नवी दिल्ली : उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात गेल्या १३ दिवसांपासून अडकलेल्या कामगारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) पुन्हा एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. यासोबतच कामगारांना बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्याच्या आणि नंतर घरी पाठवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सिलक्यारा बोगदा दुर्घटनेला १३ दिवस झाले असून बोगद्यात ४१ मजूर जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी देश-विदेशातील सर्व एजन्सी, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ सर्व युद्धपातळीवर बचाव कार्यात गुंतले आहेत. एनडीआरएफतर्फे शुक्रवारी पत्रकारपरिषदेत मदतकार्याविषयी माहिती देण्यात आली.
एनडीआरएफचे सदस्य जनरल (नि.) सय्यद अता हसनैन म्हणाले की, सिल्क्यरा बोगद्यातून कामगारांना वाचवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आडव्या 'ड्रिलिंग'मध्ये आणखी तीन-चार अडथळे येऊ शकतात. हे एक अतिशय कठीण आणि आव्हानात्मक ऑपरेशन आहे. विविध ठिकाणांहून उपकरणे आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची प्रत्येक यंत्रणा या कामात गुंतलेली आहे. ते म्हणाले की, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्य सरकारांचाही यात सहभाग आहे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वारमध्ये सांगितले की, बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदी मदतकार्याची संपूर्ण माहिती सातत्याने घेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहेत. लवकरच सर्व कामगार बाहेर येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
एम्स ऋषिकेशपर्यंत ग्रीन कॉरिडॉर
कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. कामगारांमा कोणत्याही अडथळ्याशिवाय रुग्णालयात पोहोचविण्यास पहिले प्राधान्य आहे. यासोबतच जर कोणाची प्रकृती गंभीर झाली तर त्याला एअरलिफ्ट करून एम्स ऋषिकेशला नेण्यात येईल. त्यासाठी ऋषिकेशपर्यंत ग्रीन कॉरिडॉर बांधला जाणार आहे. यासाठी 250 पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.