नवी दिल्ली : विश्वचषकातील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाकडून विशेष एअर शो देखील होणार आहे. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर गोल्डन बॉल आणि बॅट कोणत्या खेळाडूला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, अंतिम सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार असल्याकारणाने गोल्डन बॉल आणि बॅट या दोन टीममधील एखादा खेळाडू असू शकतो. परंतु, गोल्डन बॅट ही फक्त भारताच्या स्टार फलंदाज विराट कोहलीला मिळणार हे आता जवळपास सुनिश्चित झाले आहे.
विराट कोहली २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने १० सामन्यात ७११ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रमदेखील मोडला. तसेच, या विश्वचषकात विराट कोहलीने तीन शतके ठोकली आहेत. त्यामुळे त्याच्या जवळपास एकही फलंदाज नसून अशा स्थितीत विराट कोहली सुवर्ण बॅट जिंकणार हे निश्चित मानले जात आहे.