गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाचे आम्ही माजी विद्यार्थी. आमच्या जिवनामध्ये नंदादीप शाळा, शाळेचे शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आज शाळा सोडून अनेक वर्षे झाली तरीसुद्धा आम्ही माजी विद्यार्थी आमची नंदादीप शाळा विसरलो नाही. शाळेसाठी आणि शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सकारात्मक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही धडपडत असतो. त्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
शाळेतले मित्र आणि त्या दिवसातल्या आठवणी शेवटपर्यंत आपल्या स्मरणात राहतात. एक अनोखी आपुलकी त्यात असते आणि म्हणूनच शालेय जीवन संपल्यानंतर काही वर्षांनी एकमेकांना पुन्हा भेटावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असं वाटू लागते. त्यातूनच री युनियन, गेट टुगेदर सारखे कार्यक्रम राबवले जातात. आम्ही नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पूर्व) शाळेचे विद्यार्थी याला अपवाद कसे ठरणार होतो. २००३ ला शाळेतून बाहेर पडल्यानंतर दोन-तीन वर्षांतच ‘दीपावली स्नेहमिलन’ आणि ‘वर्षा सहल’ असे दोन उपक्रम राबवायला आम्ही सुरुवात केली. दिवाळी पहाटच्या निमित्ताने एकत्र येणं असो किंवा पावसाळी सहलीच्या निमित्ताने माहुली, कोरीगड, लोहगडसारख्या गड-किल्ल्यांवर भटकंती असो, उत्साहाने कार्यक्रम चालू होते. हळूहळू कॉलेज मग नोकरी, लग्न यातून सगळ्यांनाच प्रत्येक वेळी येणं शक्य होत असे असं नाही. मग त्यातूनच एक कल्पना जन्माला आली ती म्हणजे समर्पण निधी. एका चांगल्या विधायक उपक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे एकमेकांशी जोडलेले राहू शकतो आणि यथाशक्ती समाज सेवेसाठी खारीचा वाटा ही उचलू शकतो.
२०१३ साली पहिल्यांदा या उपक्रमाला सुरुवात केली. तेव्हा, पहिल्याच वर्षी ३३ हजार, ५०० रुपये एवढा समर्पण निधी जमा झाला. संस्था ठरवण्यासाठी आमच्या मधूनच चार-पाच जणांची समिती तयार झाली आणि गोरेगावमधील नामवंत अशा ‘राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेला देणगी देण्याचं ठरलं. तेव्हापासून आजपर्यंत सतत चढत्या क्रमाने जशी राशी वाढत गेली त्याचसोबत आम्हा सर्व शालेय मित्र-मैत्रिणींचा सहभाग ही वाढत गेला. रुग्णसेवेसाठी कार्यरत असणार्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ पाठोपाठ वनवासी बांधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी झटणारी ‘वयम् संस्था’, फुटपाथ वरील गरीब मुलांसाठी काम करणारी ‘टच फाऊंडेशन’, वनवासी भागातील मुलींसाठी स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण देणारे गृहिणी विद्यालय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ व ग्राममंगल, पूर्वांचलातील नागरिकांची उर्वरित भारतीयांशी नाळ जोडण्यासाठी प्रयत्नरत असलेले पूर्वांचल विकास प्रकल्प तर अनाथ, मनोरुग्ण व्यक्तींना आधार देणार्या साई आधार व जीवन आनंद संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांना हा समर्पण निधी देण्यात आला.
गेल्यावर्षी या उपक्रमाने दहा वर्ष पूर्ण केली आणि सव्वा लाखांचा टप्पा पार केला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात शाळा, कॉलेज, संबंधित मित्र, त्यांच्या आठवणी मागे पडत जातात. परंतु, सदर उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व एकमेकांशी घट्ट बांधलो गेलो आहोत आणि सामजिक आशय असल्यामुळे निश्चितच शब्दातीत आनंदाची अनुभूतीही लाभत आहे. ‘समर्पण निधी’ हा उपक्रम असाच उत्तरोत्तर चालत राहो आणि त्यायोगे आम्हा नंदादीपीयांचा ऋणानुबंध असाच दृढ होत राहो हीच सदिच्छा...
दीपक मयेकर