डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल हा अपघाताचा ‘हॉटस्पॉट’ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पादचारीपुलाच्या पूर्वेकडील बाजूला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी गर्दी केली आहे, तर पश्चिमेकडील बाजूच्या टोकाला उतार आहे. विशेष म्हणजे, येथे एक शाळा असल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. वाहतूक नियंत्रण विभाग याकडे कानाडोळा करीत आहे. वाहनचालक जीव मुठीत घेऊन या पादचारी पुलावरून ये-जा करीत असतात. यावर कडोंमपा प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम शहर एकमेकांना जोडण्यासाठी शहरात दोन उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीला फक्त कोपर उड्डाणपूल हा एकच पर्याय होता. परंतु, एकाच पादचारी पुलावरून ये-जा करताना वाहतुकीवर ताण पडत असल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. कोपर पादचारी पुलाच्या पश्चिम बाजूच्या टोकाला उतार आहे. याठिकाणी एक शाळादेखील आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस येथे विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. काही दिवसांपूर्वी याठिकाणी एक अपघात घडला होता. त्यात रिक्षाचालक आणि विद्यार्थी जखमी झाले होत, तर उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूला अनेक व्यवासायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. या दुकानांमुळे ग्राहकांची आणि पुलावरून ये-जा करणार्यांची येथे वर्दळ असते.
महापालिका प्रशासनाने उड्डाणपुलावर सफेद पट्टे मारले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून काही लोक त्यावरच गाड्या पार्किंग करतात. महापालिका प्रशासनाने दोन्ही बाजूला रोलिंग लावणे आवश्यक आहे. तसेच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, यासंदर्भात डोंबिवली वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.