शिक्षण क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्यास शिक्षकांनी स्वतःला तयार करावे ः श्रीकांत पावगी
07-Feb-2023
Total Views | 105
1
डोंबिवली : “25-30 वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात संगणकीकरणामुळे आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे हे क्षेत्र कायमचे बदलले. तितकेच महत्त्वाचे बदल शिक्षण क्षेत्रामध्ये होत आहेत, त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा व शिक्षकांनी स्वतःला या बदलाला सामोरे जायला प्रशिक्षित करावे,” असे उद्गार डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी नुकतेच काढले. विद्याभारती कोकण प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
विद्या भारती कोकण प्रांताच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पायाभूत स्तराच्या शिक्षकांसाठी नुकतेच टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात पूर्व प्राथमिक (ईसीसीई) व प्राथमिक (एफएलएन) यामध्ये कार्यरत असणार्या 26 शाळांतील सुमारे 135 शिक्षकांनी सहभाग घेतला.
विद्या भारतीचे उपाध्यक्ष प्रशांत आठल्ये, प्रांत मंत्री संतोष भणगे, भावना गवळी तसेच इतर अनेक तज्ज्ञांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. कृती-खेळ यांच्या माध्यमातून शिक्षण, अनुभवाधारित शिक्षण, पंचाकोश विकसन आदी संकल्पना यावेळी विस्ताराने समजावून सांगण्यात आल्या. आगामी काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणार्या अनेक कौशल्यांची माहिती शिक्षकांना देण्यात आली व त्यांच्याकडून क्रियाकलापांचे प्रात्यक्षिकदेखील करून घेण्यात आले.