भारतीय अलंकारिक चित्रशैलीतील चित्रकार, शिल्पकला, पेन्सिल स्केच, पॉटरी, टेलरिंग, फोटोग्राफी, सुगम गायन अशा विविध कला आत्मसात केलेला मनस्वी कलाध्यापक रमाकांत गायकवाडच्या विविधरंगी पैलूंविषयी..
रमाकांत शिवराम गायकवाड यांचा जन्म नाशिकजवळील ओझर (मिग) या गावी झाला. त्यांचे वडील ‘एचएमएल’मध्ये नोकरीला. तिथेच रमाकांत यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सातवीत असताना त्यांनी एकदा राजकपूरचे सुंदर चित्र काढले. ते पाहून त्यांचे कला शिक्षक गिरीश सहदेव यांनी त्यांना चित्रकलेतील ‘एलिमेंटरी’ आणि ‘इंटरमीडिएट’च्या परीक्षा देण्यास सांगितले. अंगभूत कलेमुळे रमाकांत यांनी ‘एलिमेंटरी’च्या परीक्षेत भारतातून चौथा, तर ‘इंटरमीडिएट’ परीक्षेतही देशातून सहावा क्रमांक मिळवला. दहावीनंतर कलेची क्षितिजे त्यांना खुणावू लागली. पुढे नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालयातून त्यांनी फाऊंडेशनचा कोर्स पूर्ण केला. कलेची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील ’जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये ’आर्ट टीचर डिप्लोमा’ही पूर्ण केला.
‘जे.जे.’मधील अनुभव, ज्ञानाने रमाकांत यांचे कलाविश्व अधिकच बहरले. कलासाधना आणि अर्थाजन असे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी कलेतच पूर्णवेळ करिअर करण्याचे ठरवले. कलानिकेतन महाविद्यालयात ‘ड्रॉईंग अॅण्ड पेंटिंग’ विषय घेऊन त्यांनी ’जी.डी.आर्ट’चे शिक्षण पूर्ण केले. शिकत असतानाच प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी महाविद्यालयातील कला इतिहास शिक्षक थत्ते सरांकडे चित्रकलेची कामे करण्यास सुरुवात केली. तिथेच त्यांची ओळख प्रसिद्ध शिल्पकार सुनिल घुले यांच्याशी झाली. आपण कधी शिल्पकार होऊ असे त्यांना कधीच वाटले नाही. चित्रकलेपेक्षा शिल्पकलेत कामे अधिक आहेत, पुतळे, शिल्पाकृतींचे कामे वारंवार सुरु असतात, हे जाणून गायकवाड यांनी शिल्पकला तत्काळ पैसे देईल म्हणून शिकण्यास प्रारंभ केला. घुले सरांनी रमाकांत गायकवाड यांच्या हातातील जादू ओळखत त्यांना शिल्पकलेसाठी आवश्यक ते ज्ञान, कौशल्ये शिकवली. ‘आर्मीएचर’ (पुतळा तयार करण्यापूर्वीचा तारेचा सांगडा) बांधणे, मातीकाम, ‘पीओपी मोल्डिंग’, ‘कास्टिंग’ यासह शिल्पकलेतील बारकावे घुले सरांकडून त्यांनी जलद आत्मसात केले.
सुनील घुले यांच्यासोबत सार्वजनिक गणेशोत्सवात सुरेख शिल्प घडवणे, देखावे, आरास, वाडे, राजवाडे यासह मोठमोठे आकर्षक देखावेही तयार करण्याचे कौशल्य, तंत्र शिकून रमाकांत यांनी शिकून घेतले. घुले यांच्यासोबत यांनी एकलहर्याचे विद्युत शिल्प, अलेक्झांडरचा पुतळा आदी कामे केली. पुढे कलेतील बारकावे आत्मसात करुन पूणर्र्वेळ शिल्पकार म्हणून त्यांनीं करिअरचा श्रीगणेशा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती व ‘लाईफसाईज’ पुतळा महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, गौतम बुद्ध आदी महापुरुषांचे सुरेख पुतळे त्यांनी लिलया घडवले. काही खासगी व्यक्तींसाठी त्यांनी अनेक पुतळेही घडवण्याचे काम केले. रमाकांत गायकवाड यांनी आजवर त्यांनी २५हून अधिक पुतळ्यांना मूर्तिमंत सौंदर्य बहाल केले.
नाशिक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुजय गुप्ता यांच्या मातोश्रींना समोर बसवून रमाकांत गायकवाड यांनी तयार केलेल्या ‘लाईफसाईज’ पुतळ्याचे खूप कौतुक झाले. गायकवाड सांगतात, ”हे शिल्प गुप्ता यांना इतके आवडले की, ते पाहून त्यांनी तत्काळ याच पुतळ्याच्या पाच प्रतिकृती तयार करण्याची ऑडर दिली.” छ. संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या ‘विद्युत भवन’ कार्यालयात नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. तो पुतळाही रमाकांत गायकवाड यांनीच घडवला. एखाद्या व्यक्तीमध्ये किती कला असाव्यात, याला काही मर्यादाच नसते. रमाकांत गायकवाड त्यापैकीच एक. ते भारतीय अलंकारिक चित्रशैली, पेन्सिल स्केचेस, पॉटरी, टेलरिंग, कुकिंग, फोटोग्राफी, सुगम गायन या कलेतही ‘निपुण’ आहेत. गायकवाड हे विद्यार्थीप्रिय कलाध्यापक होते.
“कला ही व्यक्तिमत्त्वाचे प्रगटीकरण आहे. त्यातच मला अभिव्यक्त व्हायला आवडते. त्यामुळे मी कलेतूनच संवाद साधत असतो. शिल्पकला अंग मेहनतीचे अन् कल्पक सर्जनशील काम. या कलेत इंजिनिअरिंग अशी सर्वच ‘प्रोफेशन्स’अंतर्भूत असतात. “कला माझे सर्वस्वच! कला माझे जीवन अन् श्वासही. कला आयुष्यातून वगळली, तर बाकी शून्य राहील,” असे ते सांगतात. गायकवाड यांनी आजवर प्रत्येक माध्यमातून काम केले. त्यामध्ये चारकोल, पेस्टल कलर, ऑईल कलर, वॉटरकलर, पेन्सिल, पेन असे अनेक प्रकार त्यांनी हाताळत कलाकृतींला स्वतंत्र ओळख दिली.
“कलेत आज विपुल करिअरच्या संधी आहेत. परंतु, आजचा कलाविद्यार्थी, मेहनत घेताना दिसत नाही. त्यांना कमी श्रमात अधिक पैसा हवा असतो. विद्यार्थ्यांचे वाचन हल्ली पूर्णपणे बंद झाले आहे. अभ्यास हा जसा सर्वच क्षेत्रांत आवश्यक तसाच तो कलेतही गरजेचाच. ज्यांच्यामध्ये प्रयोगशीलता, अभ्यास, चिकाटी, धैर्य, नवे काही करण्याची जिद्द तेच कलावंत यशस्वी होता. अल्पशा यशाने हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवून मार्गक्रमण करत राहणे. अनुभवाला प्रयोगाची जोड देऊन त्यानंतर ज्ञान तयार होते. हेच ज्ञान नंतर कीर्ती, सन्मान, पैसा प्रदान करतात,” असे गायकवाड सांगतात. आपल्या हातून थोर पुरुषांसह सर्जनशील, अजरामर शिल्पकृती घडावी, असे त्यांचे स्वप्न आहे. रमाकांत गायकवाड यांच्या या स्वप्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून अनेक शुभेच्छा...!