भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

मुंबई महापालिकेचा सावध पवित्रा

    24-Oct-2023
Total Views | 88
stray dogs

मुंबई :
‘वाघ बकरी’ या प्रतिष्ठित चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात स्वतःला वाचवताना झालेल्या गंभीर दुखापतीत नुकतेच निधन झाले. मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी स्वतःच्या बचावासाठी झालेल्या झटापटीत पाय घसरून पडल्याने, त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यातच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याचवर्षी मागील सप्टेंबर महिन्यात भटका कुत्रा चावल्याने उत्तर प्रदेशमधील गाझीयाबाद येथे एका लहान मुलाचा ‘रेबिज’ होऊन मृत्यू झाला. अवघ्या १४ वर्षांच्या या मुलाने भीतीमुळे कुत्रा चावला असल्याची माहिती त्याच्या घरच्यांना दिली नाही. मुलाला कुत्रा चावला, हे घरच्यांना कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. मुलाला रुग्णालयात नेताना वाटेतच, त्या मुलाने वडिलांच्या कुशीत जीव सोडला. या घटनेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देशभरात पुन्हा ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत भटके प्राणी विशेषतः कुत्र्यांपासून होणार्‍या ‘रेबिज’ रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘मिशन रेबिज’ तसेच ‘वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस’ (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दोन्ही संस्था निःशुल्क सेवा देणार आहेत.

पालिका कायदा १८८८ मध्ये भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची तरतूद असून, १९९३ पर्यंत भटक्या कुत्र्यांना मारले जात होते. प्राणिमित्र संघटनांनी त्याविरोधात केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना मारण्यावर बंदी घातली आहे. यामुळे राज्यात व मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणार्‍यांना खूप त्रास होतो. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने त्यांचेही अपघात होतात. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कुत्रे चावण्यामुळे ‘रेबिज’ची भीती असून, त्यामुळे होणार्‍या वेदना, घ्यावी लागणारी इंजेक्शन याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. राज्यात जानेवारी ते २३ जुलै अखेरीस ३ लाख, ४९ हजार, २९७ लोकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे. मुंबईत याच काळात तब्बल ४१ हजार, ८२८ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे.

भटक्या कुत्र्यांचे परिसरानुरूप वर्गीकरण आवश्यक

काही जुन्या आठवणी किंवा प्रसंगांमुळेही कुत्रे आक्रमक होऊ शकतात. उदा. आपल्याला कुत्रे बर्‍याचदा वाहनांच्या मागे धावताना दिसतात. तसेच कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असले, तरीही दुसर्‍या एखाद्या ठिकाणाहून आलेला कुत्रा अनायसे एखाद्या कुत्र्याला चावला तरी धोका उद्भवू शकतो. म्हणूनच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्राणिमित्र संघटनांना इतर नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी भटक्या कुत्र्यांचे परिसरानुरूप वर्गीकरण करणेदेखील महत्त्वाचे ठरावे.
- डॉ. शिवानी तांडेल, पशुवैद्यक

लसीकरण आणि जनजागृतीवर भर

२०१४ ला भटक्या कुत्र्यांची शेवटची गणना झाली होती. २०१४ च्या गणनेनुसार ९५ हजारांहून अधिक कुत्र्यांची नोंद करण्यात आली. आता या संख्येत मोठी वाढ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, जानेवारी २०२४ मध्ये महानगरपालिकेतर्फे याबाबत जणगणना करण्यात येणार आहे. लसीकरण, नसबंदी त्याचबरोबर नागरिकांमध्ये जनजागृती हा उपाय महापालिका प्रकर्षाने करणार आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत जवळपास लाखांहून अधिक कुत्र्यांचे लसीकरण नसबंदी करण्यात येईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने वर्तवला आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याने त्यांच्यातील आक्रमकता कमी होते. तसेच त्यांच्या चावण्याने होणारा ‘रेबिज’चा धोकाही कमी होतो, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

१४ हजार, १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण पूर्ण

मुंबई महानगरपालिकेने ’रेबिजमुक्त मुंबई’साठी १५ स्वयंसेवी संस्थांच्यावतीने महानगरपालिका क्षेत्रातील सहा प्रशासकीय विभागातील १५ हजार भटक्या श्वानांचे ‘रेबिज’ लसीकरणाची मोहीम हाती घेतली. जागतिक ‘रेबिज’ दिनाचे औचित्य साधत दि. २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, पवई, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड या परिसरात मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुंबईकरांना त्यांच्या पाळीव श्वानाचे ‘रेबिज’ प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले गेले. ‘रेबिजमुक्त मुंबई’ मोहीम अंतर्गत सहा विभागातील मिळून १४ हजार, १९१ भटक्या प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले, त्यात ९ हजार, ४९३ कुत्रे आणि ४ हजार, ६९८ मांजरांचा समावेश होता.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121