नवी दिल्ली : “परदेशात जाऊन भारताला बदनाम करणे, हे एकच काम राहुल गांधी यांना उरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये नव्हे, तर डोक्यातच ‘पेगॅसस’ आहे,” असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी लगाविला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या केंब्रिज विद्यापीठातील भाषणावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधींना जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते खोटे बोलून भारताची बदनामी करण्यासाठी परदेशी व्यासपीठांचा वापर करतात. ‘पेगॅसस’बद्दलची त्यांची मते, त्यांची विधाने दिशाभूल करणारी आणि निराधार आहेत. ‘पेगॅसस’ राहुल गांधींच्या फोनमध्ये नसून त्यांच्या डोक्यात आहे. आरोप करण्याऐवजी त्यांनी ‘पेगॅसस’प्रकरणी आपला फोन तपासणीसाठी का दिला नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या राहुल गांधींच्या मोबाईलमध्ये असे काय होते की, ज्यामुळे त्यांनी तसे केले नाही, याचे उत्तर द्यावे,” असे आव्हान त्यांनी केले.
वारंवार खोटे बोलून, परदेशी मित्र, परदेशी एजन्सी वापरून भारताची बदनामी करणे ही राहुल गांधी यांची सवय असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींच्या मनात पंतप्रधानांविषयी द्वेष असू शकतो. मात्र, वारंवार देशाला बदनाम करण्यामुळे काँग्रेसच्या अजेंड्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ईशान्य भारतातील राज्यांमधील निकाल पाहता, जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविषयी आजार वाढत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अद्याप गुलामीची मानसिकता आहे,” असा टोला केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी लगाविला.