मुंबई : महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे नऊ लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे आज सगळीकडे विठूरायाच्या नामाचा जयघोष पाहायला मिळत आहे. त्यात आता आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जय हरी विठ्ठल' म्हणत ट्विटरवर विठ्ठल भक्तांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा देत लिहलंय की, " सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल !", अशा प्रकारे पंतप्रधानानी विठ्ठल भक्तांना मराठीतून आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. मागच्या 25 वर्षांपासून वारीत सहभागी होणारं भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य आज मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी झाले. यावेळी तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ देत, असं साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले.” असं शिंदे म्हणाले.