काँग्रेसच्या पोकळ आश्वासनांचा पर्दाफाश! पक्षाला आयुष्य वाहिलेला कार्यकर्ता मृत्यूनंतर दुर्लक्षित
28-Dec-2023
Total Views | 78
नागपूर : काँग्रेस नेते राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवा दलाचे नेते कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दरम्यान, मृत्यूनंतर त्यांच्या कार्याकडे कांग्रेस पक्षाने दुर्लक्ष केले असून आजपर्यंत कुणीही सांत्वन करायला आले नसल्याचे पांडे कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. तसेच पक्षाने पांडे कुटुंबाला दिलेले मदतीचे आश्वासनही पुर्ण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना पांडे कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी राहूल गांधी कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबाची भेट घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
"जेव्हापासून कृष्णकुमार पांडेंचा मृत्यू झाला तेव्हापासून आजपर्यंत नाना पटोलेसुद्धा आम्हाला सांत्वना देण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आमच्याकडून काही चूक झाली का असे आम्हाला वाटत आहे. एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्ष विसरला आहे," अशी खंत पांडे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय कृष्णकुमार पांडेंचा मृतदेह आणण्याच्या वेळी नाना पटोले यांनी पांडे कुटुंबाला २५ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, आजपर्यंत ही मदत दिलेली नाही. तसेच आजपर्यंत कुणी भेटायला आले नाही. आज जर कृष्णकुमार पांडे जिवंत असते तर काँग्रेस नेते नक्कीच त्यांना भेटायला आले असते. परंतू, किमान सांत्वना देण्याकरिता तरी आज त्यांनी यायला हवे," अशी अपेक्षा पांडे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.