धर्मो रक्षति रक्षितः हेच आमचे ब्रीद; लोकसहभागातून मंदिर परिषद करण्याचा मानस : प्रसाद लाड
18-Jul-2023
Total Views | 83
मुंबई (ओंकार देशमुख): "जागतिक मंदिर परिषदेच्या माध्यमातून देशातील मंदिरे परस्परांशी जोडण्याचा आणि त्यांच्यातून हिंदू संस्कृतीचे संवर्धन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आपल्या मंदिरांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातून धर्माचे रक्षण करणे हा आमचा मानस आहे. धर्मो रक्षित रक्षितः हेच आमचे ब्रीद असून हाच जागतिक मंदिर परिषदेच्या आयोजनामगिल हेतू आहे," असे प्रतिपादन जागतिक मंदिर संमेलन समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले आहे.
वाराणसी येथे दि. २२ जुलै ते २४ जुलै दरम्यान जागतिक मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत करणार आहेत. जागतिक मंदिर परिषदेच्या आयोजनाचा पार्श्वभूमीवर लाड यांनी 'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रश्न : जागतिक मंदिर परिषदेची उद्दिष्टे काय ?
उत्तर : भारत देशाला पुरातन मंदिरांचा खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे या मंदिराची ओळख आपल्या पुढच्या पिढीला होणे, या मंदिराचे जतन - संवर्धन होणे, मंदिरांचा इतिहास आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होणे, जगातील विविध मंदिरे परस्परांशी जोडली जाणे, त्यांच्यात प्रशासकीय गोष्टींचे आदानप्रदान होणे आणि यासारख्या अनेक गोष्टी समोर ठेऊन जागतिक मंदिर परिषदेची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. जगभरातून सुमारे १२५० मंदिरे प्रत्यक्षात तर १००० मंदिरे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
प्रश्न : जागतिक मंदिर परिषदेची संकल्पना कुठून आली ?
उत्तर : मी सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असताना काही उपक्रम तिथे राबविले होते. मंदिरात येणाऱ्या नारळांपासून वड्या बनविणे, गणपतीला वाहण्यात येणाऱ्या हारांचा कालांतराने सदुपयोग करणे, विविध स्रोतांमधून आर्थिक उत्पन्नाचे पर्याय निर्माण करणे आणि या सगळ्यांतून मंदिरांची स्थिती बदलून त्याच्या धार्मिक ढांचाला हात न लावता त्याचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न आम्ही त्यावेळी केले. त्यावेळी धर्तीवर अनेक मंदिरांशी आमचा संपर्क झाला, माहितीची देवाणघेवाण झाली. अशाप्रकारे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मंदिरे परस्परांशी जोडली जावीत आणि त्यांच्यात परस्पर संवाद व्हावा, प्रशासकीय गोष्टींचे ज्ञान इतरांना दिले जावे, आर्थिक बाबी आणि अडचणींवर मात कशी करता येईल यावर चर्चा व्हावी आणि असे अनेक उदात्त हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नांमधून ही संकल्पना समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून उपस्थित राहणार असून देशाच्या पंतप्रधानांनी देखील या परिषदेला उपस्थित राहावे अशी आमची मनीषा आहे. त्यासाठी आम्ही विनंती केली आहे. या परिषदेत विविध मान्यवर अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी हजर राहणार आहेत.
प्रश्न : हिंदूंना या निमित्ताने काय आवाहन करणार आहात ?
उत्तर : प्रत्येक चळवळीसाठी आणि उपक्रमासाठी जनासहभाग हा तितकाच महत्त्वाचा असतो. लोकांच्या सहभागाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय कुठलीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे लोकांनी या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक असून माध्यमांनी देखील आमच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा आहे. सरतेशेवटी धर्म टिकला तर आपण टिकू त्यामुळे धर्मो रक्षति रक्षितः या ब्रीदला अंगिकरून आम्ही काम करत आहोत.