नवी दिल्ली : विविध कारणांमुळे भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ८४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. यामुळे तब्बल साडेचार हजार कोटींचा आर्थिक फटका बसल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात दिलेलय माहितीनूसार जगभरात गेल्या वर्षभरात १८७ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यापैकी ८४ वेळा एकट्या भारतात इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद केली होती. एकट्या जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ४९ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत सलग ६ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर राजस्थानमध्ये १२ वेळा इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती तर पश्चिम बंगालमध्ये ७ वेळा इंटरनेट सेवा बंद होती.
२०२२ मध्ये ३५ देशांमध्ये किमान १८७ वेळा इंटरनेट शटडाऊन झाले. या ३५ देशांपैकी ३३ देशांमध्ये या हिंसाचाराच्या घटना वारंवार घडल्या. इंटरनेट शटडाऊनमुळे एखादी माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येत नाही. त्यामुळे असामाजिक तत्वांना पायबंद घालता येतो. वाढत्या डिजिटल जगामध्ये इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते.
वर्षभरात ४५०० कोटींचा फटका
सन २०२१ मध्ये भारतात सुमारे ११५७ तास इंटरनेट सेवा ठप्प होती, यामुळे देशाचे जवळपास ४३०० कोटींचे नुकसान झाले आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार थांबतात. यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तसेच ५.९ कोटी लोकांना या सेवेपासून वंचित रहावे लागले होते. भारताव्यतिरिक्त युक्रेनमध्ये २२ वेळा आणि इराणमध्ये १८ वेळा इंटरनेट सेवा बंद झाली होती.