नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू असताना, सुदानी सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’द्वारे तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर ट्विट करत म्हटले आहे की, सुदानमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. आमची जहाजे आणि विमाने त्यांना घरी परत आणण्यासाठी तयार आहेत. त्याअंतर्गत सुमारे ५०० भारतीय पहिल्या टप्प्यात बंदरावर पोहोचली आहेत. त्यांना जहाज आणि विमानांद्वारे मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले आहे.
यापूर्वी रविवारी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की हिंसाचारग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारताने आपल्या आकस्मिक योजनेचा भाग म्हणून जेद्दाहमध्ये उड्डाण करण्यासाठी दोन सी-१३०जे लष्करी वाहतूक विमाने तयार ठेवली आहेत. तसेच, भारतीय नौदलाचे एक जहाज या भागातील एका महत्त्वाच्या बंदरावर तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले होते की ते सध्या सुदानमधील विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या 3,000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत आहेत. शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आकस्मिक योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या. सुदानमध्ये गेल्या १० दिवसांपासून तेथील लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात झालेल्या भीषण संघर्षात ४०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.