हैद्राबाद : तेलंगण काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवांत रेड्डी यांनी येथील जनतेला आश्वासन देताना म्हटले की, “आम्ही सत्तेत आल्यास राज्यातील 100 मतदारसंघांमध्ये राम मंदिर उभारण्यावर विचार करू. प्रत्येक मंदिर उभारण्यासाठी 10 कोटींचा निधी दिला जाईल,” असेही रेड्डी म्हणाले आहेत.
तेलंगण राज्यात या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विद्यमान आमदार तसेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे नेते आपापल्या मतदारसंघात दौरे करताना दिसत आहेत. तर तेलंगणमधील वेगवेगळ्या पक्षातील नेते आश्वासने देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तेलंगणमध्ये ‘हात से हात जोडो’ यात्रा आयोजित करण्यात आली. ही यात्रा भद्राछलम येथे असताना ए रेवांत रेड्डी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना, “भद्राछलम येथे राम मंदिर उभारण्यात आले. माझ्या पक्षातील नेत्यांनी मला सांगितले की, राज्यातील 100 मतदारसंघांमध्ये राम मंदिर असायला हवे. आम्ही यावर नक्कीच विचार करू. कारण, हे तरुणांसाठी फायदेशीर ठरेल. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्यावर विचार केला जाईल,” असे रेड्डी म्हणाले.
या वर्षी येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे रेड्डी यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने राम मंदिराबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे तेलंगणमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.