन अटलजींना नमन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "भारतातील १४० कोटी लोकांमध्ये सामील होऊन, मी अतुलनीय प्रतिभावान अटलजींना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहतो. त्यांच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि त्याला २१व्या शतकात अनेक क्षेत्रात नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “भारतीय राजकारणातील अजातशत्रू, परमपूज्य अटलजींनी विचारधारा आणि तत्त्वांवर आधारित राजकारणाची सर्वोच्च मापदंड प्रस्थापित केली. देशसेवेच्या प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी एकीकडे सुशासनाचा पाया घातला आणि दुसरीकडे पोखरणमधून भारताच्या सामर्थ्याची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. आपल्या संघटन कौशल्याने पक्षाला शून्यातून शिखरावर नेण्यात अमूल्य योगदान देणाऱ्या अशा महामानवाला स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम.
गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही समाधीवर पोहोचून माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल यांनीही स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण केले.