नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. त्याचवेळी ‘युएस – इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ (युएसआयएसपीएफ) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर कोणतेही ठोस पुरावे नसताना केलेले आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
यूएसआयएसपीएफचे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी म्हणाले की, ट्रूडो यांनी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय भारतावर आरोप करणे दुर्दैवी आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडल आहेत. दोन्ही देशांमधील संबंध खूप जुने आहेत. दोघांमध्ये मोठा व्यापार असून तेथे 2,30,000 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कॅनडाने भारतात सुमारे 55 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान संसदेत जाऊन कोणतेही पुरावे न देता आरोप करतात हे दुर्दैवी आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारण आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी शीख वर्चस्व असलेल्या पक्षावर अवलंबून राहण्यापासून प्रेरित आहेत. असा दावा अघी यांनी केला. ते पुढे म्हणाले, एनडीपी हा पंतप्रधान ट्रुडो यांना पाठिंबा देणारा शीख बहुल पक्ष आहे. हे खेदजनक आहे कारण देशांतर्गत राजकारण करण्याआधी राष्ट्रहिताला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. दुसरा घटक म्हणजे ट्रुडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील दुसरे संभाषण फारसे सकारात्मक नव्हते. याचा राग ट्रुडो यांना होता हे संसदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे, असेही अघी यांनी यावेळी नमूद केले आहे.