गौरव क्रीडापटूंचा, सन्मान राष्ट्राचा...

    31-Dec-2023
Total Views | 129
Article on Year 2023 Indian Players Performance and Awards

दि. ९ जानेवारी रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देशाची मान अभिमानाने उंचावणार्‍या क्रीडापटूंना गौरवान्वित करणारे क्रीडा पुरस्कार आणि त्यांचे मानकरी यांंच्याविषयी...

देशाच्या शासन संस्थेची अधिकृत मान्यता लाभलेले व राष्ट्रीय उत्सवाप्रसंगी म्हटले जाणारे गीत अर्थात ‘राष्ट्रगीत.’ राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीत हेदेखील राष्ट्रीय एकात्मतेचे व अभिमानाचे प्रतीक. आपण सारे शाळेत दैनंदिन अभ्यासवर्गाची सुरुवात होण्यापूर्वी तसेच स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी सामूहिकरित्या राष्ट्रगीताचे गायन करत आलो आहोत. तेव्हापासूनच आपले आणि राष्ट्रगीताचे नातं जोडलेलं आहे. शाळेच्या व्यतिरिक्त संचलने चालू असताना किंवा राष्ट्रध्वज वर चढवीत असताना, राष्ट्रीय सलामीच्या वेळी तसेच राज्यपाल, उपराज्यपाल, राष्ट्रपती उपस्थित असतील त्या सर्व प्रसंगी, लष्करी संचालनाच्या वेळी, अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज नेताना अशा विविध प्रसंगी राष्ट्रगीत मातृभूमीला मानवंदना देण्यासाठी आदरभावपूर्वक व शिष्टाचार पाळून सन्मानानेच गायले जाते.

या प्रसंगांहून काही प्रसंग असे असतात की, त्या प्रसंगांत गायले जाणारे राष्ट्रगान हे आपल्यामुळे ऐकवले जात असते आणि आपल्या बरोबर तेथील सगळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानास उपस्थित राहतात. फार नशीबवान देशवासीय असे असतात की, ज्यांच्यामुळे ते गायले, ऐकवले, वाजवले जाते. त्या नशीबवानांमध्ये क्रीडा क्षेत्रातील विविध व्यक्ती सहभागी असतात. आता २०२४च्या जानेवारीत देशाला राष्ट्रगानाचा लाभ होत आहे. एक प्रजासत्ताक दिनाच्या शुक्रवारी आणि दुसरा दि. ९ जानेवारीच्या मंगळवारी. क्रीडापटूंच्या दृष्टीने दि. ९ जानेवारीचा दिवस विशेष महत्त्वाचा असेल. कारण, देशाच्या सर्वोच्च ठिकाणी अर्थात राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गुंजणारे, ते राष्ट्रगान विशेष असेल.

राष्ट्रीय तसेच प्रामुख्याने ’ऑलिम्पिक’सहित अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना बक्षीस वितरणाच्या (पोडियम) मंचावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके दिली जातात. त्यातील पहिल्या आलेल्या म्हणजेच ज्याने सुवर्णपदक मिळवलेले असते, अशा क्रीडापटूंच्या राष्ट्राच्या स्तवनगीताचे गान सर्वांसमक्ष लावले जाते आणि आपल्यासहित सर्व त्याच्या सन्मानात सहभागी होतात.

जानेवारीच्या ९ तारखेला क्रीडापटूंचा सन्मान करायला राष्ट्रप्रमुख जेव्हा येतील, तेव्हाही राष्ट्रगान होईल. देशस्तवन गीताचा तो सोहळा काही प्रत्यक्षात तर काही दूरचित्रवाणीवर साजरा होताना बघत दक्ष स्थितीत उभे राहतील आणि यासाठी क्रीडापटू कारणीभूत ठरणार आहेत, ही क्रीडाजगताला अभिमानास्पद गोष्ट असेल. दि. ९ जानेवारीला खुद्द माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि तेदेखील राष्ट्रपती भवनात भारतीय खेळाडूंना देण्यात येणारे देशातील सर्वोच्च पुरस्कार ’मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ प्रदान होत आहेत.

प्रारंभ क्रीडा पुरस्काराचा...

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या या पुरस्काराचा प्रारंभ १९९१-९२ पासून झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील चार वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या भारतीय खेळाडूंना हे पुरस्कार दिले जातात. दि. २१ मे १९९१ला श्रीपेरूमबुदूर येथे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर, सत्ता सांभाळणार्‍या नरसिंहराव सरकारने चालू केलेल्या पुरस्काराचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ अशा नावाने प्रारंभ केला. बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद हा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ मिळवणारा पहिला खेळाडू ठरला.

भारतात काँग्रेसची सत्ता जाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. त्यानंतर देशाला पसंत पडतील, असे अनेक निर्णय घेण्यात आले. एकाच घराण्याचा उदोउदो करत, जिथे तिथे एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने जागोजागी नामे बदलण्याला ’ब्रेक’ लावत, मोदींनी ’टॉप गिअर‘वर वेगाने सर्वांना दाखवून दिले की, देशात बाकीचीही लोक आहेत की, जे लायक आहेत, लोकहृदयी आहेत. आपण त्यांनाही आदराने आपल्या गाडीत घेतले पाहिजे. त्यात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशी एक घोषणा मोदींनी ऑगस्ट २०२१ मध्ये केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमावर ती घोषणा केली होती. त्यांनी आपल्या त्या संदेशात म्हटलं होते की, “खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी, माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत, आजपासून ‘खेलरत्न पुरस्कारा’चं नाव ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं असेल. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘खेलरत्न’ पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल,“ असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेव्हा सांगितले होते.

भारत सरकारकडून सहा मोठे क्रीडा पुरस्कार दिले जातात. आपण याच क्रीडा पुरस्कारांबद्दल जाणून घेऊया.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा’ला आज ओळखले जाते. चार वर्षांपेक्षा अधिक काळ खेळात शानदार कामगिरी करणार्‍या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार विजेत्या खेळाडूला चषक, प्रमाणपत्र आणि २५ लाखांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

अर्जुन पुरस्कार

चार वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूला ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. १९६१ मध्ये या पुरस्काराला सुरुवात झाली असून, आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार विजेत्या खेळाडूला चषक, प्रमाणपत्र आणि १५ लाखांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

द्रोणाचार्य पुरस्कार

१९८५ साली ’द्रोणाचार्य पुरस्कारा’ला सुरुवात झाली. प्रशिक्षकांना देण्यात येणारा, हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतासाठी दिग्गज खेळाडू घडवणार्‍या प्रशिक्षकांना या पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये रोख रुपये ४० हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रुपये ७५ हजार इतकी वाढविण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद पुरस्कार

‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेजर ध्यानचंद यांच्या नावाने २००२ साली ‘मेजर ध्यानचंद पुरस्कारा’ची सुरुवात करण्यात आली. खेळात चांगली कामगिरी करणार्‍या आणि खेळाचा प्रसार करण्यासाठी दिलेले योगदान लक्षात घेता, हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार विजेत्याला चषक, प्रमाणपत्र आणि दहा लाखांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
 
मौलाना अब्दुल कलाम अझाद ट्रॉफी

भारतातील सर्वात जुना क्रीडा पुरस्कार म्हणून ’मौलाना अब्दुल कलाम अझाद पुरस्कार’ ओळखला जातो. भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे पहिले शिक्षण मंत्री अब्दुल कलाम आझाद यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले. वर्षभरात आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणार्‍या विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार विजेत्या विद्यापीठाला चषक आणि १५ लाखांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार

तीन वर्षांच्या कालावधील क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या संस्था किंवा कॉर्पोरेट्स तसेच व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले जाते. २००९ पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र आणि चषक दिला जातो.

कोण दिसतील राष्ट्रपती भवनात?

क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची आता आपण श्रेयनामावली पाहू की, जे राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती भवनात पुरस्कार घेताना आणि पुन्हा एकदा राष्ट्रगीताला दक्ष उभे राहून ‘भारतमाता की जय’ असे म्हणणारे आहेत.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ः सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार ः ओजस प्रवीण देवताळे (धनुर्विद्या), अदिती स्वामी (धनुर्विद्या), एम श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (मुष्ठीयुद्ध), आर वैशाली (बुद्धीबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुश अग्रवाल (अश्वारोहण), दिव्यकृती सिंह (अश्वारोहण ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), पुखरामबम सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो) पिंकी (लॉन बाऊल्स), ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर (नेमबाजी), ईशा सिंह (नेमबाजी), हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वॅश), अहिका मुखर्जीघ (टेबल टेनिस), सुनील कुमार (मल्लयुद्ध), अंतिम पंघाल (मल्लयुद्ध), नाओरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा धनुर्विद्या), इलूरी अजय कुमार रेड्डी (नेत्रबाधितांचे क्रिकेट), प्राची यादव (पॅरा नौकानयन)

द्रोणाचार्य पुरस्कार ः गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), ललित कुमार (मल्लयुद्ध), आर बी रमेश (बुद्धीबळ), शिवेंद्र सिंह (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार लाईफटाईम कॅटेगरी : जसकीरत सिंह ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंत कुमार पुशीलाल (टेबल टेनिस)

ध्यानचंद लाईफटाईम पुरस्कार : कविता (कबड्डी), मंजूषा कंवर (बॅडमिंटन) विनीत कुमार शर्मा (हॉकी) (लाईफटाईम विभागात असलेल्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात प्रदीर्घ काळासाठी लक्षणीय कार्य केल्याबद्दल, जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.)

काही अनोखे...

यावेळीच्या पुरस्कारांच्या आधीचे जे पुरस्कार होते, त्यांची ही आठवण. पाच क्रीडापटूंना देण्यात आलेल्या, दोन पुरस्कारांमधील अर्धविराम आपल्याला सापडतील.

आपल्या-आपल्या क्रीडा प्रकारात अनेकांनी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके, पुरस्कार मिळवले असताना आपण बघत असतो. पण, त्या पुरस्कारात असे दिग्गज आहेत की, त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून, नंतर परत काही काळाने त्याच पाच खेळाडूंनी अभिमानास्पद असे ‘अर्जुन ते खेलरत्न’ असे राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. त्यावरून त्यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्राला दिलेले, त्यांचे योगदान किती थोर होते ते समजेल. पाहू त्यांची नामावली.

१) फूटबॉलपटू सुनील छेत्री ः २०११चा अर्जुन पुरस्कार विजेता, २०१९चा पद्मश्री तर २०२१चा खेलरत्न
२) टेनिसपटू सानिया मिर्झा ः २००४ अर्जुन, २००६ पद्मश्री, खेलरत्न २०१५ मध्ये तर २०१६त पद्मभूषण.
३) देवेंद्र झाझडिया ः भालाफेक करणारे भारतीय पॅरा ऑलिम्पिक खेळाडू. २०१२ मध्ये ‘पद्मश्री’, २०१७ मध्ये खेलरत्न.
४) मिथाली डोराय राज ः महिला क्रिकेटपटू, ’लेडी तेंडूलकर’ म्हणून नावाजली जाणार्‍या मिथालीने २००३ मध्ये अर्जुन, २०१५त पद्मश्री तर २०२१ मध्ये खेलरत्न.
५) अचंता शरथ कमल, जो शरथ कमल म्हणून ओळखला जाणारा एक भारतीय व्यावसायिक टेबल टेनिस खेळाडू ः २००४ अर्जुन, २०१९ पद्मश्री तर २०२२ मध्ये खेलरत्न पुरस्कार असे मिळवले आहेत.

काही नाखूश...
 
ही जशी नाव आपण बघितली, तशी काही नाव अशीही होती की, जे सरकारवर नाखूश होती. भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याचा ’खेलरत्न पुरस्कारा’साठीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याच्यासह भारताची स्टार धावपटू द्युती चंद आणि आशियाई पदक विजेता धावपटू मनजीत सिंह यांचाही ’अर्जुन पुरस्कारा’साठीचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

या पुरस्कारांसाठी निवड कशी होते?

क्रीडा मंत्रालय ‘खेलरत्न‘ व ’अर्जुन पुरस्कारा’साठीच्या खेळाडूंच्या नावाची यादी तयार करते. ती पुढे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे पाठवण्यात येते. एक संघटना ‘अर्जुन पुरस्कारा’साठी केवळ तीन नावं पाठवू शकते. त्यामुळे काही क्रीडापटूंना पुरस्कारापासून वंचित राहावे लागे. काही न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. काही जण त्यावर स्थगिती आणवतात, तर न्यायालयच त्याचा स्वीकार करत नाही. आजकाल तर स्वतःनेच स्वतःची मागणी करायची असते, ती मागणी ऑनलाईन पद्धतीने करायची असते, ठरावीक मुदतीत करायची असते. अशा संगणकीय निवेदनाची छाननी काही निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत क्रीडा तसेच काही क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती करतात आणि त्यांनी संकलित करून तयार केलेली यादी क्रीडा मंत्र्याकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय घेऊन ती यादी जाहीर करण्यात येते.

अशा यादीत असलेल्यांना आपण दि. ९ जानेवारीला राष्ट्रपती भवनात पाहणार आहोत व त्यांचे अभिनंदन करणार आहोत. चला तर मग आपण त्यांना आपल्या शुभेच्छा देऊ.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121