वीरपत्नी दुर्गाबाई देशपांडे यांची अज्ञात कहाणी

    15-Apr-2023
Total Views | 123
 
Durgabai Deshpande
 
 
दि. 21 डिसेंबर, 1909 हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला आहे. कारण, नाशिकचा जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तेजस्वी तरुणाने वध केला, तो हा दिवस. पुढच्या काळात खटला उभा राहिला. अनंत कान्हेरे आणि त्याचे दोन कोवळे सहकारी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा तिघांना इंग्रजांनी ठाण्याच्या तुरुंगात फासावर चढविले. तो दिवस होता दि. 19 एप्रिल, 1910.
 
आपल्याला माहीत आहे की, त्याकाळी विवाह खूप लहान वयातच होत असत. या तिघांपैकी विनायक देशपांडे यांचे लग्न झालेले होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते दुर्गा. त्यांचे माहेर होते नाशिक तालुक्यातील गिरणारे गावचे. माहेरचे आडनाव जोशी. त्या वयाने इतक्या लहान असूनही अत्यंत जोखमीच्या क्रांतिकार्यात आपल्या पतीच्या पाठीशी असत. क्रांतिकार्याचा एक भाग म्हणून देशपांडे बॉम्ब बनविण्याच्या प्रयत्नात होते. पण, त्यासाठी लागणारी रसायने आणि इतर वस्तू खूप महाग होत्या. अशा वेळी या दुर्गेने काय केले? चक्क स्वत:च्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून पतीच्या स्वाधीन केल्या! कुठलीही स्त्री स्वत:च्या दागिन्यांवर जीवापाड प्रेम करते असे आपण पाहतो. पण, आपल्या देशासाठी त्यांनी अगदी सहजपणे या दागिन्याचा त्याग केला. पुढे देशपांडे फाशीच्या तख्तावर चढले आणि दुर्गाबाई यांच्यावर दुःखाचाजणू डोंगरच कोसळला. तो काळ इतका जुना होता की, प्रत्यक्ष पुनर्विवाह तर सोडाच, पण त्या दिशेने विचारसुद्धा शक्य नव्हता.
 
अतिशय यातनादायी गोष्ट म्हणजे (त्यावेळच्या प्रथेप्रमाणे) त्यांचे चक्क केशवपन करण्यात आले. आज स्वतंत्र भारतात मुक्तपणे वावरणार्‍या, सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या भारतीय तरुणींनी दुर्गाबाई यांचे आपल्या देशासाठी हे कुरूप होणे माहीत करून घ्यायला हवे आणि कायम लक्षात ठेवायला हवे. पतीच्या मृत्यूनंतर दुर्गाबाई एकाकी, निराधार झाल्या. लोक त्यांना ओळख दाखवेनात. काही नातेवाईकांनी संबंध तोडून टाकले. विनायकरावांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळच्या भाटवाडी नावाच्या गावात शेती होती. इंग्रजांनी ती जप्त केली. आता दुर्गाबाई यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन शिल्लक राहिले नाही. पुढे अनेक वर्षे त्या कुठे आहेत, काय करतात हे कोणालाच कळले नाही. त्यांनी मुंबई येथे स्वैपाकीण म्हणून काम केले असे म्हणतात. त्यानंतर त्या पंढरपूर येथील एका आश्रमात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळले. हा आश्रम निराधार विधवांसाठी चालविण्यात येत होता. या आश्रमात त्या अनेक वर्षे होत्या. विनायकराव देशपांडे यांचे भाचे माधवराव कुलकर्णी यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी दुर्गाबाईंना पंढरपूरहून मुंबईला आणले.
 
दरम्यान, आपला देश स्वतंत्र झाला. 1953 सालच्या मे महिन्यात स्वा. सावरकरांनी नाशिकला भेट दिली. नाशिकला तीळभांडेश्वर गल्लीत स्वा. सावरकरांचे एकेकाळी वास्तव्य होते. तेथे ‘अभिनव भारत मंदिर’ नावाने हुतात्म्यांचे एक स्मारक उभारण्यात आले; त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार त्या स्मारकात कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्या नावाने एक कक्ष तयार करण्यात आला. याच दौर्‍यात नाशिकमध्ये असलेल्या जॅक्सन गार्डनमध्ये सावरकरांची सभा झाली. त्यावेळेस या बागेचे नाव बदलून ‘शिवाजी उद्यान’ असे करण्यात आले. विशेष म्हणजे सावरकर दुर्गाबाई यांना विसरलेले नव्हते. त्या कोठे आहेत हे त्यांना माहीत होते. या सभेच्या वेळी सावरकरांनी त्यांना सन्मानपूर्वक बोलवून घेतले, त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला नाशिकचे त्यावेळचे खासदार गो. ह. देशपांडे उपस्थित होते. सावरकरांनी दुर्गाबाई आणि गो. ह. देशपांडे यांची भेट घडवून आणली आणि दुर्गाबाई यांच्या उदरनिर्वाहाची काहीतरी सोय लावावी, असे सुचविले.
 
सावरकरांच्या सूचनेप्रमाणे गो. ह. देशपांडे दुर्गाबाई यांना घेऊन दिल्लीला गेले आणि ते दोघे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना भेटले. त्यांनी त्यावेळच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना पत्र लिहिले. देसाई यांनी पाच हजार रुपयांची मदत मंजूर केली आणि ती रक्कम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली. त्या पैसे घेण्यासाठी गेल्या. पण, त्यावेळच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सचिवाने ही रक्कम एकदम न देता दरमहा थोडीथोडी द्यावी, असे सुचविले. त्याप्रमाणे त्यांना दरमहा 50 रुपयांचे निवृत्तीवेतन मिळू लागले. दुर्गाबाई यांना काशी यात्रेला जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी जास्त रक्कम देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्यांना 500 रुपये एकरकमी देण्यात आले. त्यांची काशी यात्रेची इच्छा अशा रीतीने पूर्ण झाली.
1953 नंतर दुर्गाबाई सिन्नर (नाशिक) जवळच्या सोनांबे या छोट्या गावात राहायला आल्या. विनायकराव देशपांडे यांचे सख्खे भाचे भिकाजी काशिनाथ कुलकर्णी त्यांना सोनाम्बेला घेऊन आले.
 
कुलकर्णींच्या त्या मामी म्हणून सगळे गाव त्यांना ‘मामी’ म्हणू लागले. त्यांना घरगुती औषधांची खूप माहिती होती. विशेषत: अगदी लहान मुलांना कोणती घरगुती औषधे द्यावीत, हे विचारण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी येत. सिन्नर जवळच्या नायगावमध्ये स्वा. सावरकरांचे मेहुणे (यमुनाताई यांचे बंधू) चिपळूणकर राहत असत. त्या कुटुंबाशी त्यांचा जवळचा संबंध होता. एकंदरीत त्यांचा शेवटचा काळ तुलनेने चांगला गेला. पतीच्या फाशीनंतर 55 वर्षांचे (विधवेचे) प्रदीर्घ आणि खडतर जीवन त्या जगल्या आणि दि. 13 एप्रिल, 1965 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर काही काळाने, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वावर निखारे ठेवणार्‍या या वीरपत्नीचे एखादे स्मारक सोनांबे गावात असावे, असा विचार पुढे आला. त्याप्रमाणे त्यांचे एक छोटे स्मारक तेथे तयार करण्यात आले आहे. त्यांच्या एका स्मृतिदिनी म्हणजे दि. 13 एप्रिल, 2002 रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले.
 
या लेखात लिहिलेली माहिती दुर्गाबाई त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून मी मिळवली आहे. ती एखाद्या वर्तमानपत्रात आज पहिल्यांदाच प्रकाशित होत असावी. आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत. पण, हे स्वातंत्र्यप्राप्त होण्यासाठी दुर्गाबाई देशपांडे यांच्यासारख्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरपत्नीनी केलेल्या त्यागाचा वाटा फार मोठा आहे, याची कृतज्ञता आपण सतत बाळगली पाहिजे.
 
 
-डॉ. गिरीश पिंपळे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121