नवी दिल्ली : तेलंगणमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दमनशाहीचा भाजप कार्यकर्ते सामना करत आहेत. मात्र, या संघर्षातून भाजप तेथे सरकार स्थापन करेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केला.
भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीस सोमवारपासून नवी दिल्ली येथे प्रारंभ झाला. बैठकीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी संबोधित केले. त्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, “यंदाच्या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
त्या सर्व निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष नड्डा यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सध्या तेलंगणामध्ये राज्य सरकारच्या कुशासनाविरोधात भाजप आंदोलन करत आहे. भाजपचा कार्यकर्ता राज्य शासनाच्या दमनशाहीविरोधात संघर्ष करत आहे. या संघर्षातूनच भाजप तेलंगणमध्ये सरकार स्थापन करेल,” असा विश्वास जगतप्रकाश नड्डा यांनी व्यक्त केला आहे.
पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन नड्डा यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकार्यांना केले आहे. “भाजपने 72 हजार कमकुवत बूथ मजबूत करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र, कुशल संघटनशक्तीद्वारे 1 लाख, 30 हजार बूथपर्यंत पोहोचून त्यांना मजबूत करणे साध्य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात होणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये भाजपला अभुतपूर्व विजय प्राप्त झाला, त्यामुळे गुजरात भाजपच्या नियोजनाचा आदर्श प्रत्येक राज्याने घ्यावा,” असे आवाहनही नड्डा यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे वनवासी, अनुसूचित जाती आणि जमाती मुख्य राजकीय प्रवाहात आल्याचा दावा नड्डा यांनी केला. त्याचप्रमाणे भाजप स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीदिनानिमित्त भाजप आणि सरकारस्तरावर 13 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यामध्ये सहभागी होणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले.
भव्य ‘रोड शो’चे आयोजन
भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य ‘रोड शो’चे आयोजन केले होते. नवी दिल्लीतील अशोक रोड येथून प्रारंभ झालेल्या ’रोड शो’चा समारोप संसद मार्गावरील ’एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर’ या कार्यकारिणीच्या स्थळी झाला. यावेळी दुतर्फा भाजपचे कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
भारतीय मंदिर शैलीनुसार श्रीराम मंदिराची उभारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी भारतीय मंदिरांच्या स्थापत्य शैलीचे कौतुक करत असतात. या विशिष्ट तंत्रामुळेच भारतीय मंदिरे अनेक शतके उभी आहेत. त्यामुळे अयोध्येत उभारल्या जाणार्या भव्य श्रीराम मंदिरासाठीही भारतीय मंदिर स्थापत्यातील तंत्राचा अवलंब केला जात असल्याचे नड्डा यांनी विशेषत्वाने नमूद केले.