नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
23-Sep-2022
Total Views | 45
4
मुंबई: फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून काही आमूलाग्र बदल सातत्याने होत आहेत. पीक विमा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'क्रेड' कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मुलाखत घेतली.
"राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तंत्रज्ञानामुळे कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता येते. देशात सुमारे ८०,००० स्टार्टअप्स आणि १०० युनिकोर्न असून त्यापैकी ५०,००० स्टार्टअप्स आणि २५ युनिकोर्न हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई फिनटेक स्टार्टअप्स कॅपिटल बनली आहे. राज्यात स्टार्टअप्स वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात असून त्यासाठी इको सिस्टिम वाढविण्यावर भर देत आहोत." असे फडणवीस म्हणाले.
मुंबईच्या प्रगतीपथाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, "मुंबई आता बदलत आहे. सुमारे ३०० कि. मी. लांबीचे मेट्रोचे जाळे तयार होत असून मेट्रो आणि कोस्टल रोड मुळे दळणवळण अधिक गतीने होईल. सध्या सुमारे नऊ दशलक्ष प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. तर, मेट्रोमधून आठ दशलक्ष लोक प्रवास करू शकणार आहेत. यामुळे प्रवास करणे सुलभ होऊन वेळेची बचत होणार आहे. ट्रान्स हार्बर हा २२ कि.मी. चा सर्वात लांब समुद्री मार्ग तयार होत आहे, यामुळे मुंबई जवळ नैना हे पूरक क्षेत्र तयार होत आहे." अशी माहिती फडणवीसांनी दिली.
नवीन पिढी अतिशय हुशार असून मला त्यांच्याकडून नवीन बाबी शिकण्याची प्रेरणा मिळते, असे सांगून फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विविध क्षेत्रांशी संबंधित युवकांना ‘सीएम फेलो’ म्हणून संधी दिल्याचे सांगितले. युवकांकडे नवीन दृष्टिकोन असतो, त्यामुळे मी त्यांच्याशी नियमित संवाद साधतो, असे त्यांनी सांगितले.