मुंबई : सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ‘सेवा विवेक’चा उपक्रम तसेच महिलांच्या बांबू हस्तकलेच्या कार्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी कौतुक केले आहे. ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, ‘सेवा विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (बांबू विभाग) लुकेश बंड, सामजिक कार्यकर्ता सेवा विवेक राजकुमारी गुप्ता, बांबू सेवक सुमन चौबे आणि बांबू सेवक खुशबू कोटक यांनी राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सेवा विवेक’च्या कार्याची माहिती दिली.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा विवेक सामाजिक संस्था महिला सक्षमीकरणचे कार्य कशाप्रकारे करत आहे याची सविस्तर माहिती राज्यपालांना दिले. यावेळी त्यांनी ‘सेवा विवेक’च्या महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तु राज्यपाल रमेश बैस यांना भेट दिल्या. राज्यपालांनी आदिवासी महिलांच्या बांबू हस्तकलेच्या कार्याची प्रशंसा केली.तसेच संस्थेच्या महिलांमार्फत बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. ह्या प्रत्येक राखीमध्ये एका भारतीय वटवृक्षाचे बीज टाकले आहे. ‘एक राखी एक झाड’ या संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक अशा राख्या संस्थेच्या महिलांमार्फत तयार केल्या आहेत.
‘सेवा विवेक’च्या उपक्रमात आजघडीला शेकडो महिला जोडल्या गेल्या आहेत येथील आदिवासी महिलांनी बांबूपासून हाताने तयार केलेल्या वस्तू जगभरात विकल्या जात आहेत. ऑनलाईन व्यवसाय करणारे पोर्टल अमेझॉन, फ्लिपकार्टवर या वस्तू उपलब्ध आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिला बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या, पेन स्टॅण्ड, मोबाईल होल्डर, मेकअप बॉक्स तसेच अन्य अनेक लहान-मोठ्या प्रकारच्या वस्तू तयार करतात. आदिवासी पाड्यांवर तयार होणार्या या वस्तुंमुळे रोजगार निर्मिती होत असून, आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे.
तसेच रोजगार निर्मितीचे साधनही ठरत आहे. या वस्तू आता ऑनलाईन व्यवसायामुळे जगाच्या पाठीवर पोहोचल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील विविध गावात तयार होणार्या वस्तू ‘सेवा विवेक’च्या माध्यमातून जगभरात लोकप्रिय ठरत असून ऑनलाईन बाजारपेठेतून त्यांना मागणी वाढत आहे. बांबूपासून अनेक उपयुक्त आणि शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण ‘सेवा विवेक’ संस्थेने आदिवासी महिलांना दिले आहे. सेवा विवेक सामाजिक संस्थेतच प्रशिक्षण घेऊन मग प्रशिक्षक झालेल्या १० ते १२ महिलांनी आतापर्यंत शेकडो आदिवासी महिलांना या वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घरकाम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त झाला पाहिजे या हेतूने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कार्याचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातही केला आहे.